…तर मी माझे शब्द मागे घेतो; वारीबाबत केलेल्या वक्तव्यावर अबू आझमींचा माफीनामा!

…तर मी माझे शब्द मागे घेतो; वारीबाबत केलेल्या वक्तव्यावर अबू आझमींचा माफीनामा!

Mla Abu Aazami : आषाढी वारीनिमित्त राज्यभरातून पंढरपुरला दिंड्या रवाना होत आहेत. अशातच आषाढी वारीबाबत सोलापुरात समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (Mla Abu Aazami) यांनी एक विधान केलं. या विधानानंतर राजकीय वर्तुळातून ते टीकेचे धनी झाल्याचे दिसून आले. वारीमुळे रस्ता जाम होतो, त्यावर एकही मुस्लिम व्यक्त तक्रार करीत नाही, असं विधान आझमींनी केलं होतं. त्यानंतर आता आझमी यांनी माफीनामा जाहीर केलायं. वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर माझे शब्द मागे घेतो, माफी मागतो, असं ट्विट अबू आझमींनी केलंय.

काय म्हणाले अबू आझमी?
मी सोलापुरात केलेल्या एका टिप्पणीच्या गैरसमजाबाबत स्पष्ट करतो की, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलायं, वारकऱ्यांच्या धार्मिक भावना दुखावल्या असतील तर मी माझे शब्द मागे घेतो, माफी मागतो. माझा हेतू कधीही कोणाच्याही धार्मिक भावना दुखावण्याचा नव्हता. मी ए निष्ठावंत समाजवादी आहे. नेहमीच प्रत्येक धर्म, संस्कृती, परंपरेचा आदर करतो. वारीच्या परंपरेचं पालन करणाऱ्या सर्व वारकरी बांधवांना मी मनापासून शुभेच्छा देतो, त्यांच्याबद्दल आदर व्यक्त करीत असल्याचं अबू आझमींनी म्हटलंय.

तसेच ही परंपरा महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचा एक अभिमानास्पद भाग आहे, ज्याचा मी वैयक्तिकरित्या आदर करतो. मी वारी पालखीचा उल्लेख फक्त मुस्लिम समुदायाविरुद्ध होणाऱ्या भेदभावाच्या आणि त्यांच्या हक्कांच्या संदर्भात केला होता. ती कोणत्याही प्रकारची तुलना नव्हती आणि माझा हेतू आणि माझी मागणी कोणत्याही प्रकारे अयोग्य नव्हती. माझा एकमेव उद्देश सरकारचं लक्ष वेधण्याचा होता. त्यांच्या दुटप्पीपणामुळे अल्पसंख्याक समुदायाच्या मनात अशी भावना निर्माण होऊ नये की या देशात त्यांच्यासाठी वेगळे कायदे आहेत. आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः सबका साथ, सबका विकास आणि सबका विश्वास म्हणतात. आम्ही उपेक्षित समाजाच्या हक्कांसाठी आदरासाठी आणि समानतेसाठी जोरदार लढत राहू, परंतु देशाच्या एकतेशी कधीही तडजोड होऊ देणार नसल्याचं अबू आझमी यांनी स्पष्ट केलंय.

वारीबद्दल नेमकं काय म्हणाले होते अबू आझमी?
पालखी सोहळ्यामुळे रस्ता जाम होतो. रस्त्यावर हिंदूंचे इतर अनेक सण, उत्सव साजरे होतात. त्याबाबत कोणतीही मुस्लीम व्यक्ती वा संघटना अजिबात आक्षेप घेत नाही. उलट, स्वागत करते. परंतु दुसरीकडे ईद सणात किंवा शुक्रवारी रस्त्यावर एका बाजूने दहा मिनिटांसाठी सामूहिक नमाज पठण केल्यावर त्याविरोधात काहूर माजविला जातो. त्या विरुद्ध प्रतिक्रिया म्हणून रस्त्यावर महाआरती केली जाते, असं अबू आझमी सोलापुरात म्हणाले होते.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube