हवामान विभागाच्या इशाऱ्याने वाढली चिंता; उष्णतेची लाट येणार

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

News Photo   2026 05 12T170531.073

गेल्या काही दिवसांत अवकाळी पाऊस (Temperature) झाला असला तरी आता पुन्हा एकदा चिंता वाढवणारी बातमी समोर आली आहे. राज्यात पुन्हा एकदा उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे. नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ प्रवीण कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार विदर्भात पुढील काही दिवसांमध्ये 2 ते 3 अंशांनी तापमानात वाढ होण्याची शक्यता आहे.

याच पार्श्वभूमीवर अकोला, अमरावती आणि वर्धा जिल्ह्यांना उष्णतेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. अकोला जिल्ह्यात सोमवारी 45 अंश सेल्सियस तापमानाची नोंद झाली आहे. विदर्भातील इतरही जिल्ह्याच्या तापमानात वाढ होण्याचा अंदाज आहे. विदर्भात मे महिन्यात तापमान 44 ते 46 अंशांपर्यंत नोंद होणं हे सामान्य आहे. राजस्थान, गुजरातच्या क्षेत्रात प्रति चक्रावत स्थितीमुळे विदर्भात कोरडी व उष्ण हवा वाहत असल्याने उष्णतेत वाढ झाली आहे, असं प्रवीण कुमार यांनी म्हटलं आहे.

लातूर जिल्ह्यात उष्माघाताचा चौथा बळी; अकोल्यात सर्वाधिक 47 अंश तापमान

धुळे जिल्ह्याच्या तापमानाचा पारा 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. गेल्या आठवड्याच्या तुलनेमध्ये यावेळी हे तापमान चार अंशाने वाढलं आहे, त्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं असून कृषी उत्पन्न बाजार समितीकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. त्याचा आर्थिक पटका कृषी उत्पन्न बाजार समितीला बसत आहे. नाशिक शहरात दोन वर्षानंतर पहिल्यांदाच कमाल तापमानाने 42 अंशांचा टप्पा गाठला आहे. नाशिक शहरातील तापमान 40 शी पार गेले असून, आज शहरात तापमान 41 अंश सेल्सिअस इतके नोंदवण्यात आले आहे.

नाशिकमध्ये या हंगामातील सर्वाधिक तापमानाची नोंद झाली आहे. दरम्यान हवामान खात्याकडून बुधवारपर्यंत नाशिकमध्ये उष्णतेच्या लाटेचा यलो अलर्ट देण्यात आला आहे. तीव्र उन्हाच्या झळा आणि रात्री होणाऱ्या असाह्य उकाड्याने नाशिककर हैराण झाले आहेत. शहरातील उष्णतेची लाट पुढील दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे. नंदुरबार जिल्ह्यात उष्णतेचा कहर दिवसेंदिवस वाढत असून, तापमानाचा पारा तब्बल 45 अंशांच्या आसपास पोहोचत आहे.

वाढत्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. अत्यावश्यक कामांशिवाय घराबाहेर पडू नये, त्यासोबत दुपारी 11 ते 3 या वेळेत उन्हात जाणं टाळावं, असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांकडून करण्यात आलं आहे. उष्माघात आणि डिहायड्रेशन टाळण्यासाठी अधिक प्रमाणात पाणी, ओआरएस आणि लिंबूपाण्याचे सेवन करण्याचा सल्लाही प्रशासनाकडून देण्यात आला आहे. तसंच या सर्व पार्श्वभूमीवर जिल्ह्यात नगरपालिका आणि ग्रामपंचायतींमध्ये देखील उष्माघात कक्षाची स्थापना करण्यात येणार आहे.

follow us