बीडच्या आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण; अल्पवयीन मुलीसाठी आईचं आमरण उपोषण

या धमकीची माहिती पोलिसांना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आहेरकर यांनी सांगितलं.

News Photo   2026 06 12T164148.673

अल्पवयीन मुलीला लग्नाचे (Beed) आमिष दाखवून पळवून नेल्याच्या प्रकरणात मुख्य संशयिताला अंभोरा पोलिसांकडून संरक्षण दिले जात असल्याचा आरोप करत गहुखेल येथील पीडित मातेसह कुटुंबीयांनी गुरुवार (दि. ११) पासून आष्टी तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनामुळे तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, त्यांच्या अल्पवयीन मुलीला ३० मे २०२६ रोजी तागडखेल येथील शिवम केशव गव्हाणे याने लग्नाचे आमिष दाखवून फूस लावत पळवून नेले. याबाबत त्यांनी तातडीने अंभोरा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. मात्र, मुख्य संशयिताचे नाव स्पष्टपणे नमूद असूनही पोलिसांनी त्याचा समावेश न करता अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे. गुन्हा दाखल झाल्यापासून कुटुंबीय मुलीच्या शोधासाठी सातत्याने पाठपुरावा करत आहेत. मात्र, पोलिसांकडून अपेक्षित गांभीर्याने तपास होत नसल्याचे त्यांचे म्हणणे आहे.

बीडच्या खूप्रकरणात ट्वीस्ट; पतीला चिकन राईस आणायला पाठवलं अन् प्रियकराला सांगून

संशयिताच्या नातेवाईकांची चौकशीही करण्यात आलेली नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्याचबरोबर, पोलिसांत दाखल केलेला गुन्हा मागे घेतल्यासच मुलगी परत मिळेल, असा कथित निरोप संशयिताच्या कुटुंबीयांकडून देण्यात आल्याचा दावाही पीडित कुटुंबाने केला आहे. या धमकीची माहिती पोलिसांना देऊनही कोणतीही ठोस कारवाई करण्यात आली नसल्याचे आहेरकर यांनी सांगितलं. मुलीचा अद्याप शोध लागलेला नसल्याने कुटुंबीय मानसिक तणावाखाली असून, न्याय मिळवण्यासाठी अखेर आमरण उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मुलीचा सुरक्षित शोध लागून दोषींवर कठोर कारवाई होईपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नाही, असा निर्धार कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. या आंदोलनामुळे प्रशासन आणि पोलिस यंत्रणेची भूमिका चर्चेत आली असून, या प्रकरणात पुढे कोणती पावले उचलली जातात याकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे. पोलिसांत दाखल केलेला गुन्हा मागे घेतल्यासच तुमची मुलगी तुमच्या ताब्यात दिली जाईल, असा कथित संदेश संशयिताच्या कुटुंबीयांकडून देण्यात आल्याचा आरोप पीडित कुटुंबाने केला आहे.

या प्रकारामुळे प्रकरण अधिक गंभीर बनले असून, याबाबत पोलिसांना माहिती देऊनही कारवाई न झाल्याने कुटुंबीयांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. पीडित कुटुंबाच्या आरोपांनुसार, मुख्य संशयिताचे नाव तक्रारीत स्पष्टपणे नमूद असूनही त्याचा गुन्ह्यात समावेश करण्यात आलेला नाही. तसेच मुलीचा शोध घेणे, संशयिताच्या नातेवाईकांची चौकशी करणे आणि धमकीच्या आरोपांची दखल घेणे या बाबतीतही पोलिसांकडून अपेक्षित तत्परता दिसून आलेली नाही. त्यामुळे अंभोरा पोलिसांच्या तपास प्रक्रियेवर आणि कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.

follow us