मिसाळांच्या खरमरीत पत्राचा कॅबिनेट मंत्र्यांना घरचा ‘आहेर’; ‘पुणेरी’ बाणा दिसताच शिरसाट नरमले

  • Written By: Published:
मिसाळांच्या खरमरीत पत्राचा कॅबिनेट मंत्र्यांना घरचा ‘आहेर’; ‘पुणेरी’ बाणा दिसताच शिरसाट नरमले

Madhuri Misal Letter To Sanjay Shirsat : एकीकडे हाणामारी, रमीचा डाव अन् इतर गोष्टींमुळे महायुतीतील काही मंत्र्याचा पत्ता कट होणार असल्याचे चित्र आहे. असे असतानाच आता राज्यमंत्री असलेल्या माधुरी मिसाळ (Madhuri Misal) यांनी थेट कॅबिनेट मंत्री असलेल्या शिरसाटांना () खरमरीत पत्र धाडत पुणेरी बाणा दाखवला आहे. सध्या या पत्राची आणि त्यानंतर नरमलेल्या संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या भूमिकेची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. तर, दुसरीकडे मिसाळ यांच्या खरमरीत पत्रामुळे महायुतीत सर्व काही आलबेल नाही हेच अधोरेखित झाले आहे.

तुमच्या पक्षाचा ‘हवेचा फुगा’ जनतेने फोडला; मोदींवरील टीकेवरून बावनकुळेंचा राहुल गांधींवर पलटवार

मिसाळ अन् शिरसाटांमध्ये नेमका मिठाचा खडा कसा पडला?

सामाजिक न्याय खात्याचे कॅबिनेट मंत्री संजय शिरसाट आणि राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांच्यात बैठकीवरून जुंपली आहे. राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी सामाजिक न्याय खात्याच्या काही बैठकांचे आयोजन केल्यानंतर, संजय शिरसाट यांनी नाराजी व्यक्त करत त्यावर लेखी स्वरूपात हरकत नोंदवली होती. इतकच काय तर पत्रातून यापुढे आपल्याकडील विषयासंबधित आपणास बैठक घ्यावयाची असल्यास सदर बैठक माझ्या अध्यक्षतेखाली आयोजित करणे संयुक्तिक राहीलं असे नुद केले होते. त्यानंतर मिसाळ यांनी थेट शिरसाटांना अधिकारांचा आरसा दाखवत खरमरीत भाषेत प्रत्युत्तर दिले आहे. मात्र, मिसाळांच्या पत्रानंतर आणि पुणेरी बाण्यानंतर शिरसाटांनी बॅकफूटवर जात नरमाईचा सूर घेतला आहे.

बैठकीसाठी तुमच्या पूर्वपरवानगीची गरज नाही – मिसाळ

शिरसाटांच्या अचानक आलेल्या पत्राबाबत बोलताना मिसाळ म्हणाल्या की, आमच्या दोघात वाद नाही. आमच्या दोघांमध्ये व्यवस्थित संवाद आहे. पण, अचानक पत्र का आले? ही माझ्यासाठी देखील आश्चर्याची गोष्ट होती. त्या पत्राला मी उत्तर दिले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या निर्देशानुसारच मी या बैठकांचे आयोजन केलं आहे. शिवाय, सामाजिक न्याय खात्याच्या राज्यमंत्री म्हणून मला अशा बैठकांसाठी पूर्वपरवानगी घेण्याची गरज नाही,” असे मिसाळ यांनी स्पष्ट केले आहे.

तुमच्या अधिकारात ढवळाढवळ केली नाही

पुढे मिसाळ यांनी त्यांच्या पत्रात लिहिले आहे की, मी घेतलेल्या आढावा बैठकामध्ये कोणतेही निर्णय घेतलेले नाही व निर्देश दिले नाहीत. राज्यमंत्री म्हणून मी घेतलेल्या बैठकामध्ये निदर्शनास आलेल्या बाबींबद्दल अधिकाऱ्यांना काही सूचना करणे किंवा निर्देश देण्यात काहीही गैर नाही अशी माझी धारणा आहे.

मुख्यमंत्र्यांच्या सूचनेचीही करून दिली आठवण

सदर बैठकात मी कोणतेही निर्णय घेतलेले नाहीत. तो खात्याचे मंत्री म्हणून आपला अधिकार आहे. आढावा बैठका घेऊन मी आपल्या अधिकारात कोणतीही ढवळाढवळ केली नाही. तरीही मी कोणतेही निर्णय घेतले असल्यास याबाबत प्रकरण परत्वे उदाहरणे कृपया सांगावी असे मिसाळ यांनी म्हटले आहे. मुख्यमंत्री महोदयांनी सर्व मंत्री व राज्यमंत्री यांना शासन कार्यकाळाच्या १५० दिवसांचा आढावा`घेण्याचे निर्देश दिले आहेत ही बाब आपल्याला अवगत असेलच अशी आठवणही मिसाळ यांनी शिरसाटांना करून दिली.

Video : मला जे करायचय ते मी करतो; उपमुख्यमंत्री अजित पवार हिंजवडीच्या सरपंचावर भडकले

मिसाळांच्या पत्रानंतर शिरसाटांची भाषा नरमली

एकीकडे मिसाळांच्या पत्राने महायुतीत वाद पेटण्याची चिन्ह निर्माण झालेली असताना शिरसाटांनी मात्र, नरमाईची भूमिका घेतल्याचे दिसून आलयं. आमच्यात वाद नसून, सहकारी म्हणून सूचना केल्याचे शिरसाटांनी म्हटले आहे. माझा उद्देश स्पष्ट होता की, राज्यमंत्री, कॅबिनेटमंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री अशा पायऱ्यांवरून निर्णय प्रक्रिया व्हावी. त्यांनी त्यांचे मत मांडले आहे. निश्चित मुख्यमंत्री कार्यालयाला प्रत्येक गोष्ट विचारली पाहिजे. त्यांनी विचारले असेल तर, माझी त्यात काही हरकत नाही. सारखे सारखे पत्र व्यवहार करणे हे माझ्या स्वभावात नाही. मला ज्या काही सूचना करायच्या होत्या, त्या मी केलेल्या असल्याचे म्हणत त्यांनी काय उत्तर द्यायचे ते दिलेलं असल्याचेही शिरसाट म्हणाले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube