पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं; खडसे तावडे भेटीवर गुलाबरावांची फटकेबाजी
भाजपचे नेते विनोद तावडे आणि ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या भेटीवर मंत्री गुलाबराव पाटील यांची मिश्किल प्रतिक्रिया.
राज्याचे पाणीपुरवठा मंत्री तथा जळगाव (Jalgaon) जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी जळगाव येथे प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना राज्यातील विविध राजकीय घडामोडींवर तसेच विकासकामांवरील आरोपांबाबत आपली भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी खासदार श्रीकांत शिंदे–ओम बिर्ला भेट, मिसिंग लिंक प्रकल्प, शरद पवार-एकनाथ शिंदे भेट, एकनाथ खडसे-विनोद तावडे भेट तसंच आदित्य ठाकरे यांच्या वक्तव्यावरही भाष्य केल आहे.
एकनाथ खडसे आणि भाजप नेते विनोद तावडे यांच्या भेटीबाबत विचारले असता गुलाबराव पाटील यांनी खडसेंवर निशाणा साधला. त्यांनी भेट कशासाठी घेतली हे मला माहिती नाही. पिक्चर संपल्यानंतर नवीन पिक्चर सुरू करणं एवढं सोपं नसतं, त्यासाठी नटही तसाच असावा लागतो, असं म्हणत त्यांनी, इतना टूटा हूँ कि छूने से बिखर जाऊँगा, तुम अगर और दुआ दोगे तो मर जाऊँगा, या शायरीतून खोचक टीका केली.
Vinod Tawde Meeting With Khadse : एकनाथ खडसे पुन्हा भाजपात परतणार? महासचिव विनोद तावडेंनी घेतली भेट
पुढं ते म्हणाले, त्या घरात जाऊन आता खडसेंना काहीही मिळणार नाही. ते सध्या केवळ आपल्या कुटुंबीयांची व्यवस्था करण्यात व्यस्त आहेत. वाढदिवसानिमित्त त्यांनी भाजपच्या सर्व वरिष्ठ नेत्यांना बोलवावं. सरकारवर टीका करावी, सरकारचे वाभाडे काढावेत. उद्धव ठाकरे यांच्या काळात युती तोडण्यात आपणच पुढाकार घेतल्याचं ते छातीठोकपणे सांगत होते, त्यामुळे आता सर्वांना वाढदिवसाला बोलवा, सगळे येतील असा टोला त्यांनी लगावला आहे.
शरद पवार आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीवर तसेच त्यावरून संजय राऊत यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, भेट घेतली म्हणून शंका का घ्यावी? कोण कोणाचीही भेट घेऊ शकतो. मीदेखील शरद पवारांना भेटू शकतो. ते राज्याचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री आहेत. भेट घेण्यात गैर काहीच नाही. मात्र सध्या राज्यात शंकेचे वातावरण निर्माण करण्यात आलं आहे असंही ते म्हणाले.
श्रीकांत शिंदे यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांची घेतलेल्या भेटीबाबत विचारले असता, खासदार हे खासदारांना भेटत असतात. त्यामध्ये काहीही विशेष किंवा चुकीचं नाही. श्रीकांत शिंदे हे आमचे युवा नेते आहेत. त्यांच्या भेटीचा वेगळा अर्थ काढण्याचं कारण नाही, असं त्यांनी सांगितले.
दरम्यान, मिसिंग लिंक प्रकल्पावर विरोधकांकडून होत असलेल्या टीकेला उत्तर देताना गुलाबराव पाटील म्हणाले, कोणताही मोठा प्रकल्प राबविताना छोट्या-मोठ्या त्रुटी राहू शकतात. त्यामुळे आकांडतांडव करण्याची गरज नाही. ९९ टक्के काम चांगले झाले असताना संपूर्ण प्रकल्प निकृष्ट असल्याचे म्हणणे ही विरोधकांची चुकीची वृत्ती आहे. आजपर्यंत कोणत्याही सरकारने इतकी विकासकामे केली नाहीत. समृद्धी महामार्गासह ग्रामीण रस्त्यांचे जाळेही या सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात सुधारले आहे.