Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका

Sharad Pawar मोठे नेते पण… वारसदार निर्माण करण्यात अपयशी, सामनातून परखड टीका

Samana Editorial On Sharad Pawar : शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या आजच्या अग्रलेखातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका करण्यात आली आहे. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत. पण ते वारसदार निर्माण करण्यात अपयशी ठरले आहेत अशी टीका आजच्या सामनातून करण्यात आली आहे.

दरम्यान नुकतचं राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचं आत्मचरित्र असलेल्या लोक माझे सांगाती या पुस्तकाचा प्रकाशन सोहळा पार पडला यामध्ये त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर टीकास्त्र सोडलं होतं. त्याला प्रत्युत्तर म्हणून आजच्या सामनातून पवारांवर टीका करण्यात आली आहे. अशा चर्चा सुरू झाल्या आहेत.

काय लिहिले सामनामध्ये?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्षपद सोडत असल्याची घोषणा शरद पवार यांनी करताच खळबळ माजणे साहजिकच होते. ही खळबळ देशाच्या राजकारणात माजली, त्यापेक्षा जास्त त्यांच्या पक्षात माजली. कारण शरद पवार म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष. पवार हे राजकारणातील पुराण वटवृक्षाप्रमाणे आहेत.

त्यांनी मूळ काँग्रेस पक्षातून बाहेर पडून ‘राष्ट्रवादी’असा स्वतंत्र पक्ष स्थापन केला, चालवला व टिकवला. पण शरद पवार यांच्यानंतर पक्ष पुढे नेणारे नेतृत्व पक्षात उभे राहू शकले नाही. पक्षाचा शेंडा-बुडखा, बुंधा… सर्व काही महाराष्ट्रातच असल्याने पवारांच्या सर्वच सहकाऱ्यांना जे हवे आहे ते महाराष्ट्रातच. पवार हे राष्ट्रीय पातळीवर मोठे नेते नक्कीच आहेत व त्यांच्या शब्दाला राष्ट्रीय राजकारणात मान असला तरी पक्ष पुढे नेईल असा वारसदार निर्माण करण्यात ते अपयशी ठरले.

त्यामुळे चारेक दिवसांपूर्वी निवृत्तीची घोषणा करताच पक्ष बुंध्यापासून हादरला व प्रत्येक जण आता आपले कसे होणार? या चिंतेने हादरून गेला. कार्यकर्ते रस्त्यावर उतरले. पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी मनधरणी केली व लोकभावनेचा आदर राखून पवार यांनी राजीनामा मागे घेतला व यापुढे तेच राष्ट्रवादी काँग्रेसची धुरा सांभाळतील. त्यामुळे गेले चार-पाच दिवस सुरू असलेल्या नाट्यावर पडदा पडला आहे.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube