भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत; काय म्हणाले सरसंघचालक डॉ. मोहन भागवत?
भारताचा सनातन स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितलेलं आहे की, सगळे आपलेच आहेत.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे काम फारच अनोखे आहे. (RSS) संपूर्ण जगात संघासारखे काम होत नाही. संघाला समाजाला फक्त संघटित करायचं आहे. या व्यतिरिक्त संघाचं दुसरं कोणतंही काम नाही, असं सरसंघचालक डॉ. मोहन भागवत म्हणाले आहेत. ते मुंबईत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी त्यांनी संघाची स्थापना, संघाचं उद्दिष्ट, हिंदू धर्म यावर भाष्य केलं.
अनेक लोक म्हणतात की पंतप्रधान नरेंद्र मोदी हे संघाचे आहेत. परंतु, मोदी यांचा एक पक्ष आहे. हा पक्ष संघापासून वेगळा आहे, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. संघाला दुसऱ्या संस्थांशी स्पर्धा करायची नाही. कोणाचाही विरोध न करता आम्ही आमचं काम करतो. संघाला लोकप्रियता नको आहे. संघाला सत्ता किंवा ताकदही नको आहे. देशाच्या भल्यासाठी जेवढी कामं होत आहेत ती सर्व कामे व्यवस्थित व्हावीत यासाठी संघ काम करतो. संघात व्यवहार होत नाही. आपुलकीच्या भावनेने संघात सगळे काम होते, असंही भागवत यांनी स्पष्ट केलं.
राष्ट्रीय हित ही कोणाची मक्तेदारी नसून ती सामूहिक जबाबदारी, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
भारताचा सनातन स्वभाव कधीच बदलणार नाही. ऋषी-मुनींनी सांगितलेलं आहे की, सगळे आपलेच आहेत. आपल्याला सगळ्यांना सोबत चालायचं आहे. आपल्याला कोणालाही मागं सोडायचं नाही. एकट्याला राहायचं असेल तर कोणत्याही नियमांची गरज नसते. जेव्हापासून सृष्टी आहे तेव्हापासून धर्म आहे, असं मत भागवत यांनी व्यक्त केलं. तसंच, आपण विश्वगुरू होणार आहोत. भारतातील मुस्लीम आण ख्रिश्चन हे भारताचेच आहेत असंही ते म्हणाले.
भारतात चार प्रकारचे हिंदू आहेत. पहिला हिंदू हा अभिमानाने आपण हिंदू असल्याचं सांगतो. दुसरा हिंदू हा मी हिंदू आहे तर मग त्यात काय झालं? यात अभिमानाची बाब काय आहे? असे म्हणतो. तिसरा हिंदू हा स्वत:ला हिंदू म्हणून घ्यायला तयार आहे परंतु तुम्ही मला घरात विचाराल तरच मी हिंदू असल्याचे सांगेन असं म्हणतो. चौथा हिंदू हा आपण हिंदू असल्याचेच विसरून गेला आहे. किंवा तो हिंदू असल्याचे त्याला विसरून जाण्यास भाग पाडण्यात आलं आहे, असंही मत भागवत यांनी व्यक्त केलं.
