‘त्या’ शासन निर्णयांची होळी करणार, समित्यांना श्रद्धांजली वाहणार; वंचित सुरू करणार आंदोलन

‘त्या’ शासन निर्णयांची होळी करणार, समित्यांना श्रद्धांजली वाहणार; वंचित सुरू करणार आंदोलन

सामाजिक, राजकीय आंदोलनांदरम्यान कार्यकर्त्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेण्यासाठी वंचित बहुजन युवा आघाडी आक्रमक झाली आहे. 1998 पासून अनेक जीआर काढले, वेळोवेळी त्यात सुधारणा केल्या. कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यासाठी समित्याही नेमल्या गेल्या तरी देखील एकाही सरकारने गुन्हे मागे घेतलेले नाहीत. सरकारच्या या कारभाराचा निषेध करण्यासाठी जिल्हा पातळीवर शासन निर्णयांची होळी केली जाणार आहे. तसेच समित्यांना कछवा छाप अगरबत्ती देऊन त्यांना एक फुलचक्र देऊन श्रद्धांजली वाहण्याचा कार्यक्रम केला जाणार आहे, अशी माहिती वंचित बहुजन युवा आघाडीचे नेते सुजात आंबेडकर यांनी दिली.

मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत आंबेडकर यांनी सरकारच्या कारभारावर तीव्र शब्दांत टीका केली. ते म्हणाले, कार्यकर्त्यांवर सामाजिक, राजकीय गुन्हे दाखल झाले आहेत. ते अनेक शासन आदेश निघाल्यानंतरही मागे घेण्यात आलेले नाहीत. 1998 पासून एकूण 11 जीआर काढले. ज्याच्यात शासकीय, राजकीय आणि सामाजिक आंदोलनातले जितके गुन्हे दाखल आहेत ते मागे घेतले पाहिजेत असे म्हटले आहे. त्यानंतर या जीआरमध्ये काही सुधारणाही केल्या गेल्या. मात्र अजून तरी एकाही जीआरची अंमलबजावणी झालेली नाही.

जयंत पाटलांना कुणाची काळजी?; म्हणाले 2024 पर्यंत…

आधीच्या जीआरमध्ये असे म्हटले होते की जर कुणाला गंभीर दुखापत झाली नसेल आणि सरकारी मालमत्तेचे नुकसान पाच लाख रुपयांच्या आत असेल तर अशा प्रसंगात कार्यकर्त्यांवर दाखल गुन्हे मागे घेतले पाहिजेत. 2018 ला त्यात  सुधारणा करण्यात आली. पाच लाख बदलून दहा लाख करण्यात आले. तरीही कोणतेही गुन्हे मागे घेतले गेले नाहीत.

20 सप्टें 2022 ला आणखी एक सुधारणा केली गेली.  दाखल गुन्हे मागे घेण्याच्या कार्यवाहीसाठी समिती नेमण्यात आली. मात्र समितीकडूनही काहीच कार्यवाही केली गेली नाही, असे आंबेडकर यांनी सांगितले.

राम शिंदे यांच्या तक्रारीनंतर रोहित पवारांवर मोठी कारवाई

आंदोलन हा महत्वाचा मार्ग आहे. समस्या मांडण्याचा, न्याय मागण्याचा. जर अशा परिस्थितीत तुम्ही जर कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करून नोटीसा काढणार असाल तर हे त्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण आहे. या माध्यमातून लोकशाही व्यवस्थेचा पाया तोडण्याचे काम केले जात आहे. सन 2016 पासून विद्यार्थी, युवक विविध आंदोलनांच्या माध्यमातून आवाज उठवत आहेत. त्यांच्यावर गुन्हे दाखल झाल्याने त्यांना प्रचंड अडचणी येतात. पोलीस रेकॉर्डवर नाव आले की त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता वंचित बहुजन युवा आघाडीने या मुद्द्यावर आक्रमक भूमिका घेतली आहे.

ज्या कार्यकर्त्यांवर अशा प्रकारचे गुन्हे दाखल आहेत त्यांना पाठिंबा देत या लढ्यात सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. गुन्ह्यांची माहिती आम्हाला द्या. तुम्हाला मदत करू साथ देऊ त्याची तयारी आम्ही केली आहे. गुन्हे मागे घेण्याचे काम एकाही सरकारने केले नाही. जितके हे शासकीय निर्णय आहेत त्यांची आम्ही होळी करणार आहोत. समित्यांना कछवा छाप अगरबत्ती देणार तसेच त्यांना एक फुलचक्र देऊन श्रद्धांजली वाहण्याचे आंदोलन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

 

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube