अजितदादा-शिवाजीराव कर्डिलेंची मुंबईत खलबतं : राहुरीच्या प्राजक्त तनपुरेंसाठी धोक्याची घंटा…

अजितदादा-शिवाजीराव कर्डिलेंची मुंबईत खलबतं : राहुरीच्या प्राजक्त तनपुरेंसाठी धोक्याची घंटा…

अहमदनगर : नगरी राजकारणाचा झटका कसा असतो, याचा अंदाज प्रवरेच्या माजी खासदार सुजय विखे पाटील (Sujay Vikhe Patil) यांना नुकताच आला. आता याच नगरी राजकारणाचा पुढचा अंक विधानसभा निवडणुकीत बघायला मिळणार आहे. माजी मंत्री शिवाजीराव कर्डिले (Shivajirao Kardile) यांनी मुंबईत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांची नुकतीच भेट घेतली. या भेटीनंतर दुसऱ्या अंकाचा ट्रेलरही बघायला मिळाला आहे. कर्डिले आणि अजितदादांमध्ये नेमकी काय चर्चा झाली? राहुरीची जागा राष्ट्रवादीला जाणार का? कर्डिले राष्ट्रवादीत जाणार आहेत का? असे अनेक सवाल विचारले जात आहेत. जाणून घेऊ नेमके कर्डिले यांच्या मनात काय आहे? (Former Minister Shivajirao Kardile recently met Deputy Chief Minister Ajit Pawar in Mumbai.)

लोकसभा निवडणुकीत अनेक मतदारसंघांमध्ये जागा वाटप शेवटपर्यंत ताणले गेले. त्याचा फटका महायुतीच्या उमेदवारांना बसला. यातून सावत आता महायुतीने विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तातडीने पाऊल उचलायला सुरुवात केली आहे. राहुरी मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाकडून पुन्हा एकदा विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे हेच उमेदवार असतील हे स्पष्ट आहे. गतवेळी त्यांनी कर्डिले यांचा पराभव केला होता. महायुतीमध्ये ही जागा भाजपकडे असून इथे पुन्हा एकदा शिवाजीराव कर्डिले हेच उमेदवार असतील अशी चर्चा आहे.

चंद्राबाबू चौथ्यांदा आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री; आज शपथविधी होणार, पंतप्रधान मोदींची उपस्थिती

मात्र अजित पवार यांनी महायुतीमध्ये विधानसभेला 80 जागांची मागणी केली आहे. यात अजित पवार यांनी ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार हे विजयी झाले आहे त्या त्या जागांची मागणी केली आहे. यात राहुरीमध्ये प्राजक्त तनपुरे हे राष्ट्रवादीचे आमदार असल्याने हा मतदारसंघ अजित पवार यांच्या पक्षाला जाण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्डिले आणि अजितदादांची भेट असल्याचे बोलले जाते. कर्डिले यांनीही आपल्या पराभवाचा बदला घेण्याची तयारी सुरु केली आहे. त्यामुळळे आता कर्डिले राष्ट्रवादीत येणार का? तेच उमेदवार असणार का? अशा चर्चांना सुरुवात झाली आहे.

कर्डिले यांचा बॅक अप प्लॅन :

नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत राहुरी मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील यांना आघाडी मिळवून देण्याची जबाबदारी शिवाजीराव कर्डिले यांच्यावर होती. इथे विखेंना 10 हजारांचे मताधिक्य मिळाले देखील. पण ते निर्णायक ठरले नाही. त्यामुळे तनपुरे यांच्यासाठी विधानसभेला अनुकूल वातावरण राहू शकते. त्यामुळे कर्डिले यांनी सेफ मतदारसंघ म्हणून श्रीगोंद्याच्या पर्यायावर तयारी सुरु केली आहे. श्रीगोंद्याची जागा ही भाजपकडे आहे. या ठिकाणी बबनराव पाचपुते हे विद्यमान आमदार आहेत. पण प्रकृतीच्या कारणास्तव बबनराव पाचपुते लढवणार नाहीत अशी शक्यता वर्तवली जात आहे. यामुळे या ठिकाणाहून कर्डिले यांना संधी मिळू शकते. त्यांनी इथे जनसंपर्क देखील वाढवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाचे ‘नीट’बाबत अहवाल देण्याचे निर्देश; परीक्षा आणि समुपदेशन रद्द नाही

श्रीगोंद्यात इतरही नेते गुडघ्याला बाशिंग बांधून :

श्रीगोंद्यात बबनराव पाचपुते यांचा मुलगा विक्रमसिंह पाचपुते किंवा पत्नी प्रतिभा पाचपुते यांनी उमेदवारीसाठी आग्रह धरला आहे. याशिवाय राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून अनुराधा नागवडे यांनी देखील जोरदार तयारी सुरू केली आहे. विधानसभेसाठी अजितदादांनी आपल्याला शब्द दिल्याचे त्या सांगत आहेत. दुसरीकडे महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) गटाकडून राहुल जगताप, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून साजन पाचपुते आणि काँग्रेसकडून घनश्याम शेलार हे देखील इच्छुकांच्या यादीत आहे. त्यामुळे येत्या काळात श्रीगोंदामध्ये मोठा राजकीय संघर्ष पाहायला मिळणार हे नक्की आहे.

काहीच नाही झाले तर कर्डिले अपक्ष उतरणार?

राहुरीची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला सुटली तर कर्डिले अजितदादांकडे जाणार का? अजितदादा इथे कर्डिले यांचा विचार करणार का? की इथे नवीन उमेदवार देणार? जर श्रीगोंद्यात भाजपकडून पुन्हा एकदा पाचपुते यांना संधी देण्यात आली तर? कर्डिले यांना श्रीगोंद्यात भाजपकडून उमेदवारी मिळाली नाही तर काय? या सगळ्याचा विचार करुन कर्डिले अपक्ष निवडणूक लढविण्याच्याही तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. कारण कोणालाच बहुमत मिळाले नाही तर अपक्ष आमदाराचे महत्त्व काय असते हे कर्डिले यांना चांगलेच ठाऊक आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज