Sangamner : गणेश विसर्जन मिरवणुकीत मानपानावरून राडा! थोरातांचा सन्मान, संतापलेले आमदार खताळ थेट निघूनच गेले

Balasaheb Thorat VS MLA Amol Khatal In Sangamner : संगमनेरमध्ये बाळासाहेब थोरात विरुद्ध आमदार अमोल खताळ यांच्यामधील संघर्ष दिवसेंदिवस टोकाला जात आहे. गणेश मंडळाच्या एका विसर्जन मिरवणुकीमध्ये खताळ अन् थोरात हे सहभागी झाले. पण तेव्हाच मानपानावरून पुन्हा एकदा राडा झाल्याचे पाहायला मिळाले. अमोल खताळ मान सन्मान न घेता थेट निघून गेले. त्यामुळे पुन्हा एकदा थोरात विरुद्ध खताळ हा संघर्ष अधोरेखित झाला.
संगमनेरमध्ये गणेश उत्सवाचा जल्लोष
सर्वत्र गणेश उत्सव जल्लोषात (Ganesh Visarjan) साजरा करण्यात आला. अखेर दहा दिवसानंतर लाडक्या बाप्पाला भक्तिमय वातावरणात निरोप देखील देण्यात आला. गणेश विसर्जन मिरवणुकी दरम्यान संगमनेरमध्ये (Sangamner) एका गणेश मंडळांनी माजी आमदार बाळासाहेब थोरात ( Balasaheb Thorat) अन् विद्यमान आमदार अमोल खताळ यांचा (Amol Khatal) मानसन्मान आयोजित करण्यात आला होता. यावेळी खताळ अन् थोरात आमने-सामने आले. यावेळी थोरात यांनी आपला सन्मान स्वीकारला. मात्र, अमोल खताळ यांनी सन्मान स्वीकारास नकार दिला अन् थेट तिथून काढता पाय घेतला.
थोरात-खताळ आमनेसामने
गणेश उत्सव हा धार्मिक आणि सामाजिक महोत्सव असून या माध्यमातून सर्वजण एकत्र येत असतात. राष्ट्र बळकट होण्यासाठी, देश बळकट होण्यासाठी सामाजिक संघटन या माध्यमातून होत असतं, हे कोणी विसरलं नाही पाहिजे. शंभर वर्षाहून अधिक वर्षाची परंपरा असलेल्या सोमेश्वर देवस्थान इथे आम्ही आलो होतो. एकत्र येऊन हा उत्सव साजरा केला जातो. या ठिकाणी सर्व धर्म समभाव आहे. आपले राजकारणाचे जोडे हे बाजूला ठेवूनच धार्मिक कार्य करावे, असा सल्ला यावेळी बाळासाहेब थोरात यांनी खातळांना दिला.
सर्वांनी एकत्र आलं पाहिजे
महाराष्ट्रातले वातावरण सध्या गढूळ केला जात आहे. माणसांना दूर केला जात असून जाती-जातीपासून दूर करण्याचा जे काही डाव चालू आहे, जे कोणी यामधील सूत्रधार आहे, ते जनतेने ओळखले पाहिजे. याचा भेदभाव काही कामाचा नसून सर्वांनी एकत्र आले पाहिजे. यामुळे मी गणरायाच्या चरणी प्रार्थना केली आहे की, देश, आमचा महाराष्ट्र आणि मानवता ही एकत्र राहिली पाहिजे, असं देखील यावेळी माजी आमदार बाळासाहेब थोरात म्हणाले.
मी एक सर्वसाधारण मुलगा…
सोमेश्वर मंडळाची गेल्या अनेक वर्षांपासून प्रथा आहे की, जो विद्यमान आमदार आहे. त्याच्या हस्ते विसर्जन मिरवणूक सुरुवात होत असते. मला या पूजेचा मान मिळाला. मात्र, या ठिकाणी काही राजकारण पाहायला मिळालं. एक सामान्य मुलगा आमदार झाल्याचं काहींना पाहावलं जात नाही. कुठलाही मान-पान न ठेवता यापूर्वीही मी एक सर्वसाधारण मुलगा म्हणून या गणेश उत्सवात सहभागी झालो आहे, असं यावेळी आमदार अमोल खताळ यांनी आपलं मत व्यक्त केलं.