सूर्यकुमार यादवला टी२० आंतरराष्ट्रीय कर्णधारपदावरून हटवणं योग्य ठरेल का?, धोनी कोहलीपेक्षा चांगला रेकॉर्ड
नवीन टी-२० कर्णधार मिळू शकतो. या कर्णधाराची निवड करताना चालू आयपीएल हंगामातील त्याची कामगिरी विचारात घेतली जाईल.
बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंजत (Sports) असलेल्या सूर्यकुमार यादवला भारतीय टी-२० संघाच्या कर्णधारपदावरून हटवलं जाऊ शकतं. अलीकडील आलेल्या काही बातम्यांनुसार, आयपीएल २०२६ नंतर संजू सॅमसन किंवा श्रेयस अय्यरला नेतृत्व दिलं जाऊ शकतं. आयपीएल २०२६ नंतर, भारतीय संघ जून-जुलैमध्ये इंग्लंड आणि आयर्लंडचा दौरा करणार आहे.
या दौऱ्यासाठी भारतीय संघाला नवीन टी-२० कर्णधार मिळू शकतो. या कर्णधाराची निवड करताना चालू आयपीएल हंगामातील त्याची कामगिरी विचारात घेतली जाईल. संजू सॅमसनच्या बाजूने सर्वात मोठी गोष्ट ही आहे की तो बऱ्याच काळापासून भारतीय टी-२० संघाचा भाग आहे. श्रेयस अय्यरने आपला शेवटचा टी२० आंतरराष्ट्रीय सामना २०२३ मध्ये खेळला. श्रेयस आयपीएल २०२६ मध्ये पंजाब किंग्सचे कर्णधारपद भूषवेल, तर संजूला राजस्थान रॉयल्सचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.
कर्णधारपदात बदल होण्याच्या वृत्तांदरम्यान, चला सूर्याच्या कर्णधारपदाखाली भारतीय टी२० संघाच्या कामगिरीवर एक नजर टाकली तर काही गोष्टी लक्षात येतील. सूर्यकुमार यादवच्या कर्णधारपदाखाली भारतीय टी२० संघाने २०२३ ते २०२६ या काळात ५२ सामने खेळले. या कालावधीत संघाने ४० सामने जिंकले आणि ८ गमावले. दोन सामने बरोबरीत सुटले आणि दोन अनिर्णित राहिले.
सूर्याच्या नेतृत्वाखाली ‘मेन इन ब्लू’ने २०२६ चा टी२० विश्वचषक जिंकला.
अंतिम सामन्यात भारताने न्यूझीलंडला ९६ धावांनी पराभूत केले.
धोनी आणि विराटपेक्षा उत्तम कामगिरी
सूर्याची विजयाची टक्केवारी ७६.९२% आहे, जी एमएस धोनी आणि विराट कोहली या दोघांपेक्षाही चांगली आहे. धोनीच्या कर्णधारपदाखाली भारताने ७२ पैकी ४१ सामने (५६.९४%) जिंकले. तर विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने ५० पैकी ३० सामने (६०%) जिंकले.
टी२० आंतरराष्ट्रीय सामन्यांमधील भारताचे यशस्वी कर्णधार
एमएस धोनी: ७२ सामने, ४१ विजय
विराट कोहली: ५० सामने, ३० विजय
रोहित शर्मा: ६२ सामने, ४९ विजय
सूर्यकुमार यादव: ५२ सामने, ४० विजय
रोहित अव्वल
विजयाच्या टक्केवारीच्या बाबतीत केवळ रोहित शर्मा सूर्यकुमारच्या पुढे आहे. हिटमॅनच्या कर्णधारपदाखाली भारताने ६२ पैकी ४९ टी२० सामने (७९.०३%) जिंकले. भारताने १२ सामने गमावले आणि एक सामना बरोबरीत सुटला. रोहितच्या नेतृत्वाखाली, टीम इंडियाने २०२४ मध्ये टी-२० विश्वचषक ट्रॉफी जिंकून अनेक वर्षांचा दुष्काळ संपवला. यापूर्वी, भारतीय संघाने २००७ मध्ये धोनीच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा टी-२० विश्वचषक जिंकला होता.