समितीसाठी भांडले पण, ऐनवेळी नावच गायब; ऊस दर नियंत्रण समितीतून राजू शेट्टींना डच्चू!
![समितीसाठी भांडले पण, ऐनवेळी नावच गायब; ऊस दर नियंत्रण समितीतून राजू शेट्टींना डच्चू! समितीसाठी भांडले पण, ऐनवेळी नावच गायब; ऊस दर नियंत्रण समितीतून राजू शेट्टींना डच्चू!](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/04/Raju-Shetty.jpg)
Sugarcane Price Control Committee :राज्य सरकारने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांना जोरदार दणका दिला आहे. शेतकऱ्यांच्या उसाला भाव मिळावा यासाठी झटणाऱ्या नेत्यांनाच वगळून ऊस दर नियंत्रण समिती स्थापन करण्यात आली आहे. फक्त राजू शेट्टीच नाही तर रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत (Sadabhau Khot), रघुनाथ पाटील यांनाही या समितीतून डच्चू देण्यात आला आहे.
राज्यात मागील वर्षभरापासून ऊस दर नियंत्रण समिती नव्हती. त्यामुळे ही समिती गठीत करण्यासाठी राजू शेट्टी यांनी वेळोवेळी आंदोलने केली होती. सरकारकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. त्यानंतर सरकारने समिती स्थापन केली मात्र या समितीतून शेट्टी यांनाच बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला.
जयंत पाटील पवारांची साथ सोडणार? अजितदादांच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर म्हणाले…
या समितीत सुहास पाटील, सचिनकुमार नलावडे, पृथ्वीराज जाचक, धनंजय भोसले, योगेश बर्डे यांचा समावेश करण्यात आला आहे. साखर कारखान्यांचे प्रतिनिधी म्हणून कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक साखर कारखान्याचे संचालक प्रशांत परिचारक, पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखान्याचे संचालक कैलास तांबे यांचा समावेश आहे.
सरकारने घेतलेल्या या निर्णयावर राजू शेट्टी यांनी सडकून टीका केली आहे. शेट्टी म्हणाले, ऊस दर नियंत्रण समितीसाठी आम्हाला वर्षभर इशारे द्यावे लागले, आंदोलनं करावी लागली. ही समिती नसल्याने मागील वर्षी तुटलेल्या ऊसाला एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याची क्षमता असून सुद्धा एफआरपी देऊन ऊसाचे पैसे अनेक कारखान्यांकडे शिल्लक राहिलेले आहेत.
Ncp Crisis : साहेबांची ‘ही’ गुगली असेल तर 4 वर्षांनी कळेल, दादांच्या आमदाराचं मोठं विधान…
साखरेला भाव आणि इथेनॉलमधून उत्पन्न मिळाले आहे. अशा परिस्थितीत साखर कारखान्यांवर नियंत्रण ठेऊन त्यांचा हिशोब तपासून शेतकऱ्यांचे हक्काचे पैसे मिळवून देण्यासाठी सक्षम ऊस दर नियंत्रण समितीची आवश्यकता होती. पण, दुर्दैवाने कागदी घोडे नाचवून दुबळी समिती केली आहे. या समितीमध्ये विक्रमसिंह, मी स्वतः व्ही. बी. ठोंबरे काम करत होतो मात्र, दुबळी समिती नेमून सरकारने विश्वासघात केला आहे, असा आरोप शेट्टी यांनी केला.
तरीही सदाभाऊंनी केलं अभिनंदन
मी ऊस दर नियंत्रण समितीमध्ये यापूर्वी काम केलं आहे. या समितीमध्ये नेमलेले शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हे चळवळीतून पुढे आले आहेत. सर्व खुर्च्या, पदं आम्हीच सांभाळून ठेवली तर दुसरी पिढी कधी पुढे येणार ? मी शेतकरी वर्गाचे प्रतिनिधीत्व करणाऱ्या सर्वांचे अभिनंदन करतो, असे रयत क्रांती संघटनेचे अध्यक्ष सदाभाऊ खोत म्हणाले.