महाराष्ट्र, हरियाणा अन् झारखंड.. चार राज्यांत काँग्रेसची हवा? सोनिया गांधींचा दाव्यात किती खरं..

महाराष्ट्र, हरियाणा अन् झारखंड.. चार राज्यांत काँग्रेसची हवा? सोनिया गांधींचा दाव्यात किती खरं..

Congress Party : मागील दहा वर्षांपासून सत्तेतून बाहेर असलेल्या काँग्रेसला २०२४ मधील लोकसभा निवडणुका (Lok Sabha Elections) टॉनिक देणाऱ्या ठरल्या आहेत. लोकसभेच्या ९९ जागा जिंकल्यानंतर काँग्रेसची (Congress Party) नजर आता विधानसभा निवडणुकावर आहे. या निवडणुकांच्या माध्यमातून पक्ष अधिक बळकट होण्याचा प्रयत्न करणार आहे. लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस आता चार राज्यांतील विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) उलटफेर करण्याची तयारी करत आहे. काँग्रेस संसदीय दलाच्या बैठकीत सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांनी तसे संकेत दिले आहेत.

पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी निवडणुकांची तयारी करावी अशा सूचना त्यांनी या बैठकीत दिल्या. देशातील हवा आपल्या बाजूने आहे. जर चार राज्यांतील निवडणुका आपण जिंकल्या तर त्याचा व्यापक राजकीय संदेश जाईल. त्यांच्या या वक्तव्यानंतर देशाच्या राजकारणात नव्याने चर्चा सुरू झाल्या आहेत. विधानसभा निवडणुका असलेल्या महाराष्ट्र, हरियाणा, झारखंड या तीन राज्यांत खरंच तशी परिस्थिती आहे का, या राज्यात राजकीय वातावरण खरंच काँग्रेसच्या बाजूने आहे का.. याचा थोडक्यात आढावा घेऊ या..

महाराष्ट्रात काँग्रेस नंबर वन

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला महाराष्ट्रात मोठा (Maharashtra Elections) विजय मिळाला. जागांच्या बाबतीत विचार केला तर राज्यात काँग्रेसला सर्वाधिक १३ जागा मिळाल्या आहेत. तसेच महाविकास आघाडीतील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला (Uddhav Thckeray) ९ तर शरद पवार यांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादी काँग्रेसला ८ जागा मिळाल्या आहेत. काँग्रेसला एका अपक्ष खासदाराचाही पाठिंबा आहे. दुसरीकडे भाजपला फक्त ९ जागा जिंकता आल्या आहेत. शिंदे गटाला ७ तर अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त १ जागा जिंकता आली.

संसदेत अनुराग ठाकूर यांनी काढली जात अन् राहुल गांधी भडकले, म्हणाले, माझ्यावर …

विधानसभा मतदारसंघनिहाय विचार केला तर काँग्रेस ६३, शिवसेना (ठाकरे गट) ५७, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) ३४ मतदारसंघात आघाडी मिळाली आहे. तिन्ही पक्षांची बेरीज केली तर हा आकडा १५४ असा होतो. हा आकडा बहुमताच्या संख्येपेक्षा जास्त आहे. सरकार स्थापन करण्यासाठी १४५ हा बहुमताचा आकडा आहे. काँग्रेसने या लोकसभा निवडणुकीत विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात शानदार कामगिरी केली आहे. या दोन्ही ठिकाणच्या १४ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत.

हरियाणात कांटे की टक्कर

राजधानी दिल्ली शेजारील हरियाणात या वर्षात (Haryana Elections) विधानसभा निवडणुका होणार आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत यंदा काँग्रेसची स्थिती बळकट दिसत आहे. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला राज्यातील दहा पैकी पाच जागांवर विजय मिळाला. भाजपला पाच जागा (BJP) मिळाल्या. राज्यातील ९० विधानसभा मतदारसंघांपैकी ४२ मतदारसंघात काँग्रेसला तर ४४ मतदारसंघात भाजपला आघाडी मिळाली आहे. या निवडणुकीत दलित आणि जाट मतदार काँग्रेसच्या मागे उभा राहिला. सर्वे एजन्सी सीएसडीएसनुसार काँग्रेसला जाट समाजाचे ६४ टक्के मते मिळाली आहेत. मागील निवडणुकीच्या तुलनेत ३१ टक्के जास्त आहेत.

दलित समाजाची ६८ टक्के मते काँग्रेसला मिळाली आहेत. २०१९ मधील लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत ४० टक्के मते जास्त मिळाली आहेत. पक्षाला गैर जाट ओबीसींचे ५१ टक्के आणि सवर्णांची ३० टक्के मते मिळाली. हरियाणात जाट लोकसंख्या २२ टक्के आहे. दलित समाजही २१ टक्के आहे. यादव अहिर ७ टक्के आणि पाच टक्के गुर्जरही किंगमेकरच्या भूमिकेत आहेत. राज्यात सवर्ण समाजाची लोकसंख्या ११ ते १३ टक्क्यांदरम्यान आहे.

राहुल गांधींना झटका! वादग्रस्त भाषणातील ‘त्या’ चार शब्दांना अखेर कात्री

झारखंडमध्ये काँग्रेसची परिस्थिती काय

लोकसभा निवडणुकीत झारखंड राज्यातही काँग्रेसची (Jharkhand Elections) स्थिती सुधारली आहे. २०१९ मध्ये पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती. यावेळी मात्र दोन जागा जिंकता आल्या. काँग्रेस उमेदवार कालीचरण मुंडा यांनी खुंटी मतदारसंघात केंद्रीय मंत्री अर्जुन मुंडा यांचा (Arjun Munda) पराभव केला. २०१९ च्या तुलनेत काँग्रेस पक्षाची मते सुद्धा तीन टक्क्यांनी वाढली आहेत. या यशाच्या जोरावरच काँग्रेस राज्यात विधानसभा निवडणुकीची तयारी करत आहे. झारखंड मुक्ती मोर्चा, माले आणि राजद बरोबर आघाडी करून निवडणूक लढण्याचा काँग्रेसचा प्लॅन आहे.

जम्मू काश्मीरमध्ये अंतर कमी

महाराष्ट्र, हरियाणाबरोबरच जम्मू काश्मीर राज्याच्याही (Jammu Kashmir) निवडणुका होतील अशी शक्यता काँग्रेसला वाटत आहे. मागील पाच वर्षांपासून काश्मीरमध्ये विधानसभा बरखास्त आहे. परिसिमन झाल्यानंतर यंदा राज्यात लोकसभा निवडणुका झाल्या. काँग्रेसने जोरदार टक्कर देण्यात यश मिळवलं आहे. उधमपूर मतदारसंघात २०१९ मध्ये काँग्रेस उमेदवाराचा ३.५७ लाख मतांनी पराभव झाला होता. यावेळी हे अंतर कमी होऊन १.२४ लाखांवर आले आहे. याच पद्धतीने जम्मू मतदारसंघात मागील निवडणुकीत काँग्रेस उमेदवार तीन लाख मतांनी पराभूत झाला होता. यावेळी मात्र मतांच अंतर १.३५ लाख राहिलं आहे. या दोन्ही लोकसभा मतदारसंघाच्या अंतर्गत ३६ विधानसभा मतदारसंघ येतात.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube