नगरपरिषद अन् नगरपंचायतींसाठी मतदान; कुठं बोगस मतदार, तर कुठं मतदान यंत्रच ठप्प
आज नगरपरिषदेसाठी मतदान होत असून मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं.
राज्यातील 23 नगरपरिषदा आणि नगरपंचायतींसह विविध (Election) जिल्ह्यांतील एकूण 143 सदस्यपदांसाठी आज (शनिवार 20 डिसेंबर) मतदान होत आहे. राज्यातील नगरपरिषदा व नगरपंचायतीच्या निवडणुका 2 डिसेंबर रोजी पार पडल्या होत्या, मात्र पैकी 23 नगरपरिषद आणि नगरपंचायतीच्या निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अंबरनाथ, कोपरगाव, देवळाली प्रवरा, पाथर्डी, नेवासा, बारामती, फुरसुंगी-उरुळी देवाची, सोलापूरातील अनगर, मंगळवेढा, साताऱ्यातील महाबळेश्वर, फलटणसह 23 नगरपरिषदांमध्ये आज मतदान होत आहे. थंडीचे दिवस असल्याने सकाळी वातावरणात चांगलाच गारवा पहायला मिळाला, मात्र त्याचा मतदानावर फारसा परिणाम झालेला दिसला नाही. आज सकाळपासून मतदारांचा मोठा उत्साह पहायला मिळत आहे.
मुंबई महापालिकेच्या जागावाटपावरून शिवसेना-भाजपमध्ये कलगीतुरा; 77 जागांवर दोघांकडूनही दावा
मात्र मतदान होत असलेल्या काही ठिकाणी गैरप्रकार झाल्याने मतदानाला गालबोट लागल्याचं दिसून आलं. अंबरनाथच्या कोहोजगाव परिसरात एक खळबळजनक बातमी समोर आली. अंबरनाथमध्ये 208 संशयित मतदारांना पोलिसांनी ताब्यात घेतलं असून त्या सर्वांची आधार कार्ड व पॅन कार्डद्वारे सखोल तपासणी करण्यात आली. हे नागरिक मतदानासाठी आले होते का, कोणासाठी मतदान करणार होते याचीही चौकशी करण्यात आली. संशयित बोगस मतदारांमुळे एकच गोंधळ उडाला. या सगळ्या प्रकारामुळे इथलं वातावरण तापलं होतं.
अंबरनाथ नगर पालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने चौदाशे पोलिसांचा फौज फाटा तैनात करण्यात आला आहे. विशेष म्हणजे ईव्हीएम मशीन प्रकरणात कुठलीही तक्रार नसल्याने या ठिकाणी गुन्हा कुठलाच दाखल नाही. पैसे वाटप संदर्भात देखील पोलिसांकडे कुठली तक्रार आलेली नाही, त्यामुळे अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तर दुसरीकडे यवतमाळमध्ये एका मतदान केंद्रावर EVM मध्ये बिघाड झाल्याचे आढळले. मतदाना केंद्राबाहेर मतदारांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या, मात्र EVM बिघडल्याने मतदान करता येत नसल्याने अनेक मतदार खोळंबले.
कुठे किती झालं मतदान ?
शनिवारी 23 नगरपरिषद आणि नगपंचायतींसाठी मतदान होत असून सकाळी 9.30 पर्यंत कुठे किती मतदान झालं त्याची आकडेवारी समोर आली आहे.
– वाशिम नगरपरिषदेमध्ये सकाळी पहिल्या टप्प्यात साडे नऊ वाजेपर्यंत 6. 53 टक्के मतदान झाले तर रिसोड नगर परिषद मधील 2 प्रभागातील 2 उमेदवारांसाठी 8. 41 टक्के मतदान झालं.
– तर छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सकाळी 7.30 ते 9.30 वाजेपर्यंत एकूण 8.92 टक्के मतदान झालं. फुलंब्री नगरपंचायतसाठी 12.47 टक्के मतदान करण्यात आलं.
– अंबरनाथमध्ये सकाळी 9 वाजेपर्यत 7.58 टक्के मतदान
– भुसावळ, यावल, सावदा येथे दहा वाजेपर्यंत 4.6 % मतदान झालं आहे. मतदान केंद्रावर शांततेने मतदान प्रक्रिया पार पडत आहे.
– चंद्रपूर : घुग्गुस नगर परिषदेसाठी पहिल्या दोन तासात 5.7 % मतदान झालं.
