CM शिंदेना ठाण्यातच सापडेना उमेदवार… भाजपच्या गणेश नाईकांच्या हाती ‘धनुष्य-बाण’ देणार?

CM शिंदेना ठाण्यातच सापडेना उमेदवार… भाजपच्या गणेश नाईकांच्या हाती ‘धनुष्य-बाण’ देणार?

ठाणे : जिल्ह्यातील भाजपचे (BJP) बडे नेते गणेश नाईक (Ganesh Naik) शिवसेनेत (ShivSena) परतण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ज्या ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करतात तिथेच त्यांना उमेदवार सापडत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. नाईक यांना शिवसेनेत आणून त्यांचे पुत्र आणि माजी खासदार संजीव नाईक यांना उमेदवारी देण्याबाबत सध्या चर्चा सुरु आहेत. (Ganesh Naik, a big BJP leader in Thane district, is likely to return to Shiv Sena again.)

ठाणे जिल्हा हा शिवसेनेचा बालेकिल्ला समजला जातो. 2009 मध्ये संजीव नाईक हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडून आले होते. तो एक अपवाद वगळता 1996 पासून इथून शिवसेनेचे उमेदवार निवडून आले आहेत. 2014 आणि 2019 या दोन्ही वेळी राजन विचारे धनुष्यबाणावर निवडून आले आहेत. मात्र ते उद्धव ठाकरे यांच्यासोबत असल्याने एकनाथ शिंदे यांना नवा चेहरा शोधायचा आहे. पण विचारे यांना टक्कर देऊ शकेल असा चेहरा शिंदेंकडे ठाण्यात नाही. त्यामुळेच नाईक यांना शिवसेनेत परत आणण्याबाबत चर्चा सुरु असल्याचे बोलले जाते.

Ramdev Baba : दिशाभूल करणाऱ्या जाहिरातींवर रामदेव बाबांनी मागितली माफी, माघार घेत, म्हणाले …

गणेश नाईक हे मूळचे ठाण्यातीलच आहेत. पण त्यांचे राजकारण नवी मुंबईत घडले. शिवसेनेतूनच 1990 साली नाईक पहिल्यांदा आमदार झाले. त्यानंतर 1995 मध्येही त्यांचा विजय झाला. त्यावेळी राज्यात युतीची सत्ता आल्यानंतर नाईक यांच्याकडे पर्यावरण मंत्रीपदाची सूत्रे आली. त्याचवेळी ते ठाण्याचे पालकमंत्रीही झाले. शिवसेनेतून त्यांनी 1999 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. राष्ट्रवादीतून ते 2004 आणि 2009च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झाले. 2014 मध्ये मात्र त्यांचा पराभव झाला.

लवकरच पिक्चर क्लिअर होणार; भाजप नेत्यानं राऊतांना सांगितली ‘मन की बात’

त्यानंतर 2019मध्ये नवी मुंबईतील 48 विद्यमान नगरसेवक आणि 70 माजी नगरसेवकांसह नाईक यांनीही भाजपमध्ये प्रवेश केला. नाईक यांचा 20 वर्षांपासून नवी मुंबई महापालिकेवर होल्ड आहे. नवी मुंबईत आगरी समाजाची मते ही नाईक यांची हक्काची मते समजली जातात. त्याच मतांच्या जोरावर नाईक यांनी नवी मुंबई आणि आजूबाजूच्या भागात आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. आता हेच गणेश नाईक पुन्हा शिवसेनेत येण्याची चिन्हे आहेत.

मुख्यमंत्र्यांनी ‘ठाणे’ राखले :

ठाणे लोकसभा मतदारसंघात भाजपचे चार आणि शिवसेनेचे दोन आमदार आहेत. हे गणित मांडून भाजपने हा मतदारसंघ मिळावा यासाठी जोरदार आग्रह धरला होता. मात्र शिंदे हे ठाण्यातूनच येत असल्याने आपल्याच घरचा मतदारसंघ भाजपसाठी कसा सोडायचा? शिवाय आनंद दिघे यांनी एकेकाळी ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपकडूनच खेचून आणला होता. त्यामुळे आता विद्यमान आमदार जरी सोबत नसले तरी हा मतदारसंघ आपल्याकडे रहावा म्हणून शिंदे यांनी प्रतिष्ठा पणाला लावल्याचे चित्र होते. अखेरीस शिंदे यांनी ठाणे राखल्याचे दिसून येत आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube