पक्षासाठी आम्ही मेहनत केली अन् उमेदवारी उपऱ्यांना दिली, राज्यभरात भाजप कार्यकर्ते आक्रमक
भाजपने तिकीट कापलं म्हणून कार्यकर्त्याने थेट नेत्यांनाच शाप दिल्याचं समोर आलं आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते धावून गेल्याचं पाहायला मिळालं.
भारतीय जनता पक्षाने उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी (BJP) अनेक दिग्गजांना दणका दिला आहे. अनेक नगरसेवक आणि निष्ठावंत कार्यकर्त्यांचं तिकीट कापलं आहे.निष्ठावंतांचं तिकीट कापल्याने राज्यात अनेक ठिकाणी भाजप कार्यकर्त्यांमध्ये मोठा रोष बघायला मिळत आहेत. अशातच पुण्यात देखील विद्यमान ४२ नगरसेवकांचं तिकीट कापण्यात आलं आहे.
अशातच भाजपने तिकीट कापलं म्हणून कार्यकर्त्याने थेट नेत्यांनाच शाप दिल्याचं समोर आलं आहे. पुण्यात भाजपने तिकीट कापल्यानं कार्यकर्ता भाजप नेते आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ, योगेश टिळेकरांवर भडकल्याचं दिसून आलं. भाजपचे हडपसर विधानसभा मतदारसंघाचे झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष युवराज कुचेकर यांनी मुरलीधर मोहोळ, योगेश टिळेकर यांच्यावर संताप व्यक्त केला आहे. मी 22 वर्षांपासून भाजपमध्ये काम करतोय पण भाजपने माझ्यावर अन्याय केला आहे.
Video : छत्रपती संभाजीनगरमध्ये भाजप कार्यकर्ते आक्रमक, गाडी अडवत मंत्री सावे, कराडांना थेट शिव्या
काँग्रेसचे आयात उमेदवार आमच्या बोकांडी आणून ठेवलेत. आमदाराने सांगितलं मुरलीधर मोहोळ यांनी केलंय, मुरलीधर मोहोळ म्हणाले, तुमच्या योगेशअण्णा टिळेकरांनी हे केलंय. पक्ष आम्ही वाढवलाय काँग्रेसने नाही, पक्षात कार्यकर्ते नव्हते का? मी काय पेटवून घेणार नाही, पण हे आपोआप पेटणार आहेत. कारण काँग्रेसचा आयात उमेदवार 100% पडणार आहे, अशा शब्दात युवराज कुचेकर यांनी आपला रोष व्यक्त केला आहे.
या भाजपच्या संतापलेल्या कार्यकर्त्याचा व्हिडीओ सध्या सोशल मिडीयावरती व्हायरल होत आहे, या व्हिडीओमध्ये कार्यकर्त्यांने म्हटलंय की, मी युवराज कुचेकर भारतीय जनता पार्टीचा हडपसर विधानसभेचा झोपडपट्टी आघाडीचा अध्यक्ष आहे. जवळ जवळ भाजपमध्ये 22 वर्ष मी काम करतो आहे. मी त्यांच्याशी एकनिष्ठ आहे. पण माझ्यावर पूर्णपणे त्यांनी अन्याय केलेला आहे, काँग्रेसचा आयात उमेदवार आमच्या बोकांडी आणून बसवला आहे.
आम्ही आत्तापर्यंत पक्षात जे काम केलेले आहे त्याचं फळ पक्षाने आज पर्यंत आम्हाला कधी दिले नाही, याबाबत विचारलं असता आमदाराने सांगितलं, मुरलीधर मोहोळ यांनी केलं आहे, मुरली अण्णांनी सांगितलं तुमच्या योगेश अण्णा टिळेकरांनी केलं आहे, आम्ही ज्याच्याकडे न्याय मागायला गेलो तिथे आम्हाला काही नाही भेटलं नाही, आम्हाला निष्ठावंतांना त्यांनी काय दिले आता मी काय करायचं? पक्ष आम्ही वाढवला आहे, काँग्रेसने आपला पक्ष वाढवला नाही.
पक्षात कार्यकर्ते मजबूत नव्हते का?? जे काय झालेले आहे ते चुकीचा झालेलं आहे, मी तर काही पेटवून घेणार नाही. हे आपोआप पेटणार आहेत, भाजपने बाहेरून आयात केलेले उमेदवार शंभर टक्के नाही तर 110% ते पडणार आहेत आणि हा शब्द माझा आहे, असं म्हणत या कार्यकर्त्यांनी आपला संताप व्यक्त केला आहे.
