धनंजय बिजले लिखित ‘महामुद्रा’चे नितीन गडकरी, शरद पवारांच्या हस्ते प्रकाशन

पुणे: गेल्या ७५ वर्षांत केंद्र सरकारमध्ये (Central Govt) काम करताना महाराष्ट्रातील मराठी मंत्र्यांनी देशासाठी, महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांचा इतिहास हा भावी पिढीसाठी प्रेरणादायी ठरेल. महामुद्रा पुस्तकाच्या (Mahamudra book) निमित्ताने सर्व नेत्यांचे कार्यकर्तृत्व सर्वांसाठी उपयुक्त राहील, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी व्यक्त केले.
Video : “माझं शरीर कमकुवत होतंय आता मी..” हमासच्या भुयारातील इस्त्रायली कैद्याचे अखेरचे शब्द
नवी दिल्लीतील महाराष्ट्र सदन येथे सरहद संस्थेने आयोजिलेत केलेल्या या कार्यक्रमात पुणे सकाळचे वृत्तसंपादक धनंजय बिजले यांनी लिहिलेल्या महामुद्रा या पुस्तकाचे प्रकाशन नितीन गडकरी आणि माजी संरक्षण मंत्री शरद पवार यांच्या हस्ते नुकतेच झाले. यावेळी गडकरी बोलत होते. या कार्यक्रमास ज्येष्ठ पत्रकार राजीव खांडेकर, वनराई फाऊंडेशनचे डॉ. गिरीश गांधी, सरहदचे संजय नहार, खासदार निलेश लंके, धैर्य़शील मोहीते पाटील, अमर काळे, भगरे गुरुजी, प्रशांत पडोले, संजय दिना पाटील, भाउसाहेब वाकचौरे, शुभम प्रकाशनचे कुणाल ओंबासे आदी उपस्थित होते.
गडकरी म्हणाले, महामुद्राच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या इतिहासात भरीव कामगिरी केलेल्या नेत्यांची माहिती एकत्रितरित्या पुढे आली आहे. खूप मोठे योगदान असलेल्या या मंत्र्यांच्या कामांचा सखोल अभ्यास केला पाहिजे. यातील प्रत्येकावर स्वतंत्र पुस्तक काढायला हवे इतके त्यांचे काम मोठे आहे. तसे केल्यास त्यांचे कार्य, व्हिजन, कर्तृत्व, निर्णयक्षमता ही भविष्यातील पिढीला उत्तम दिशा देईल.
सनातन दहशतवाद ही भाषा हिंदू धर्माचा अपमान, आव्हाडांच्या भूमिकेशी पवार सहमत आहेत का? राणेंचा सवाल
ते म्हणाले, की मराठी माणूस, संस्कृती, इतिहास, नाटक, अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या ह्रदयात आहेत. स्वातंत्र्यानंतर दिल्लीमध्ये महाराष्ट्राचे यशस्वीपणे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर, डॉ. पंजाबराव देशमुख, काकासाहेब गाडगीळ आणि डॉ.सी.डी.देशमुख हे नेहरुंच्या मंत्रिमंडळातील सदस्य होते. नेहरुंच्या मंत्रिमंडळात असताना त्यांनी देशासाठी जेवढे मोलाचे कार्य केले, तेवढेच महाराष्ट्रासाठीही केले, नंतरच्या काळात केंद्रात मंत्री असताना यशवंतराव चव्हाण, शरद पवार, मधु दंडवते, जॉर्ज फर्नांडिस यांनीही महाराष्ट्राच्या हिताचे संवर्धन केले.
याप्रसंगी बोलताना शरद पवार यांनी आपल्या भाषणात महाराष्ट्रातील नेत्यांच्या दिल्लीतील कर्तृत्वाचे अनेक दाखले दिले. महामुद्रा पुस्तकामध्ये काकासाहेब गाडगीळ, सीडी देशमुख , मधु दंडवते यांच्या विषयी लिहिलेल्या कार्याचा उल्लेख पवार यांनी त्यांच्या भाषणात केला.
महामुद्रात दिल्लीतील मराठी नेतृत्वाचे कर्तृत्व
दिल्लीमध्ये मराठी नेत्यांनी बजावलेल्या दैदिप्यमान कामगिरीची एकत्रित मांडणी महामुद्रा या पुस्तकात करण्यात आली आहे. हे पुस्तक दोन खंडांमध्ये प्रकाशित होणार आहे. पहिल्या भागात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, दादासाहेब मावळणकर, काकासाहेब गाडगीळ, आर. के. खाडिलकर, यशवंतराव चव्हाण, सी. डी. देशमुख, शंकरराव चव्हाण मधु दंडवते, वसंत साठे , शरद पवार, शिवराज पाटील, मोहन धारीया, राम नाईक, विठ्ठलराव गाडगीळ, सुशीलकुमार शिंदे आणि नितीन गडकरी या नेत्यांची कामगिरी शब्दबद्ध केली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुस्तकाला प्रस्तावना लिहिली आहे.