विधानसभेची ‘मॅच’ खरंच ‘फिक्स’ होती का ? राहुल गांधी विरुद्ध बावनकुळे

Mahrashtra Assembly Election’match’ really ‘fixed’? Rahul Gandhi allegation : महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होऊन सहा महिने झालेत. (Mahrashtra Assembly Election) पण विरोधकांचा या निवडणुकीतील संशयकल्लोळ अजूनही दूर झालेला नाही. काँग्रेसचे नेते व लोकसभेचे विरोधीपक्ष नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी महाराष्ट्रातील निवडणुकीवरून अनेकदा भाजप, भारत निवडणूक आयोगावर सडेतोड आरोप केलेत. महाराष्ट्रातील विधानसभेची मॅच कुणी फिक्स केलीय, असे सांगणारे राहुल गांधी यांचा लेख इंग्रजी, मराठीसह विविध भाषेच छापून आले. राहुल गांधी यांनी अनेक गंभीर आरोप लेखातून केलेत. हे आरोप काय आहेत ? भाजपकडून (BJP) त्याला कसे उत्तर दिले जात आहे हे जाणून घेऊया…
खेळाडूच ठरविणार पंच?
राहुल गांधी यांना अनेक मुद्द्याद्वारे भाजप आणि इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला घेरलंय. निवडणूक आयुक्त निवडीवर त्यांचा पहिला आक्षेप आहे. पंतप्रधान आणि गृहमंत्री यांच्यामार्फत 2:1 बहुमताने निवडणूक आयुक्त निवडले जावेत, असे निवडणूक आयुक्त अधिनियम 2023 द्वारे निश्चित केले गेले. तिसरा सदस्य असलेल्या विरोधी पक्षनेत्याचे मत निष्प्रभ करता येईल, यासाठी ही खेळी. याचा अर्थ ज्यांना निवडणूक लढवायची आहे; तेच पंच कोण हे ठरवतात. सगळ्यात मोठी गोष्ट तर अशी की, भारताच्या सरन्यायाधीशांना हटवून त्यांच्या जागी निवड समितीत एका कॅबिनेटमंत्र्याचा समावेश केला गेला. हा निर्णय पचनी पडणारा नाही. या महत्त्वाच्या समितीतील एका निष्पक्ष निर्णायक सदस्याला बाजूला करून कोणी आपल्या पसंततीचा सदस्य आणत असेल, तर त्यामागे हेतू कोणता असेल ? हा साधा प्रश्न तुम्ही स्वतःला विचारलात, तरी उत्तर मिळेल, असा प्रश्न राहुल गांधींचा आहे.
मतदारांची संख्या वाढवून खोटेपणा
राहुल गांधी यांचा दुसरा आक्षेप आहे तो मतदारसंख्येवर. निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत नोंदणीकृत मतदारांची संख्या 8.98 कोटी होती. पाच वर्षांनंतर मे 2024 च्या लोकसभा निवडणुकीत ही संख्या वाढून 9.29 कोटी झाली. परंतु त्यानंतर केवळ पाच महिन्यांत नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ही संख्या वाढून 9.70 कोटी झाली. याचा अर्थ पाच वर्षांत 31 लाख इतकी किरकोळ वाढलीय. तर केवळ पाच महिन्यांत 41 लाख मतदार वाढले. सरकारच्या स्वतःच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रात वयाची 18 वर्षे उलटलेल्या नागरिकांची संख्या 9.54 कोटी आहे. असे असताना हे 9.70 कोटी नोंदणीकृत मतदार आले कुठून? असा सवाल राहुल गांधीचा आहे. राहुल गांधी यांचा हा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी खोडून काढलाय. राहुलजी 2009 ला काय झालं होतं? तुम्हाला आठवत नसेल तर मी सांगतो. एप्रिल 2009 ला लोकसभा निवडणुकीत 7 कोटी 29 लाख 54 हजार मतदार होते. तर ऑक्टोबर 2009 ला विधानसभा निवडणुकीत 7 कोटी 59 लाख 68 हजार मतदार झाले. तेव्हाही फक्त 5 महिन्यांत 30 लाख मतदार वाढले होते. तेव्हा तुमचा निवडणूक आयोगावर विश्वास होता की तेव्हाही काँग्रेस-आयोग युतीच होती? तेव्हा तुम्ही घोटाळा केला होता का? याचं उत्तर द्या, असा प्रतिसवाल बावनकुळेंनी उपस्थित केलाय.
सात टक्के मतदान कसे वाढले ?
राहुल गांधींचा तिसरा आरोप हा रात्री वाढलेल्या मतदानांवर आहे. मतदानाची दिवशी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत 58.22 टक्के इतके मतदान झाले होते. मात्र मतदान संपल्यानंतरही मतदानाची टक्केवारी सातत्याने वाढतच गेली. दुसऱ्या दिवशी सकाळी जे आकडे समोर आले ते होते 66.०5 टक्के याचा अर्थ ७.८३ टक्के इतकी वाढ अचानक झाली. त्याचा अर्थ 76 लाख अधिक मते पडली. मतांच्या टक्केवारीत अशा प्रकारची वाढ महाराष्ट्रातील निवडणुकांत यापूर्वी इतक्या प्रमाणात कधीही झाली नव्हती, असा आरोप राहुल गांधींचा आहे. त्यासाठी त्यांनी काही जुने आकडेवारीही लेखात दिलीय. या निवडणुकीत सुमारे साडेसात टक्के मतदान हे रात्रीच्या वेळी वाढले. पूर्वी 2019 च्या निवडणुकीला 0.64 टक्के होते. तर 2014 ला एक टक्के होते.
खोट्या मतदानाने भाजपला ‘ब्रॅडमन’ केले
राहुल गांधी यांनी मतदान केंद्रावर म्हणजे बूथवर आक्षेप घेत त्याला घोटाळा असे म्हटलंय. महाराष्ट्रात किमान एक लाख बूथ आहेत. परंतु, नवे मतदार जास्त करून केवळ १२ हजार बूथवरच समाविष्ट केले गेले. या केंद्रावर लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवारांना कमी मते मिळाली होती, त्याच 85 विधानसभा मतदारसंघात हे बूथ येतात. याचा अर्थ प्रत्येक बूथवर संध्याकाळी पाच वाजून गेल्यानंतर सरासरी सहाशे लोकांनी मतदान केले. एका मतदाराला मतदान करण्यासाठी एक मिनिट लागेल असे गृहीत धरले तरी मतदानाची प्रक्रिया किमान 10 तास पुढे चालू ठेवावी लागली असती. परंतु, कुठेही असे झालेले नाही. अशा परिस्थितीत प्रश्न असा की हे अतिरिक्त मतदान शेवटी झाले कसे ? अर्थात हे उघडच आहे की या 85 जागांवर बहुतेक ठिकाणी एनडीएला विजय मिळाला, असा आक्षेप राहुल गांधींचा आहे. त्यावर राहुल गांधी हे कोटी करतात. हे प्रकरण इतके गंभीर नसते तर विनोद म्हणून हसून सोडून देता आले असते, असे राहुल गांधी म्हणतात. हे चार मार्ग वापरून भाजपने 2024 च्या विधानसभा निवडणुकीत ज्या 149 जागांवर निवडणूक लढवली. त्यातील 132 जागा जिंकल्या. म्हणजे त्यांचा स्ट्राइक रेट झाला 89 टक्के. आतापर्यंतच्या सर्व निवडणुकांत त्यांची ही सर्वोत्तम कामगिरी ठरली. मात्र, विधानसभेआधी पाचच महिने झालेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपचा स्ट्राइक रेट होता केवळ 32 टक्के होता, असे राहुल गांधी यांनी म्हटलंय.
आयोगावर अनेक प्रश्न
या सर्व मुद्द्यानंतर राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगाला काही प्रश्न उपस्थित केलेत. लोकसभा विधानसभा निवडणुकांची फोटोसहित मतदार जाहीर न करणे, एकसारखेच इपीआयसी नंबर असणे, हे गंभीर असल्याचे राहुल गांधींनी म्हटलंय. मतदार यादी आणि सीसीटीव्ही फुटेज हे लोकशाही बळकट करण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. ते कुलूपबंद ठेवायचे सजावटी सामान नव्हे. लोकशाहीशी खेळ होत असेल तेव्हा तर नक्कीच नाही. ‘कोणतेच रेकॉर्ड नष्ट केले गेलेले नाही आणि यापुढेही कधीच तसे होणार नाही,’ असा भरोसा निवडणूक आयोगाने लोकांना द्यायला हवा. तो त्यांचा अधिकार आहे.परंतु, दुर्दैवाची गोष्ट अशी की विरोधी पक्ष आणि जनता दोघांनाही या रेकॉर्डपर्यंत पोहोचण्यापासून अडविले जात आहे, असा आरोप राहुल गांधींचा आहे.
महाराष्ट्रात नोव्हेंबर 2024 च्या विधानसभा निवडणुकीत इतक्या टोकाला जाऊन गडबडी का केल्या गेल्या हे सांगणे कठीण नाही. निवडणुकीतले गैरप्रकारही मॅच फिक्सिंगसारखे असतात. भले संघ एक मॅच फिक्स करून जिंकेल. पण, त्यातून संस्थांची विश्वासार्हता आणि जनतेच्या भरवशाचे जे नुकसान होते ते कधीही भरून काढता येत नाही. ‘मॅच फिक्सिंग’ झालेली लोकशाहीसाठी विषसमान असल्याचे राहुल गांधी यांनी लेखात म्हटलंय. राहुल गांधी यांना बावनकुळे यांनी चोख प्रत्युत्तर दिले आहे. 2004,2009 ला जिंकलात तेव्हा काही प्रश्न पडले नाहीत. आज पराभव झाला. महाराष्ट्रातील जनतेनं तुम्हाला झिडकारलं तेव्हा रडगाणं सुरू झालं, असा पलटवार बावनकुळेंचा आहे. पण महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीचा मुद्दा जोपर्यंत निवडणूक आयोग आपल्यावर संशय दूर करणार नाही. तोपर्यंत तो सातत्याने चर्चेत येणार हे नक्की आहे.