एसटीला दिवाळीतच ‘अंधार’ तिकीट महसुलात सरासरी 6 कोटींची दैनंदिन तूट
Maharashtra Transport Corporation : दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामातही राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) ‘उत्पन्नाचा दिवा’ लागला नाही.
Maharashtra Transport Corporation : दिवाळीसारख्या गर्दीच्या हंगामातही राज्य परिवहन महामंडळाला (एसटी) ‘उत्पन्नाचा दिवा’ लागला नाही. दैनंदिन वाहतूक अहवालानुसार सवलत मूल्य रक्कमेसह प्रवासी तिकिटांमधून मिळणाऱ्या महसुलात तब्बल सहा कोटी रुपयांची दैनंदिन तूट नोंदवली गेली असून, ऑक्टोबर महिन्यातच सुमारे 180 कोटी रुपयांचा फटका बसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र एसटी कर्मचारी (Maharashtra Transport Corporation) काँग्रेसचे (Congress) सरचिटणीस श्रीरंग बरगे (Shrirang Barge) यांनी संतप्त प्रतिक्रिया नोंदवित, “उत्पन्न वाढीसाठी जबाबदार अधिकारी निष्क्रिय झाले आहेत; त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करून तात्काळ कारवाई करा” अशी मागणी केली आहे.
बरगे म्हणाले की, “एसटी ना नफा–ना तोटा या तत्वावर चालविली जाते, पण प्रत्यक्षात ती सतत तोट्यातच आहे. या आर्थिक चणचणीमुळे दर महिन्याला सरकारकडे ‘मदतीची याचना “करावी लागते, ही अत्यंत लाजिरवाणी बाब आहे.” त्यांनी पुढे स्पष्ट केले की, “या वर्षी झालेल्या 14.95 टक्के भाडेवाढीचा विचार करता प्रतिदिन सुमारे सरासरी 33 कोटींचे उत्पन्न मिळायला हवे होते; परंतु ऑक्टोबरमध्ये हे उत्पन्न केवळ 26.55 कोटी इतकेच राहिले. म्हणजे उद्दिष्टाच्या तुलनेत मोठी तूट निर्माण झाली असून, हा आकडा 1000 कोटींपेक्षा जास्त अपेक्षेवर 180 कोटींनी कमी आहे.”
बरगे यांनी इशारा दिला की, “अकरा हजार कोटींच्या संचित तोट्याच्या गर्तेत अडकलेली एसटी आणखी खोलवर अडकण्याच्या स्थितीत आहे. तिकीट विक्रीतील घट का होते आहे, याचा अभ्यास करण्यासाठी अनुभवी अधिकाऱ्यांचा स्वतंत्र गट तातडीने नेमला पाहिजे.”
Election Commission : शिक्षक व पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी मतदार नोंदणी सुरु
ते पुढे म्हणाले, “वर्षानुवर्षे एकाच ठिकाणी खुर्ची पकडून बसलेले अधिकारी केवळ ‘टोपल्या टाकण्याचे’ काम करत आहेत. अशा निष्क्रिय अधिकाऱ्यांच्या तातडीने बदल्या केल्या नाहीत, तर एसटीला उभारी देणे कठीण होईल. आवश्यकता भासल्यास त्यांच्या विरोधात गंभीर शिस्तभंगाची कारवाई करावी.” थोडक्यात एसटीच्या उत्पन्नातील घट, जबाबदारी ठरविण्याची मागणी आणि अधिकाऱ्यांच्या निष्क्रियतेवर बरगे यांचा तिखट प्रहार ‘उत्पन्न नाही, तर खुर्चीही नाही’ असं बरगे यांनी म्हटले आहे.
