‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार
![‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार ‘सूरत’, ‘इंदूर’नंतर ‘पुरी’तही काँग्रेसवर नामुष्की; पैसे नाहीत म्हणून उमेदवाराची माघार](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/04/congress-1.jpg)
Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीत दोन टप्प्यातील मतदान झालं आहे. पण विरोधी पक्षांच्या आघाडीतील सर्वात मोठा पक्ष काँग्रेसला बसत असलेले धक्के काही थांबलेले नाहीत. सूरत आणि इंदूरनंतर ओडिशात सर्वाधिक चर्चेत असलेल्या पुरी या मतदारसंघात काँग्रेसला धक्का बसला आहे. या मतदारसंघातील काँग्रेस उमेदवार सुचारिता मोहंती यांनी निवडणूक लढण्यास नकार दिला आहे. याआधी सूरत आणि इंदूरमध्ये काँग्रेस उमेदवारांनी निवडणूक लढण्यास नकार दिला होता. सूरतमध्ये तर भाजप उमेदवाराला विजयी घोषित करण्यात आले.
काँग्रेसने या मतदारसंघातून मोहंती यांना तिकीट दिले होते. परंतु, आता मोहंती यांनी उमेदवारी मागे घेतली आहे. त्यांच्या या निर्णयामुळे भाजपाच्या अडचणी कमी होणार आहेत. भाजपने या मतदारसंघात संबित पात्रा यांना उमेदवारी दिली आहे. संबित पात्रा विविध न्यूज चॅनेल्सच्या चर्चासत्रात भाग घेऊन पक्षाची बाजू जोरकसपणे मांडत असतात. आता काँग्रेस उमेदवाराने माघार घेतल्याने पात्रांच्याही अडचणी कमी होतील.
शिंदेंच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंचा फोन, मला CM पदाची ऑफर; फडणवीसांचा गौप्यस्फोट
पक्ष मला निधी देऊ शकला नाही म्हणून मी तिकीट परत केलं आहे. सात मतदारसंघात काही ठिकाणी विजयी उमेदवारांना तिकीट नाकारलं. कमकुवत उमेदवारांना संधी दिली. अशा परिस्थितीत प्रचार करणंही मला शक्य वाटत नाही. पक्षाकडून मला कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. पक्षाकडून निधी मिळू शकत नाही तेव्हा मग मलाच निधी उभारायला सांगितलं गेलं, असे सुचारिता मोहंती यांनी स्पष्ट केलं.
या निर्णयाची माहिती देण्यासाठी मोहंती यांनी काँग्रेस महासचिव केसी वेणुगोपाल यांना पत्रही पाठवले. यात त्यांनी उमेदवारी माघारी घेण्याची काय कारणं आहेत त्याचा खुलासा केला. मोहंती यांनी अर्ज मागे घेतल्याने काँग्रेसची मोठी फजिती झाली आहे. या मतदासंघात 25 मे रोजी मतदान होणार आहे. भाजपने या मतदारसंघात डॉ. संबित पात्रा यांना तिकीट दिलं आहे.
Congress Manifesto : महिलांना वार्षिक 1 लाख, 30 लाख नोकऱ्या; काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय काय?