‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख, आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही’; अजितदादांचा संताप

‘तो’ व्हिडिओ व्हायरल करणारे मूर्ख, आम्ही रुबाब दाखवणारी माणसं नाही’; अजितदादांचा संताप

Ajit Pawar : ‘ज्यांनी तो व्हिडिओ व्हायरल केला ते मुर्ख आहेत. त्यांच्या बुद्धीची मला कीव येते. त्या दिवशी पंतप्रधानांचा दौरा होता. कुणी कोणत्या वाहनांत बसायचं याचीही तपासणी होत असते. एकनाथ शिंदे ड्रायव्हर होतात. मागे मी, चंद्रशेखर बावनकुळे, देवेंद्र फडणवीस होते. परंतु, आमचे सहकारी मंत्री गिरीश महाजन यांना तेथे गाडी राहिली नाही. तर मीच त्यांना म्हटलं या. थोड्याच अंतरावर जायचंय पटकन जाऊ. आम्ही काय रुबाब दाखवणारी माणसं नाहीत. मी दाटीवाटीने, गर्दीने सगळ्यांना सोबत घेऊन जाणारी माणसं आहोत. त्यामुळे मला त्या गोष्टीला फार महत्व द्यावं असं आजिबात वाटत नाही, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या मंत्र्यांच्या दाटीवाटीच्या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिली.

Sharad Pawar अन् अजित पवार आज एका व्यासपीठावर; अजितदादा पुन्हा एकत्र येणं टाळणार?

मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या नारी निर्धार मेळाव्यास अजित पवार यांनी हजेरी लावली. या मेळाव्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी पत्रकारांनी त्यांना सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओबाबत प्रश्न विचारला. त्यावर अजित पवार यांनी संताप व्यक्त केला. ते पुढे म्हणाले, आज जे कुणी तो व्हिडिओ व्हायरल करत आहेत, क्लिप फिरवत आहेत मला त्यांची कीव येते. विकासाच बोला ना. गाडीत बसणाऱ्यांना त्रास होईल बाकीच्यांना त्रास होण्याचं काय कारण. आम्ही चौघं दाटीवाटीनं बसलो. गर्दीचा त्रास आम्हाला होईल की नाही हे आमचं आम्ही ठरवू ना. आमच्या काही जवळच्याच लोकांनी ते काम मनावर घेतलंंय त्यांना आमच्या शुभेच्छा असा टोला अजित पवार यांनी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांना लगावला.

‘नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’ अंधारेंचा खोचक टोला

दरम्यान, ठाकरे गटाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांनीही हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत शिंदे गटावर खोचक टोलेबाजी केली होती. ‘जर नसती केली सुरत-गुवाहाटी तर कशाला झाली असती दाटीवाटी’ असं कॅप्शन देत सुषमा अंधारे यांनी सत्ताधाऱ्यांवर निशाणा साधला होता. या व्हिडिओनुसार एकाच गाडीत शिंदे-फडणवीस-पवार दाटीवाटीने बसल्याचं समोर आलं होतं.

शिवसेनेत बंड केल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार सुरत-गुवाहाटीला रवाना झाले होते. त्याचवेळी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थकांसह भाजपसोबत जात असल्याचा नारा दिला होता. यादरम्यान, ठाकरे गटाकडून बंडखोर आमदारांकडे बंड न करण्याबाबत विनवणी करण्यात आल्याचंही पाहायला मिळालं होतं. मात्र, उद्धव ठाकरे यांना न जुमानता एकनाथ शिंदे गटाने भाजपसोबत हातमिळवणी करत राज्यात सत्ता स्थापन केली.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube