‘छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय’; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं अभिनेता भडकला

‘छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय’; निवडणूक प्रचारात अपमान झाल्यानं अभिनेता भडकला

Kiran Mane Post: अभिनेते किरण माने (Kiran Mane) यांनी ‘मुलगी झाली हो’ ही मालिका आणि ‘बिग बॉस मराठी सीझन 4’ मधून प्रेक्षकांचे मनोरंजन (Entertainment) केले. सध्या ते ‘सिंधूताई माझी माई- गोष्ट चिंधीची’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेत. दरम्यान किरण सोशल मीडियावर (Social media) विशेष चर्चेत असतात. आता त्यांनी पुन्हा एक पोस्ट केली आहे, त्यात छत्रपतींच्या गादीचा अपमान झाल्याबद्दल त्यांनी सडेतोड टीका करत संताप व्यक्त केला आहे.


काय आहे पोस्ट

कोल्हापूर असो वा सातारा… छत्रपतींची गादी हा महाराष्ट्राच्या काळजातला विषय. गादीला मत दिलं-नाही दिलं तरी, अपमानकारक विधानं करून कधीच कुणी महामानवांशी प्रतारणा नाही केली. सातारचे आदरस्थान छत्रपती उदयनराजे भोसले मनुवाद्यांचा रस्ता पकडला म्हणून जनतेनं त्यांचा पराभव केला. पण त्यावेळीही त्या गादीचा अवमान होईल, असा एकही शब्द कुणी बोललं नव्हतं. आज मी स्पष्ट शब्दांत सांगू शकतो की छत्रपती उदयनराजे जर भाजपाकडून उभे राहिले तर मी त्यांना मत देणार नाही. पण त्यांच्या गादीविषयीचा आदर मात्र तसूभरही कमी होणार नाही. व्यक्ती वेगळी-महामानवांची गादी वेगळी. परवा कोल्हापूरात व्यक्तीला विरोध करताना घसरून सरळसरळ त्या गादीचाच अत्यंत वाईट अपमान केला गेला.

ही खुप खुप खुप घृणास्पद गोष्ट आहे. याहून मोठा कृतघ्नपणा असूच शकत नाही. मनूवाद्यांची घरातली कुजबूज स्वरूपातली भाषा आज लाचार बहुजनांकडून वदवून घेतली जात आहे, हे लक्षात घ्या. पाठीचा कणा मोडून वर्चस्ववादी सत्ताधार्‍यांच्या वळचणीला गेलेला प्रत्येक नेता जे बोलतोय… ते त्याचे स्वत:चे मत नाही. त्याच्या नाजूक जागा पकडीत चेंबटून त्याच्याकडून ते बोलून घेतलं जातंय. वयाची साठ-पासष्ठ वर्ष ज्या चुलत्याच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल केली… ज्या चुलत्यानं मुलगा मानून मतदारसंघ आणि मोठमोठ्या पदांचा धनी बनवलं… त्या चुलत्याला मी एकवेळ विरोध करेन, पण वावगं बोलायची आपली कुणाची जीभ रेटेल का??? समजा, मी रिक्षावाला होतो. ज्या घरानं, कुटूंबानं मला नांव, पैसा, मानसन्मान दिले… त्या घराच्या मी एकवेळ विरोधात जाईन, पण त्या घराविषयी मी चुकीचा एक तरी शब्द काढेन का???

अक्षयच्या ‘BMCM’ वरही प्रेक्षक नाराज? कमाईतही मोठी घसरण; पाहा दुसऱ्या दिवसाचं कलेक्शन

यांचे ‘बोलविते धनी’ वेगळे आहेत. मतदारांनो ते ओळखा. आपल्या महामानवांनी आपल्या स्वातंत्र्यासाठी आयुष्य खर्ची घातलंय. मनूवाद्यांची सगळी कटकारस्थानं, खोट्या बदनामीचे घाव झेललेत. त्यांच्याशी गद्दारी करू नका. कोल्हापूरचे शाहू छत्रपती भाजपाकडून उभे राहिले असते तर आम्हीही त्यांना विरोध केला असता, पण या पातळीवर नक्कीच उतरलो नसतो. पण आपल्या सुदैवाने हे शाहू त्या समतेच्या विचारधारेची नाळ जपणारे आहेत. वर्चस्ववाद्यांना ठेचायला मैदानात उतरले आहेत. त्यांचे हात बळकट करून मातीशी इमान राखणं हे प्रत्येक कोल्हापूरकराचे कर्तव्य आहे.

यावर अनेकांनी कमेंट करत त्यांच्या पोस्टवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. यावर एकाने “एकूणच भाजपचे लोक अहंकारी आणि उन्मत्त झालेत याचा हा नमुना आहे”, अशी कमेंट केली आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज