कुंडमळा पूल दुर्घटना : प्रशासन अलर्ट, शोधकार्य सुरुच, CM फडणवीसांची माहिती; विरोधकांचा हल्लाबोल

Pune Bridge Collapse : मावळ तालुक्यातील येथील कुंडमळा येथे इंद्रायणी नदीवरील (Kundmala Bridge Collapse Pune) पूल अचानक कोसळला. या दुर्घटनेत 18 लोक जखमी झाले आहेत. तर 38 व्यक्तींना (Pune Bridge Collapse) वाटचविण्यात यश मिळालं आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या दुर्घटनेत आतापर्यंत चार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, या घटनेची राज्य सरकारने गंभीर दखल घेतली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी (Devendra Fadnavis) सोशल मीडियावर एक पोस्ट केली आहे. पाण्यात वाहून गेलेल्या सर्वांचा शोध घेतला जात आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्यात आलं आहे, अशी माहिती सीएम फडणवीस यांनी दिली.
कुंडमळा पूल दुर्घटना : दोघांचा मृत्यू तर 38 जण वाचले; मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत
फडणवीसांच्या पोस्टमध्ये काय
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले. या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत. या घटनेसंदर्भात विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, पोलिस अधीक्षक आणि संबधित तहसीलदार यांच्याशी मी सातत्याने संपर्कात आहे. काही जण वाहून गेल्याने त्यांचा युद्धपातळीवर शोध घेतला जात आहे. घटनास्थळी एनडीआरएफला पाचरण करण्यात आले आहे. मदत कार्याला तातडीने वेग देण्यात आला आहे.
पुणे जिल्ह्यातील तळेगावनजीक इंदोरी येथे इंद्रायणी नदीवरील एक पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेचे वृत्त ऐकुन अतिशय दुःख झाले.
या घटनेत प्राथमिक माहितीनुसार 2 लोकांचा मृत्यू झाला आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. त्यांच्या कुटुंबियांच्या दुःखात आम्ही सहभागी आहोत.
या…— Devendra Fadnavis (@Dev_Fadnavis) June 15, 2025
सहा जणांना आतापर्यंत वाचविण्यात यश आले आहे. सर्व यंत्रणांना अलर्ट मोडवर ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 32 लोक जखमी झाले, त्यापैकी 6 गंभीर आहेत. त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. स्वतः विभागीय आयुक्त घटनास्थळाकडे रवाना झाले आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या पोस्टद्वारे दिली.
अजित पवार काय म्हणाले ?
कुंडमळा घटनेबाबत वेगवेगळी माहिती समोर येत आहे. प्रथमदर्शनी सांगण्यात येत आहे की तिथं असणारा लोखंडी पूल फार सडलेला होता. त्या ठिकाणी जास्त लोक उभे राहिले होते. याच वेळी येथून दुचाकीही जात होत्या. त्यामुळे जास्त वजन झाल्याने तो पूल कोसळला. या घटनेची संपूर्ण माहिती घेण्याच्या सूचना जिल्हाधिकाऱ्यांना दिल्या आहेत. तसेच या घटनेची संपूर्ण चौकशी केली जाणार आहे अशी माहिती पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
पर्यटकांच्या मृत्यूला प्रशासन जबाबदार : अंधारे
पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत आतापर्यंत चार पर्यटकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. यावर ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पर्यटकांच्या मृत्यूला प्रशासन आणि लोकप्रतिनिधी जबाबदार आहे असा आरोप त्यांनी केला आहे. ग्रामस्थांनी नवीन पुलाची मागणी वारंवार केली होती. मात्र लोकप्रतिनिधींनी ही मागणी धुडकावून लावली असा दावाही त्यांनी यावेळी केला. दरम्यान, ही घटना का घडली, याची सखोल चौकशी करावी अशी मागणी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केली आहे.