फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू, ‘PSI’ होण्याचा मार्ग झाला मोकळा

  • Written By: Published:
फौजदार पदासाठी 25 टक्के आरक्षणासह विभागीय परीक्षा पुन्हा सुरू, ‘PSI’ होण्याचा मार्ग झाला मोकळा

PSI Departmental Exam : : शासनाने पोलीस उपनिरीक्षक पदासाठीची (Faujdar) खात्यांतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी 2022 मध्ये बंद करण्यात आलेली ही परीक्षा आता पुन्हा सुरू होणार असल्याने मेहनती आणि अनुभवी पोलिस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

या परीक्षेमुळे कमी वयातच PSI पदावर पदोन्नती मिळून पोलीस दलात तरुण आणि ऊर्जावान अधिकारी दीर्घकाळ कार्यरत राहू शकतील. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे हजारो पोलीस कर्मचाऱ्यांचे करिअर नव्या उमेदीने पुढे जाण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी एप्रिल 2025 मध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून पोलीस उपनिरीक्षक (PSI) पदासाठीची खातेअंतर्गत विभागीय परीक्षा पुन्हा सुरू करण्याची मागणी केली होती.

पूर्वी किमान पाच वर्षांची सेवा पूर्ण केलेल्या पोलीस अंमलदारांना PSI पदासाठी 25 टक्के आरक्षणाच्या अंतर्गत विभागीय परीक्षा देता येत होती. या माध्यमातून अनेक मेहनती व अनुभवी पोलीस कर्मचाऱ्यांना अधिकारी होण्याची सुवर्णसंधी मिळत होती. मात्र फेब्रुवारी 2022 च्या शासन निर्णयानुसार ही परीक्षा बंद करण्यात आली होती. या विषयाचा सातत्याने पाठपुरावा करत योगेश कदम यांनी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून परीक्षा पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न केले. अखेर, शासनाने आज अधिकृत निर्णय घेतला आहे.

मनोज जरांगेंवर छत्रपती संभाजीनगरमध्ये उपचार सुरू; प्रकृतीसंदर्भात डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

साधारणपणे पोलीस कॉन्स्टेबलना प्रमोशनद्वारे PSI पद मिळते ते त्यांच्या सेवाकालाच्या शेवटच्या टप्प्यात. अशावेळी त्यांना PSI म्हणून फारतर दोन-तीन वर्षेच काम करता येते. परंतु विभागीय परीक्षेतून PSI झालेल्या अधिकाऱ्यांना कमी वयातच पदोन्नती मिळाल्याने त्यांना पुढील 20 ते 25 वर्षे PSI तसेच त्यापेक्षा वरिष्ठ पदांवर कार्य करण्याची संधी मिळू शकते. यामुळे पोलीस खात्यात नव्या उमेदीचे, तरुण PSI जोश आणि ऊर्जा घेऊन कार्यरत होतील.

या निर्णयामुळे राज्यातील मेहनती, अनुभवी तसंच, तरुण पोलीस अंमलदारांसाठी PSI पदाचा मार्ग पुन्हा खुला झाला आहे. अन्यथा, त्यांना अनेक वर्षे प्रतीक्षा करावी लागली असती. आता विभागीय परीक्षा त्यांच्या करिअरमध्ये प्रगतीसाठी नवे दार उघडेल. राज्य सरकारच्या निर्णयावर प्रतिक्रिया देताना गृहराज्यमंत्री योगेश कदम म्हणाले की, पोलीस दलातील मेहनती, कर्तव्यनिष्ठ आणि तरुण पोलिस अंमलदारांना अधिकारी म्हणून पुढे जाण्याची संधी मिळावी यासाठी हा निर्णय महत्त्वाचा आहे. या शासन निर्णयामुळे पोलीस दलात नवे चैतन्य निर्माण होईल.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

संबंधित बातम्या