पाकिस्तानला शहाणपण नडला! हवाई मार्ग बदलला; कोट्यवधींचं नुकसान, जाणून घ्या कसं?

Pakistan Airlines : जम्मू आणि काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर (Pahalgam Terrorist Attack) भारत सरकारने पाकिस्तानावर कठोर कारवाई करत सिंधू जल करार (Indus Water Treaty) रद्द केला तसेच देशात असणाऱ्या सर्व पाकिस्तानी नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. याच बरोबर भारत सरकारने पाकिस्तानी नागरिकांचे व्हिसा (Visa) देखील रद्द केला आहे. तर दुसरीकडे भारताच्या या कारवाईनंतर पाकिस्तानने देखील भारताला प्रत्युत्तर देण्यासाठी भारतीय विमानांसाठी आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. मात्र आता याचा मोठा फटका पाकिस्तानला बसत आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानला दररोज अंदाजे 19,721,856 रुपये तोटा होत आहे.
तर दुसरीकडे सोमवारी पाकिस्तान इंटरनॅशनल एअरलाइन्सने (Pakistan Airlines) लाहोरहून उड्डाणाचा मार्ग बदलले आहेत. विमान भारतातून नेहमीच्या मार्गाऐवजी चीनच्या (China) हवाई हद्दीतून क्वालालंपूरकडे जात आहे. यामुळे पाकिस्तानला दररोज कोट्यवधी रुपयांचे नुकसान होत आहे. जेव्हा एखादे विमान एखाद्या देशाच्या हवाई क्षेत्रातून जाते तेव्हा त्याला ओव्हरफ्लाइट शुल्काच्या स्वरूपात पैसे द्यावे लागतात. आता भारतीय विमाने पाकिस्तानी हवाई क्षेत्रातून उड्डाण करत नाहीत. यामुळे पाकिस्तानला ओव्हरफ्लाइट शुल्क मिळणार नाही. समोर आलेल्या माहितीनुसार यापूर्वी भारतातून उड्डाण करणाऱ्या 737 विमानाला पाकिस्तानवरून जाताना सुमारे 49,304 रुपये ओव्हरफ्लाइट शुल्क द्यावे लागत होते तर मोठ्या विमानांसाठी हे शुल्क जास्त होते. त्यामुळे सध्या पाकिस्तानला केवळ ओव्हरफ्लाइट शुल्कामुळे दररोज अंदाजे 19,721,856 रुपये तोटा होत होता. तर लँडिंग आणि पार्किंगसारखे इतर शुल्क जोडले गेले दररोज पाकिस्तानला 25,502,400 रुपयांचे नुकसान होत आहे.
तर जुलै 2019 मध्ये पुलवामा दहशतवादी हल्ल्यानंतर पाकिस्तानने आपले हवाई क्षेत्र बंद केले होते. यामुळे पाकिस्तानला सुमारे 100 दशलक्ष डॉलर्स (850 कोटी रुपये) नुकसान सहन करावे लागले होते.
800 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम
तर पाकिस्तानच्या घेतलेल्या या निर्णयामुळे दर आठवड्याला भारतीय विमान कंपन्यांद्वारे चालवल्या जाणाऱ्या 800 हून अधिक आंतरराष्ट्रीय उड्डाणांवर परिणाम होण्याची शक्यता आहे. एअर इंडिया आणि इंडिगोने दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या काही आंतरराष्ट्रीय उड्डाणांना समस्या येत आहेत. दिल्ली, अमृतसर, जयपूर, लखनऊ आणि वाराणसी सारख्या शहरांमधून येणाऱ्या विमानांना लांब मार्गाने जावे लागत आहे. पाकिस्तानावरून उड्डाण करण्याऐवजी, ही उड्डाणे आता अरबी समुद्रावरून लांब मार्गाने जात आहेत.
पहलगाम येथे 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 27 पर्यटकांचा मृत्यू झाला होता. यानंतर भारत सरकारने पाकिस्तानावर कठोर भूमिका घेत पाकिस्तानच्या सर्व नागरिकांना देश सोडण्याचे आदेश दिले आहे. याच बरोबर भारत सरकारने 1960 मध्ये झालेल्या सिंधू जल करार देखील रद्द केला आहे.