बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार?
![बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार? बारामतीत मतदानाचा टक्का चंद्रकांतदादांमुळे कमी झाला; दोन दादांमधील वाद पुन्हा वाढणार?](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/05/letsupp-image-57.jpg)
पुणे : बारामतीत मंगळवारी (दि.7) पार पडलेल्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झाले. त्यानंतर आता एका वेगळ्याच विधानाची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. हे विधान दुसऱ्या तिसऱ्या व्यक्तीचे नसून अजित पवारांचे (Ajit Pawar) आहे. बारामतीत कमी झालेला मतदानाचा टक्का हा चंद्रकांत पाटलांनी (Chandrakant Patil) केलेल्या विधानामुळे झाला आहे. याबाबत मला कुणी विचारले तर, चंद्रकांतदादांमुळे ही परिस्थीती ओढावलल्याची तक्रार थेट मोदी, शाहंकडे करणार असल्याचेही अजितदादांनी म्हटले आहे. अजितदादांच्या या भूमिकेमुळे पुन्हा एकदा दोन्ही दादांमध्ये वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. महायुतीच्या बैठकीत अजित पवार हे विधान केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. (Due To Chandrakant Patil Statement Low Voting In Baramati Lok-Sabha)
मतदानानंतर सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी; फडणवीस म्हणतात, निवडणुकीत ‘इमोश्नल टॅक्टिक्स’
चंद्रकांत पाटील बारामतीत नेमकं काय म्हणाले होते?
लोकसभा निवडणुकांचं बिगुल वाजल्यानंतर महायुतीकडून बारामतीत बैठकांचा धडाका लावला होता. त्यात एका बैठकीदरम्यान चंद्रकांतदादांनी बारामतीमधून शरद पवारांना संपवणार असल्याचे विधान केले होते. शिवाय बारामतीमधून शरद पवार आणि त्यांचे राजकारण भाजपला संपवायचे असल्याचेही ते म्हणाले होते. त्यांच्या या विधानानंतर विरोधकांकडून महायुतीच्या नेत्यांसह भाजप नेत्यांवर जोरदार टीका केली होती.
प्रादेशिक पक्षांना काँग्रेस हाच पर्याय; शरद पवारांच्या भाकीतावर नाना पटोलेंचं मोठं विधान
तुम्ही बारामतीत येऊ नका
शरद पवार यांचा पराभव करणे, हेच आमचे उद्दिष्ट आहे, हे चंद्रकांत पाटील यांनी केलेलं विधान चुकीचं होतं. त्यांची चूक झाली, हे मी मान्य करतो असेही अजितदादा म्हणाले. त्यांच्या याविधानंनंतर आम्ही त्यांना सांगितलं, तुम्ही बारामतीत येऊ नका, आम्ही पाहतो. तेव्हापासून दादांनी कोणतेही विधान केलेले नसल्या्चे अजित पवार यांनी स्पष्ट केले. पवार निवडणुकीलाच उभेच नाहीत मग त्यांचा पराभव कसा होईल, सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवार निवडणुकीला उभ्या आहेत, पराभव होणार तो या दोघींपैकी एकीचा, मग पवारांच्या पराभवाचा प्रश्न येतोच कुठे असेही अजितदादा म्हणाले.
मोदींकडून पवारांचा ‘भटकती आत्मा’ उल्लेख
पुण्यात नुकत्याच पार पडलेल्या महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारसभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शरद पवारांचा उल्लेख ‘भटकती आत्मा’, असा केला. त्यांच्या या विधानावरूनही राजकीय वातावरण तापले होते. याचादेखील परिणाम बारामतीत मतदानाचा टक्का कमी होण्यामागे असल्याची चर्चा आहे. मोदींच्या या वक्तव्यावर अजितदादांनी सावध प्रतिक्रिया दिली होती. ते म्हणाले की, मोदी नेमके कुणाला उद्देशून ‘भटकती आत्मा’ बोलले, याबाबत मला कल्पना नसून पुढच्या सभेत त्यांना याबाबत विचारणा करेल असे सांगत सावध भूमिका घेतली होती.
अजितदादांचे विधान गंमतीने
चंद्रकांतदादांबद्दल केलेल्या विधानाची एकीकडे राजकीय वर्तुळात चर्चा असतानाच आणि बारामतीतील कमी मतदानामुळे वातावरण तापलेले असतानाच अजितदादांनी थेट तक्रारीचा फास आवळल्याने वातावरण तापण्याची शक्यता असून, अजितदादांनी केलेले विधान गंमतीने केल्याचे बैठकीला उपस्थित असलेल्या काही नेत्यांचे म्हणणे आहे. तर, अजितदादांचा स्वर थट्टेचा असला तरी यानिमित्ताने त्यांनी मनातील खदखद बोलून दाखवल्याचे, काहीजणांचे मत आहे.