आधी महसूल मंडळांची फेररचना, नंतर अप्पर तहसीलचा निर्णय; मंत्री विखेंनी सांगितला प्लॅन

Radhakrishna Vikhe : अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात शासन स्तरावरून जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नसल्याचे स्पष्टीकरण पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले. ज्यांच्याकडे मुद्दे राहीले नाहीत ते आता जनतेला पुढे करून लढाई करीत आहेत असा टोला त्यांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात यांना लगावला.
मंत्री विखे पाटील म्हणाले की, अप्पर तहसील कार्यालयाला स्थगिती मिळाल्याची बातमी ही अहिल्यानगर जिल्ह्याची नाही तर सोलापूर जिल्ह्यातील अनगर या गावाची आहे. संगमनेर तालुक्यातील अप्पर तहसील कार्यालयाच्या संदर्भात भूमिका मांडताना विखे पाटील म्हणाले की, जनतेच्या सुविधेकरता कार्यालय निर्माण करणे हे शासनाचे काम आहे. आश्वी बरोबरच घारगाव, साकूर येथे अप्पर तहसील कार्यालय व्हावे आशी मागणी पुढे आली होती. ग्रामस्थांच्या असलेल्या भावनांचा कुठेही अनादर न करता महसूल मंडळाची फेररचना केल्याशिवाय कोणताही निर्णय होणार नाही. महसूली मंडळाच्या फेररचनेसाठी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.
राधाकृष्ण विखेंना धक्का! अनगर अप्पर तहसील कार्यालय अखेर रद्द, मुंबई हायकोर्टाचा आदेश
अप्पर तहसील कार्यालयावरून सुरू असलेल्या आंदोलनाबाबत बोलताना मंत्री विखे पाटील म्हणाले की,ज्यांच्याकडे कोणतेच मुद्दे राहीलेले नाहीत ते फक्त जनतेला पुढे करून अस्तित्वाची लढाई करून दिशाभूल करण्याचे काम करीत आहेत. ज्यांनी वर्षानुवर्ष मक्तेदारी आणि दहशत निर्माण केली त्यांना जनतेन झुगारून दिले आहे. पराभव पचवता येत नसल्यामुळेच अप्पर तहसील कार्यालयाच्या विषयावर राजकारण केले जात आहे, अशी टीका विखे पाटील यांनी केली.
अतिक्रमण काढण्याच्या विषयावर प्रतिक्रिया व्यक्त करताना पालकमंत्री म्हणाले की, वाढत्या नागरीकरणामुळे हा प्रश्न जटील झाला आहे. राज्य आणि राष्ट्रीय महामार्गाच्या अंतराचे निकष ठरलेले आहेत. अतिक्रमण काढून लोकांना विस्थापित करण हा उद्देश नाही. आजही अनेक ठिकाणचा मोबदला देणे बाकी असल्याने यासाठी राज्यव्यापी धोरण घेण्याबबात आपण पाठपुरावा करणार आहोत.
शिर्डीतील गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करण्याचे काम सुरू आहे. जादा दराने पूजा साहीत्य विकणे सुद्धा गंभीर विषय आहे. फुल विकण्याचा अधिकार मंदीर परीसरात फक्त संस्थान सोसायटीला देण्यात आला आहे. अनधिकृत विक्री होत असेल तर कारवाई करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शिर्डीचे नाव बदनाम होवू नये म्हणून प्रत्येक दुकानाच्या बाहेर दरपत्रक लावण्यासाठी व लूटमार करणाऱ्यांविरोधात कारवाई करण्याच्या सूचना पालिका प्रशासनाला दिल्याचे मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.
माणिकराव कोकाटे सडेतोड बोलणारी व्यक्ती पण समर्थन करणार नाही, मंत्री विखेंनी भूमिका