विहीरीत साखर अन् लिंबू टाकून सरबत जमेल का? आमचं प्रेमाचंच राजकारण; मोहिते पाटलांनी दोन मुद्दे खोडलेच

Dhairyasheel Mohite Patil Interview : ‘आता सोशल मीडियाचा जमाना आहे. साधं गाडीतून खाली उतरलं तरी कॅमेरे चालू होतात. खरंच जर अशी परिस्थिती (दहशतीची) असती तर आम्हाला इतकी मतच पडली नसती.’ ‘आमचं काही दहशतीचं राजकारण नाही तर प्रेमाचं राजकारण आहे. विहीरीत साखर आणि लिंबू पिळून कधी सरबत बनवणं शक्य आहे का? लोकांनी काहीतरी स्टोरी बनवली आणि आम्हाला चिटकून टाकली तीच स्टोरी आजपर्यंत चालत आहे’, अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील (Dhairyasheel Mohite) यांनी दोन महत्वाचे मुद्दे खोडून काढले. मोहिते पाटील घराण्याशी संबंधित कोणते मुद्दे राजकारणात चर्चिले जात होते? त्यात किती तथ्य आहे? याचा खुलासा मोहिते पाटील यांनी केला. लेट्सअप मराठीच्या मुलाखतीत त्यांनी अगदी बेधडकपणे मतं व्यक्त केली.
राजकारणात काही तालेवार घराणी आहेत. मोहिते पाटील यांची फार दहशत आहे. त्यांच्याविरुद्ध बोललेलं चालत नाही. खरच अशी परिस्थिती अकलूज माळशिरसमध्ये आहे का? असा प्रश्न विचारला असता मोहिते पाटील म्हणाले, ‘आता सोशल मीडियाचा जमाना आहे. साधं गाडीतून खाली उतरलं तरी कॅमेरे चालू होतात. खरंच जर अशी परिस्थिती असती तर आम्हाला इतकी मतच पडली नसती. मी वारंवार तेच सांगतोय असं कधी होऊच शकत नाही. आमचं काही दहशतीचं राजकारण नाही तर प्रेमाचं राजकारण आहे. आमच्या आजोबांपासून त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटलांनी जी माणसं कमावली त्या कमावलेल्या माणसांचच आजचं हे फळ आहे.’
Video : खासदार म्हणून एक वर्षात सोलापूर जिल्ह्यासाठी काय केल; मोहिते पाटलांनी यादीच वाचली
विहिरीत साखर अन् लिंबू पिळून सरबत करणं शक्य आहे का ?
विजयसिंह मोहिते पाटलांच्या लग्नात मोहिते पाटील कुटुंबियांनी लक्ष भोजन दिलं होतं. त्यावेळी विहिरीत बर्फ आणि साखर टाकून लिंबू पिळून सरबत बनवण्यात आलं होतं असा दावा केला जातो. याबाबत माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी मोठा खुलासा केला.
‘कसं आहे तो एक चुकीचा गैरसमज होता असं आपण म्हणू या. विहीरीत सरबत करणं शक्य आहे का? साखर टाकणं लिंबू पिळणं शक्य आहे का? पण काहीतरी स्टोरी बनवायची म्हणून लोकांनी बनवली आणि नंतर आम्हाला चिटकवून टाकली. तीच स्टोरी आजपर्यंत चालत आहे. पण आमच्या आजोबांनी सांगितलेली महत्वाची गोष्ट म्हणजे आम्ही ज्यांच्या घरी जेवलो, ज्यांच्या सुखदुःखात सहभागी झालो. त्याची परतफेड करणे गरेजेचे होते. हीच भारतीय संस्कृती आहे जी जपण्याचं काम आम्ही केलं.’
‘रणजितसिंह मोहिते पाटील आणि विजयदादांचं लग्न दोन्ही लग्न सारख्याच पद्धतीने झाली होती. आजोबांनी एकाच दिवशी एक लाख 18 हजार लोकांना जेवण दिलं होतं. त्यावर त्यांच्यावर टीकाही झाली होती. त्यानंतर आठ दिवसांनंतर आजोबांनी पु्ण्यात पत्रकार परिषदेत सांगितलं होतं की खोटं कशाला छापताय मी एक लाख नाही तर एक लाख 18 हजार माणसांना जेवण दिलं होतं. या भागाचा लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्या मतदारांच्या सुखदुःखात सहभागी झालो. त्यांनी त्यांच्या सुखात कायम मला सहभागी करुन घेतलं. आता माझ्या घरातलं पहिलं कार्य आहे. मी सगळ्यांच्या घरी जेवलोय त्यामुळे आता माझ्या घरच्या कार्यात त्यांना सहभागी करुन घेण्याची वेळ माझी आहे.’