महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का?, काँग्रस प्रदेशाध्यक्षांचा फडणवीसांवर घाव

Harshvardhan Sapkal : औरंगजेबाची कबर पाडण्याच्या संदर्भात(Sapkal ) काही संघटनांनी मागणी केली होती. यातच काही दिवसांपूर्वी नागपुरात दंगलीची घटना घडली. तसेच बीड जिल्ह्यातील संतोष देशमुख हत्या प्रकरणही अद्याप चर्चेत आहे. या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीरून आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Video : नागपुरात हिंसाचार घडवणाऱ्यांची प्रॉपर्टी विकली जाणार; फडणवीसांनी दिले थेट आदेश
हर्षवर्धन सपकाळ यांनी महाराष्ट्राचा गृहविभाग घाशीराम कोतवाल चालवत आहे का? असा घणाघाती सवाल केला आहे. ते पुण्यात पत्रकार परिषदेत बोलत होते. तसंच, राज्यातील कायदा व सुव्यवस्था राखण्यास महाराष्ट्राच्या गृहविभागाला अपयश आलं असून आता महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री मिळायला हवे, अशी थेट मागणी देखील हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
काय म्हणाले हर्षवर्धन सपकाळ?
महाराष्ट्राला आज पूर्णवेळ गृहमंत्री नाहीत. महाराष्ट्राला पूर्णवेळ गृहमंत्री असले पाहिजेत. काही दिवसांपूर्वी बीड जिल्ह्यात संतोष देशमुख यांच्या हत्येचं प्रकरण घडलं, याबरोबरच महाराष्ट्रातील अनेक भागात वेगवेगळ्या घटना घडल्या आहेत. महाराष्ट्रात घडणाऱ्या घटना पाहता आम्ही गृहमंत्र्यांना राजीनामा मागितला आहे आणि आताही मागत आहोत.
आता पुन्हा एकदा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आमचा एक नव्याने प्रश्न आहे. त्या प्रश्नाचं उत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं पाहिजे. महाराष्ट्राचा गृहविभाग घाशिराम कोतवाल चालवत आहे का? असा प्रश्न सध्या महाराष्ट्रातील परिस्थिती पाहून उपस्थित होत आहे. सध्या महाराष्ट्रात घाशिराम कोतवाली कारभार गृहविभागाचा सुरु आहे, अशी टीका हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.