पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छांना उत्तर देण्यात व्यस्त; दहशतवादी हल्ल्यांवरून राहुल गांधींची टीका

पंतप्रधान नरेंद्र मोदी शुभेच्छांना उत्तर देण्यात व्यस्त; दहशतवादी हल्ल्यांवरून राहुल गांधींची टीका

Rahul Gandhi : पंतप्रधान नरेंद्र मोदींचं एनडीए सरकार सत्तेवर आल्यानंतर तीन दिवसांपासून तीन दहशतवादी हल्ले भारतावर झाले आहेत. या हल्ल्यांमध्ये अनेकांचा मृत्यू झाला आहे. (Rahul Gandhi) मात्र, पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांनी यावर काही भाष्य केलं नाही अशी टीका काँग्रेसचे राष्ट्रीय नेते राहुल गांधी यांनी केली आहे. त्यांनी एक्स (ट्वीट)वर पोस्ट करत ही टीका केली आहे. तसंच, येणाऱ्या शुभेच्छांना उत्तर देण्यात मोदी (Modi) व्यस्त आहेत असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

देश उत्तरं मागतोय  जम्मू काश्मीरमधील डोडामध्ये लष्कराच्या तळावर गोळीबार; 1 दहशतवादी ठार, तीन दिवसांत तिसरी घटना

पंतप्रधान नरेंद्र मोदींना जम्मू-काश्मीरमध्ये निर्घृणपणे मारल्या गेलेल्या भाविकांच्या कुटुंबीयांच्या किंकाळ्याही ऐकू येत नाहीत. रियासी, कठुआ आणि डोडा येथे गेल्या ३ दिवसांत ३ वेगळ्या दहशतवादी घटना घडल्या आहेत पण पंतप्रधान अजूनही उत्सवात मग्न आहेत, असं राहुल गांधी म्हणाले आहेत. ते पुढे म्हणाले, देश उत्तरं मागतोय. भाजपा सरकारमध्ये दहशतवादी हल्ल्यांची योजना आखणाऱ्यांना का पकडले जात नाही? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे.

दहशतवाद्यांनी गोळीबार केला

जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांपूर्वी रियासी जिल्ह्यात भाविकांच्या बसवर दहशतवाद्यांनी हल्ला केल्याची घटना घडली. दहशतवाद्यांनी भाविकांच्या एका बसवर हल्ला केला होता. यानंतर बस चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस दरीत कोसळली. या घटनेत 10 जणांचा मृत्यू झाला होता. तर, 33 जण जखमी झाले होते. मंगळवारी, जम्मूच्या कठुआ जिल्ह्यातील इंटरनॅनल बॉर्डरजवळ सैदा सुखल गावात दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. या गोळीबारात स्थानिक नागरिक जखमी झाले होते. या दहशतवाद्यांनी गावातील काही घरांमध्ये पाणी मागितलं. अज्ञात लोकांना पाहून गावकरी घाबरले होते. त्यामुळे त्यांनी गोंधळ घातला. त्यामुळे दहशतवाद्यांनी गोळीबार केला.

चौक्यांवरही विशेष नजर

आज जम्मू काश्मीरच्या डोडा जिल्ह्यातील लष्कराच्या तात्पुरत्या परिचालन तळावर (टीओबी) दहशतवाद्यांनी गोळीबार केला. यामध्ये 3 जवान जखमी झाल्याची माहिती सांगण्यात येत आहे. तर, अद्यापही डोडामध्ये चकमक सुरू असून काही ठिकाणी दहशतवादी लपल्याचा संशय लष्कराला असून त्या पार्श्वभूमीवर शोधमोहिम सुरु आहे. दरम्यान, गेल्या तीन दिवसांमध्ये तीन ठिकाणी दहशतवादी हल्ले झाल्याच्या घटना समोर आल्यामुळे आता जम्मू काश्मीरसह सीमांवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. तसंच, पोलिसांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याबरोबरोच आंतरराष्ट्रीय सीमा, महामार्ग आणि पंजाब आणि हिमाचलच्या सीमेवरील चौक्यांवरही विशेष नजर ठेवण्यात आली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज