Chhagan Bhujbal : ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या!’ भुजबळांचा जरांगेंना स्पष्ट इशारा

Chhagan Bhujbal : ‘हिंमत असेल तर मंडल आयोगाला आव्हान द्या!’ भुजबळांचा जरांगेंना स्पष्ट इशारा

Chhagan Bhujbal Challenges Manoj Jarange : राज्य सरकारने मनोज जरांगे पाटील यांनी केलेल्या सर्व (Manoj Jarange) मागण्या मान्य करत अधिसूचनाही काढली. सरकारच्या निर्णयावर ओबीसी नेत्यांनी प्रचंड टीका केली होती. राज्य सरकारने अधिसूचना काढून ओबीसी आरक्षणाला (OBC Reservation) धक्का लावलाच असे छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) म्हणाले होते. या अधिसूचनेवर 16 फेब्रुवारीपर्यंत हरकती मागवल्या आहेत. तेव्हा आता हरकती नोंदवण्यासाठी पुढाकार घेणार असल्याचेही त्यांनी सांगितले होते. त्यानंतर पुन्हा एकदा मंत्री छगन भुजबळ यांनी मनोज जरांगे पाटील यांच्यावर घणाघाती टीका केली. त्यांच्यात हिंमत असेल तर मंडल आयोगाच्या विरोधात आवाज द्यावा, असे आव्हान भुजबळ यांनी दिले.

Chhagan Bhujbal : ‘सरकारकडून आता हट्ट पुरवण्याचे काम सुरू’ भुजबळांची स्पष्ट शब्दांत नाराजी

जरांगे पाटील यांच्याइतका ज्ञान देशात दुसरा नाही. ते तीन कोटी समाजबांधव मुंबईत आणणार होते पण सर्वांनीच पाहिलं की किती लोक होते. मंडल आयोगाला त्यांना विरोध करायचा असेल तर त्यांनी जरूर करावा आणि मंडल आयोगाला संपविण्याचे काम करून दाखवावे, असे आव्हान भुजबळ यांनी जरांगेंना दिले.

मी फक्त एका जातीसाठी नाही तर ओबीसी समाजातील 374 जातींसाठी लढत आहे. जरांगे पाटील फक्त एका जातीसाठी लढत आहेत. मराठा समाजाला मागच्या दाराने आरक्षणात प्रवेश दिला जात असल्याबद्दल मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत आक्षेप घेतला होता. परंतु, मंत्रिमंडळाची बैठक अजेंड्यावर चालत असते आणि त्या बैठकीच्या अजेंड्यावर हा विषय नव्हता, असे भुजबळांनी सांगितले.

‘लोकसभा निवडणूक लढा’ प्रकाश आंबेडकरांचे मनोज जरांगे पाटलांना आवाहन

गावागावात गेले तीन दिवस उन्माद सुरू झाला आहे. रात्री तीन वाजेपर्यंत डीजे लावले जातात. ओबीसींच्या घरासमोर फटाके लावायचे, नाचायचे असे प्रकार सुरू आहेत. लोकांना गावं सोडून जावे लागत आहे. जो उन्मादी उत्सव तो ओबीसीच्या विरूद्ध सुरू असल्याचे आम्ही पाहत आहोत. ही भयंकर परिस्थिती राज्यात निर्माण झाली आहे. डीजेवर मला शिवीगाळ करणारीही गाणी वाजवली जात आहेत, अशी माहिती माझ्यापर्यंत आल्याचे भुजबळ म्हणाले.

लाख कोटीतला फरक कळत नाही

मराठा समाजाला मागच्या दाराने प्रवेश दिला जात आहे. त्यामुळे ओबीसी समाजावर अन्याय होत आहे. सध्या सुरू असलेल्या झुंडशाहीसमोर सरकारलाही नमतं घ्यावं लागत आहे. त्यामुळे आता आम्हाला न्यायालयात जाऊन कैफियत मांडण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. मात्र ज्या जरांगेंना कोटी आणि लाखातला फरक कळत नाही आणि ते ओबीसी आरक्षणाला आव्हान देण्याची विधानं करत आहेत असा खोचक टोला भुजबळांनी केला.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube