Uddhav Thackeray फडणवीसांना फडतूस म्हणाले… अन् राज्यात धुरळा उडाला!

Uddhav Thackeray फडणवीसांना फडतूस म्हणाले… अन् राज्यात धुरळा उडाला!

Uddhav Thackeray : राज्यात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्या गटातील वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. सोमवारी (दि. ३) रोजी ठाण्यात ठाकरे आणि शिंदे गटातील महिलांमध्ये तुफान राडा झाला. त्यात शिंदे गटाच्या महिलांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्या रोशनी शिंदे यांच्यावर हल्ला केला. त्यात त्या गंभीर जखमी झाल्या असून त्यांच्यावर ठाण्यातील संपदा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांची आज रुग्णालयात जाऊन उद्धव ठाकरे यांनी भेट घेत तब्येतीची विचारपूस केली.

Devendra Fadanvis फडतुस शब्दांवरुन भडकले : ठाकरेंना थेट धमकीच दिली… – Letsupp

त्यांनंतर उद्धव ठाकरे यांनी राज्यातील कायदा-सुव्यवस्थेवरुन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जहरी टीका करत लाचार, लाळघोटेपणा करणारा फडतूस गृहमंत्री देवेंद्र फडणवीस अशी टीका केली. ठाकरे यांनी वापरलेल्या फडतुस या शब्दांमुळे राज्यातील वातावरण चांगलेच तापले आहे. भाजप आणि उद्धव ठाकरे गटाच्या नेत्यांचे आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. याबाबत ‘लेटस्अप’ने कोण काय म्हणाले याचा आढावा घेतला आहे.

आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस”; ठाकरेंच्या टीकेनंतर भाजपचे नेते सरसावले – Letsupp

याबाबत खुद्द गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना सुनावले आहे. देवेंद्र फडणवीस म्हणतात की, अडीच वर्षांच्या कारभारावरून संपूर्ण राज्याला ठावूक फडतूस कोण आहे. दोन मंत्री जेलमध्ये गेल्यावर त्यांचा राजीनामा मागण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवित नाही आणि त्यांचा लाळघोटेपणा जे करीत असतात, त्यांना बोलण्याचा अधिकार तरी काय? जे वाझेच्या मागे लाळ घोटतात, ज्यांच्या काळात पोलिस खंडणी गोळा करतात, त्यांना बोलण्याचा अधिकार काय? अडीच वर्ष घरात घरात बसून राजकारण करणार्‍यांनी जास्त बोलू नये. आम्ही संयमाने वागतो याचा अर्थ आम्हाला बोलता येत नाही असे नाही. ज्या दिवशी बोलणे सुरू करु, त्यादिवशी पळता भूई थोडी होईल.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ट्विट करत उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली. ते म्हणतात की, मा. देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करताना तोंड सांभाळून बोला उद्धव ठाकरेजी! अडीच वर्षांत तुमची फडतूस कामगिरी महाराष्ट्रातील जनतेनं पाहिली आहे. पालघर साधू हत्याकांड ते १०० कोटी वसुली प्रकरणात तुम्ही काय केलं हे जनता विसरली नाही.

तर भाजपचे प्रवक्ते ॲड. आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर पलटवार केला आहे. ते म्हणतात की, आमचे गृहमंत्री “फडतूस” नाही “काडतूस” आहेत! मागील अडीच वर्षात ठाकरे सरकारचा फडतूस कारभार महाराष्ट्राने पाहिला. कोणत्याही मारहाणीचे समर्थ होत नाही, आम्ही ते करणारही नाही. पण या अशा खुनशी कारभाराची मुहूर्तमेढ महाराष्ट्रात मा. उध्दव ठाकरे यांनीच रोवली.

भाजपचे कणकवलीचे आमदार नितेश राणे यांनी ट्विटरवर एक व्हिडीओ शेअर करत उद्धव ठाकरे यांना थेट धमकी दिली आहे. ते म्हणतात, पोलिसांच्या गराड्यामध्ये आमच्या देवेंद्र फडणवीस यांना फडतुस कोणपण बोलेल. जरा दहा मिनिटे हा पोलीस बाजूला ठेवा, संरक्षण बाजूला ठेवा, मग हिमत तर करा फडतूस बोलून बघा, ज्याची मच्छर मारण्याची हिमत नाही. पण मोठमोठ्या बाता करत आहे. यापुढे चढ्ढीत राहायचं अन् लायकी एवढंच बोलायचं, असा इशारा नितेश राणे यांनी ठाकरे यांना दिला आहे.

भाजपचे आमदार प्रसाद लाड यांनीही ट्विट करत टीका केली आहे. ते म्हणतात की, “सत्तेच्या बाहेर फेकल्या गेल्यावर, त्या व्यक्तीचा उद्धव ठाकरे यांच्या सारखा वाचाळवीर होतो!” अशी नवी म्हण भविष्यात रूढ होणार आहे, बहुदा! केवळ पातळी सोडून टीका करण्यापलीकडे उद्धव ठाकरे यांना काहीही काम उरलेले नाही. लायकी नसलेला, फडतूस मुख्यमंत्री होता, म्हणूनच महविकास आघाडीचे सरकार कोसळले! हे उद्धव ठाकरे विसरले आहेत का? आमचे नेते आदरणीय नरेंद्र मोदी किंवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका करत असताना, उद्धव ठाकरे यांनी काही मर्यादा पाळल्या पाहिजेत. त्यांच्या बोलण्याची ही शैली ठाकरी बाणा नसून, टोमणेगिरीची स्वघोषित अदाकारी आहे, अशी टीका केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube