‘कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं’; शरद पवारांवर पत्रातून वार, बारामतीत ‘गब्बर’च्या व्हायरल पत्राने वादळ

  • Written By: Published:
‘कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं’; शरद पवारांवर पत्रातून वार, बारामतीत ‘गब्बर’च्या व्हायरल पत्राने वादळ

Anonymous letter goes viral in Baramati : “कोणाच्या खांद्यावर कोणाचं ओझं” या मथळ्याखाली ‘गब्बर’ नावानं हे पत्र व्हायरल झालं आहे. दरम्यान, याआधी उपमुख्यमंत्री अजित पवारांचं नाव न घेता त्यांना उद्देशून एक पत्र व्हायरल झालं होतं. यानंतर आता शरद पवार यांच्यावर गंभीर आरोप करणारं पत्र बारामतीत व्हायरल होतं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर बारामतीत निनावी पत्रांचे वार सुरू झाले आहेत.

कोणाच्या खांद्यावर, कोणाचं ओझं या मथळ्याखाली हे पत्र संपूर्ण बारामतीत व्हायरल करण्यात आलं आहे. या पत्रातून थोरल्या पवारांवर अनेक गंभीर आरोप करण्यात आले आहेत. हे पत्र नेमकं कुणी लिहिलंय? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आली नाही. पण, गब्बर नावाने व्हायरल होणाऱ्या पत्रामुळे संपूर्ण बारामतीत खळबळ उडाली आहे. तर, राजकीय वर्तुळात दबक्या आवाजात चर्चा सुरू आहेत.

पत्रात नेमकं काय म्हटलंय?

नमस्कार बारामतीकर… मी आज पुन्हा आपणासमोर बारामतीध्ये चर्चेला असणाऱ्या सुप्त गोष्टी मांडत आहे. ज्या मोठ्यानं आणि धाडसानं बोलणं म्हणजे, साहेबांच्या विचारांना चॅलेंज आहे. आणि न बोलणं म्हणजे, तोंड दाबून लाथा बुक्क्यांचा मार, जो आपण भोळ्या भाबड्या बारामतीकरांना भावनिक करून लोकसभेला दिला. त्याचे दुष्परिणाम असे की, आमच्या ताई निवडणुकीपूर्वी खुप शुद्ध बोलून बेशुद्ध करायच्या (आश्वासन द्यायच्या) मात्र आता कार्यकर्त्याचे येणारे फोनच उचलत नाहीत. तुम्ही तर आता नवख्या लेकराला खुर्ची देवून राजकारणाचा आणि तुमच्या विश्वासार्हतेचा पोरखेळ करून संगीतखुर्ची मांडत आहात.”, असं पत्रात नमूद करण्यात आलं आहे.

ही विषाची परिक्षा

“बारामतीनं आपणास चार वेळा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री करण्याकरता भरभरून प्रेम दिलं. तुम्ही तुमचा वारसा दादांना दिला, तुमचं मार्गदर्शन आणि दादांच परीश्रम यातुन बारामतीचा विकास झाला, मग दादांनीही आपलं कौशल्य दाखवत इतर तालुक्याच्या तुलनेत दहा पटीने बारामतीचा विकास केला. मग एका नातवाला राजकारणात आणण्याचा प्रयोग तुम्ही केला आणि जिल्हा परिषद सदस्य केला मग अनुभव आल्यानंतर त्याला आमदार केला आता तो नातुही तिकड सेट झालाय. मात्र ही विषाची परिक्षा कशासाठी की आता आणखीण एका नातवाला डायरेक्ट आमदार करून विकास भकास करायला निघालाय…”, असं पत्रात म्हटलं आहे.

आपण किती आश्वासने दिली

“त्यामुळेच तर, दलित आणि मुस्लीमांमध्ये खोट भितीचं आणि धार्मिक तेढाचं वातावरण पसरवून संभ्रम निर्माण करीत आहात आणि तुमच्याच पुतण्याला (दादांना) जो तुमच्याच विचाराचा वारसदार आहे त्याला खलनायक बनवण्यासाठी फतवे काढायला लावत आहात. संविधान बदलण्याच्या दाट शक्यता आहेत असा प्रचार करीत आहात. साहेब, लोकसभा निवडणुकीत आपण किती आश्वासने दिली की आम्ही निवडुन आल्यायवर कामे, टेंडर दलित मुस्लीम बहुजनांना देणार. मात्र, आता मिशीवाले, खरड्या दाढीवाले लाभार्थीच मलिदा खातायत व लोकसभेला पळणारे कार्यकर्ते वाऱ्यावर फिरतायत. तात्पर्य काय की खरी मलिदा गँग तुपाशी व कार्यकर्ते उपाशी.”, असं पत्रात लिहिलं आहे.

आपणाकडेच सत्तेचा सर्व चाव्या

पत्रात पुढे लिहिलं आहे की, “साहेब, तुमच्या काळजाचा तुकडा असणाऱ्या निवृत्त मुंबई पोलीस अधिकाऱ्याने भारताचा शत्रु असणाऱ्या देशद्रोही व मुंबई बॉम्बस्फोटामधील मुख्य आरोपीचे किमान 2900 कोटी रूपये स्थावर संपत्तीमध्ये गुंतवणवणुकीचे प्रकरण आपण किती शिताफीने दाबले त्यासंबंधी महाराष्ट्राचे पावसाळी अधिवेशन तत्कालीन विरोधी पक्षनेत्याने एका बारामतीच्या वकीलाच्या व दोन पत्रकारांच्या पेन ड्राईव्ह, दस्त व माहितीच्या आधारे गाजवले त्यावेळी तर आपणाकडेच सत्तेचा सर्व चाव्या होत्या आणि तुम्हीच सजवलेले सगळे मंत्रीमंडळ होते पण या पापी देशद्रोहयावर देखील आपण मेहरनजर केली आणि प्रकरण जैसे थे झाकले.”

आम्हांस गृहीत धरण अस बंद करा

“ज्यावेळी मराठा आरक्षणाचे आंदोलन जोर धरत महाराष्ट्र भर पेटले होते त्यावेळी तुमच्या घरातील एका नातवाने तुमच्यासमोर उर काढला व त्याने एक मराठा लाख मराठा म्हणत मराठा आरक्षणाचे समर्थन करीत, एक ट्वीट केले त्यावेळी तुम्ही त्याच्यावर रागाने डोळे वटारले. व नंतर तर तुम्ही म्हणाला की लहान मुलांच्या गोष्टी मी मनावर घेत नाही मात्र आता तुम्ही एका दुसऱ्या नातवाला त्याच्यापेक्षा लहानग्याला (दादांचा पुतण्या) पुढं करून बारामतीचा आमदार करून आमच्यावर जबरदस्तीने लादण्याच्या प्रयत्नात आहात. दुसऱ्या नातवाने (दादांचा मुलगा) तर पाच वर्षापुर्वी खासदारकीची निवडणुक लढवली मात्र या नातवाला तर जनतेचे कसलेच प्रश्न कळत नाहीत काही जरी विचारलं तरी एकच उत्तर ! उदया बारामतीच्या जनतेने त्याच्याकडून कसल्या विकासाची अपेक्षा करायची? साहेब तुम्हीच सांगा, ही सगळी तुमच्याच रक्ताची माणसं, दादांच्या कामाची, अनुभवाची तुलना (दादांचा पुतण्या) नवख्या पोराशी होवू शकते का हो? तुमच्या घरगुती कलहापायी आम्हा बारामतीकरांवर हे ओझ लादु नका. ही लढाई फक्त तुमच्या घरातील श्रेयवादाची नाही तर ही लढाई बारामतीकरांच्या भवितव्याची आहे. व्यावहारीक विचार करा आणि आम्हांस गृहीत धरण अस बंद करा, तुम्हीपण. आणि हो मागच्या पत्रात दादांवर बोललो आज तुमच्यावर कारण जे खरं आहे ते मी बोलणारच.”, असं पत्रात लिहिलं आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube