जरांगेंनी मराठा समाजात फूट पाडू नये, आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे नको; मराठा समाजातील महिलांची भूमिका
![जरांगेंनी मराठा समाजात फूट पाडू नये, आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे नको; मराठा समाजातील महिलांची भूमिका जरांगेंनी मराठा समाजात फूट पाडू नये, आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे नको; मराठा समाजातील महिलांची भूमिका](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2023/11/Israel-and-Hamas-war-2.png)
Maratha Reservation : मराठा सरसकट कुणबी दाखले (Kunbi documents) मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटलांनी (Manoj Jarange Patil) आमरण उपोषण केलं होतं. मात्र, सरकारच्या शिष्टमंडळाने त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केल्यानं त्यांनी आंदोलन मागे घेतलं. जरांगेंनी सरकारला 2 जानेवारीपर्यंतची मुदत दिली. दरम्यान, सध्या जुनी कागदपत्रे तपासून कुणबी नोंदी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्रे दिली जात आहेत. अशातच आता आम्हाला कुणबी प्रमाणपत्रे नको, अशी भूमिका मराठा समाजातील काही महिलांनी घेतली आहे.
राज्याला सरकार ड्रग्जच्या विळख्या ढकलण्याचं कामं करतंय; पटोलेंचा घणाघात
जरांगे पाटलांनी उपोषण मागे घेतल्यानंतर मुख्यमंत्री एकनाश शिंदेंनी आरक्षण देण्यासाठी सरकार कटिबध्द असल्याचं सांगतिलं होतं. दरम्यान, मुख्यमंत्री शिंदे रविवारी सातारा दौऱ्यावर आले होते. यावेळी त्यांनी दरे गावात जनता दरबार भरवला. या दरबारात अनेक मराठा बांधव तसेच महिलांनी आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडली. यावेळी महिलांनी आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको, मराठा म्हणूनच आरक्षण द्या, अशी मागणी केली. मनोज जरांगे पाटील यांनी कुणबी प्रमाणपत्राची मागणी थांबवावी, त्यांनी विनाकारण, मराठा समाजात विनाकारण फूट पाडू नये, अशी विनंतीही महिलांनी केली.
मराठा समाज सुरुवातीपासूनच मोठ्या भावाची भूमिका बजावत आला आहे. ओबीसी बांधवांच्या तोंडातील घास आम्हाला हिसकावून घ्यायचा नाही. आम्ही 96 कुळी मराठा असून कर्तृत्वावर मोठे होऊ. छत्रपती शिवाजी महाराजांनीही त्यांच्या कर्तृत्वाच्या जोरावर स्वराज्य निर्माण केले होते, असं देखील मराठा समाजातील महिला म्हणाल्या.
मनोज जरांगे यांनी आपले आंदोलन थांबवावे. मराठा आणि ओबीसींमध्ये विनाकारण फूट पाडू नये, त्यांना कुणबी प्रमाणपत्र हवे असेल तर त्यांनी ते विदर्भ आणि मराठवाड्यातील मराठा बांधवांसाठी मागावं. आम्हाला ओबीसीमधून आरक्षण नको, अशी विनंतीही महिलांनी केली.
दरम्यान, या जनता दरबारात स्वत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नागरिकांच्या मागण्या व तक्रारी शांतपणे ऐकून घेतल्या. मराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही अथक प्रयत्न करत असून, न्यायालयात टिकेल ते आरक्षण देऊ, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मराठा बांधवांना दिली.
प्लॅन बी तयार – जरांगे पाटील
काल मनोज जरांगे पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आपला प्लॅन बी तयार असल्याचे सांगितले. आम्हाला दगा फटका होण्याची भीती आहे. आता आरक्षण मिळेपर्यंत शांत राहणार नाही. आंदोलन सुरूच राहणार असल्याचे त्यांनी सांगितलं. येत्या एक तारखेपासून प्रत्येक गावात साखळी उपोषण सुरू होईल, असं जरांगे म्हणाले.