‘अण्णा, तुमचं आंदोलन आम्हाला परवडणार नाही’; CM शिंदेंचा फोन, अण्णांचीही हसून दाद

‘अण्णा, तुमचं आंदोलन आम्हाला परवडणार नाही’; CM शिंदेंचा फोन, अण्णांचीही हसून दाद

Eknath Shinde Calls Anna Hajre : आज बरोबर अकरा वर्षे उलटून गेली. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hajare) यांनी लोकपाल विधेयकासाठी राजधानी दिल्लीत मोठं आंदोलन उभारलं. या आंदोलनाला जनतेचा मोठा पाठिंबा मिळाला. केंद्र सरकारसह विविध राज्यात विविध नियम अटींसह लोकपाल विधेयक अस्तित्वात आलं. त्यानंतर काल राज्य विधिमंडळातील अधिवेशनादरम्यान (Maharashtra Winter Session) थेट मुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनाच लोकायुक्तांच्या कक्षेत आणण्याची तरतूद असणारं विधेयक मंजूर करण्यात आलं. याच विधेयकावर चर्चा सुरू असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी थेट अण्णा हजारेंनाच फोन लावला. या दोघांतील खास संभाषणाची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

लोकायुक्त विधेयक काल चर्चेसाठी विधानपरिषदेत ठेवण्यात आले होते. त्यानंतर हे विधेयक आवाजी पद्धतीनं मंजूर झालं. केंद्र सरकारने लोकपाल कायदा केल्यानंतर राज्यांनीही असाच लोकायुक्त कायदा करावा, अशी अपेक्षा होती. राज्य विधीमंडळाने या विधेयकाला मंजुरी दिली. पारदर्शक कारभार करण्याकरता या विधेयकामुळं आपल्यावर अंकुश असेल. लोकायुक्तांना निवडण्याची समिती ही पारदर्शी आहे. या समितीती मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, दोन्ही सभागृहाचे विरोधीपक्षनेते, स्पीकर, हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश आहेत. लोकायुक्तांची निवड पारदर्शीपणे करण्यात येईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.

आता मुख्यमंत्र्यांचीही चौकशी करता येणार! अण्णा हजारेंना दिलेला शब्द फडणवीसांनी पाळला

या कायद्यासाठी अण्णा हजारे यांनी उपोषण केले होते. तेव्हा त्यांना आवश्यक लोकायुक्त कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. यासाठी सरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. अण्णा हजारे आणि त्यांचे प्रतिनिधी या समितीत होते. या समितीने सुचवलेले बदल मान्य करण्यात आल्याचे फडणवीस यांनी काल सभागृहात सांगितले होते. त्यानंतर आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी थेट अण्णांनाच फोन फिरवला. यावेळी दोघांत संभाषण झाले. त्यातच शिंदेंनी एक मिश्किल टिप्पणी करताच अण्णा हजारे यांनी त्यास हसून दाद दिली.

तुमचा एवढा आग्रह होत. आपली तशी चर्चाही झाली. सध्या एवढी आंदोलनं चालू आहेत त्यात तुमचं आंदोलन आम्हाला परवडू शकत नाही, असं मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याला अण्णा हजारे यांनीही हसत हसत दाद दिली. यानंतर अण्णा हजारे म्हणाले, हे लोकायुक्त विधेयक किती शक्तिशाली आहे हे आपल्याला थोड्याच दिवसांत कळेल. आजपर्यंत एवढे कायदे झाले असतील त्यातील हा शक्तिशाली असा लोकायुक्त कायदा आहे. तुम्ही सगळ्या लोकांनी जोर लावला म्हणून हे शक्य झालं.

त्यावर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, याला काही लोकांचा विरोध होता. नकारात्मक दृष्टीकोन होता. पण, आता आम्ही ठरवलं की अण्णा जे सांगतील ते कुठलंही चुकीचं काम होणार नाही. समाजासाठी त्यांचं चांगलच मत असणार. समाजाच्या भल्यासाठीच करणार म्हणून आम्ही ठरवून टाकलं आणि ते करूनही टाकलं. ज्या काही अडचणी होत्या त्या आता दूर झाल्या आहेत. त्यावर अण्णा हजारे म्हणाले, तुमच्या कारकिर्दीत झालं हा एक इतिहासच झाला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube