‘कांद्याचा वांदा’ : महायुतीसाठी ‘7 लोकसभा अन् 32 विधानसभा मतदारसंघात’ धोक्याची घंटा

‘कांद्याचा वांदा’ : महायुतीसाठी ‘7 लोकसभा अन् 32 विधानसभा मतदारसंघात’ धोक्याची घंटा

निवडणुका म्हटंल की मतदार राजाला खूश करण्याकडे सरकारचा कल असतो. कोणत्याही वस्तूची किंमत नियंत्रणात ठेवणे किंवा कमी करणे यावर सरकारचा भर असतो. मागील सहा ते सात महिन्यांपासून मोदी सरकारने (Modi Government) कांद्याच्याबाबतीत हेच धोरण अवलंबिले आहे. कांद्याच्या (Onion) किंमती नियंत्रित ठेवण्यासाठी सरकारने देशातील कांदा देशातच ठेवण्याचा निर्यण घेतला. निवडणुकीच्या तोंडावर कांद्याचा तुटवडा भासू नये, दर वाढू नये यासाठी कांद्याच्या निर्यातीवर निर्बंध लागू केले.सरकारच्या या निर्णयाचा सामान्य नागरिकांना फायदाच झाला. (Due to Onion issue may face difficulty for BJP and Mahayuti in seven Lok Sabha and 32 assembly constituencies)

पण सामान्य नागरिकांना खूश करण्याच्या नादात सरकारने कांदा उत्पादक शेतकऱ्यांची नाराजी मात्र ओढवून घेतली आहे. कांद्याला भाव मिळत नाही, बाजार समितीतीत दर पाडले जातात, निर्यातीवरील निर्बंधांमुळे आमचे नुकसान होत आहे, अशी तक्रार शेतकरी अनेक दिवसांपासून करत आहेत. राज्य सरकारही शेतकऱ्यांची नाराजी दूर करण्यासाठी प्रयत्न करत आहे, मात्र केंद्रात आपलेच सरकार असल्याने त्यांनाही फारसे उघड पणे बोलता येत नाहीये.

दोन दिवसांपूर्वी सुजय विखे पाटील आणि काही अन्य काही भाजप नेत्यांनी निर्यातबंदी उठवली असल्याची माहिती देत श्रेयही घेण्याचा प्रयत्न केला. पण शेतकऱ्यांचा आणि नेत्यांचा हा आनंद क्षणिक ठरला. 24 तासांच्या आतच सरकारने स्पष्टीकरण देत निर्यातबंदी 31 मार्चपर्यंत कायम असल्याचे सांगितले. त्यामुळे शेतकऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला आहे. आता याच हिरमोडीचा मोदी सरकार आणि शिंदे सरकारला महाराष्ट्रात 7 लोकसभा आणि तब्बल 32 विधानसभा मतदारसंघांत फटका बसण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कांदा करणार महायुतीचा वांदा :

महाराष्ट्रातील नाशिक, अहमदनगर, सोलापूर, सातारा आणि पुणे जिल्हा कांदा उत्पादनासाठी ओळखला जातो. या पाच जिल्ह्यांमध्ये लोकसभेचे सात मतदारसंघ येतात. यात दिंडोरी, अहमदनगर, शिर्डी, माढा, सातारा, शिरुर, बारामती हे सात लोकसभेचे मतदारसंघ कांदा उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे प्रभाव क्षेत्र मानले जातात. यातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात विधानसभेचे सहा मतदारसंघ येतात. त्यामुळे 42 पैकी किमान 32 विधानसभा मतदारसंघांमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या नाराजीचा सत्ताधाऱ्यांना समाना करावा लागू शकतो.

दिंडोरी –

दिंडोरी लोकसभा मतदारसंघात नांदगाव, कळवण, चांदवड, येवला, निफाड, दिंडोरी हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. यातील निफाड तालुक्यात येणाऱ्या लासलगावला देशातील सर्वात मोठी कांद्याची बाजारपेठ आहे. दिंडोरी लोकसभा आणि 6 विधानसभा मतदारसंघात येणाऱ्या निफाड, येवला, चांदवड, सिन्नर, देवळा, मालेगाव, कळवण व सटाणा परिसरात कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर होते. त्यात लासलगाव परिसर आघाडीवर आहे. इथल्या कांद्यातील वैशिष्ट्यपूर्ण गुणधर्मामुळे 2016 साली येथील कांद्याला ‘लासलगाव कांदा’ असे भौगोलिक चिन्हांकनही मिळाले आहे. त्यामुळे इथल्या कांद्याला जगभरात वेगळी ओळख मिळाली आहे.

Anjali Damania : “आधी भुजबळ, आता बारस्करांना उभं केलं”; दमानियांचा सरकारवर हल्लाबोल

दिंडोरीमधून सध्या भारती पवार या भाजपच्या खासदार आहेत. तर नांदगावमधून शिवसेनेचे सुहास कांदे, चांदवडमधून भाजपचे राहुल आहेर हे आमदार आहेत. उर्वरित चार ठिकाणी राष्ट्रवादी (अजित पवार गट) आमदार आहेत. यात कळवणमधून  नितीन पवार, येवलामधून छगन भुजबळ, निफाडमधून दिलीप बनकर आणि दिंडोरीमधून नरहरी झिरवळ हे आमदार आहेत. एकूण संपूर्ण दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा कांद्याच्या पट्ट्यात येणार असून इथे आता सर्वच जण सत्ताधारी गटात आहेत.

अहमदनगर –

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात शेवगाव, राहुरी, पारनेर, श्रीगोंदा, अहमदनगर शहर, श्रीगोंदा आणि कर्जत-जामखेड हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात. कांद्याच्या वाढीसाठी आवश्यक असलेली डोंगर उताराची आणि पाण्याचा निचरा होणारी जमीन या सर्व भागात असल्याने कर्जत जामखेड वगळता अन्य ठिकाणी कांद्याचे पीक मोठ्या प्रमाणात घेतले जाते. अहमदनगरमधून सध्या भाजपचे सुजय विखे पाटील खासदार आहेत. तर शेवगावमध्ये भाजपच्या मोनिका राजाळे, राहुरीमधून राष्ट्रवादी (शरद पवार गट) गटाचे प्राजक्त तनपुरे, पारनेरमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) निलेश लंके, अहमदनगर शहरमधून संग्राम जगताप, श्रीगोंद्यामधून भाजपचे बबनराव पाचपुते आमदार आहेत.

शिर्डी –

अहमदनगरप्रमाणेच शिर्डी लोकसभा मतदारसंघातीलही सर्व 6 मतदारसंघामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. शिर्डीतून सध्या शिवसेनेचे सदाशिव लोखंडे खासदार आहेत. तर सहामधील अकोलेमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) किरण लहामटे, संगमनेरमधून काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, शिर्डीतून भाजपचे राधाकृष्ण विखे पाटील, कोपरगावमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) आशुतोष काळे, श्रीरामपूरमधून काँग्रेसचे लहू कानडे, नेवासामधून क्रांतीकारी शेतकरी पक्षाचे (शिवसेनेचे) शंकरराव गडाख आमदार आहेत.

माढा –

माढा मतदारसंघातील करमाळा, माढा आणि सांगोला विधानसभा मतदारसंघातील गावांमध्ये कमी प्रमाणात कांद्याचे उत्पादन होते. मात्र याच मतदारसंघातील माळशिरस, फलटण आणि माण या मतदारसंघातील गावांमध्ये कांद्याचे मोठ्या प्रमाणावरील उत्पन्न घेतले जाते. माढ्यातून सध्या भाजपचे रणजीतसिंह नाईक निंबाळकर खासदार आहेत. तर माळशिरसमधून भाजपचे राम सातपुते आमदार आहेत. याशिवाय फलटणमधून राष्ट्रवादी (अजित पवार गट) दीपक चव्हाण आणि माणमधून भाजपचे जयकुमार गोरे आमदार आहेत. विशेष म्हणजे निंबाळकर यांना माळशिरसमधून एक लाख 630 मतांची आघाडी मिळाली होती. त्यामुळे भाजपला इथून एक प्रकारे धोक्याचीच घंटा असल्याचे बोलले जात आहे.

सातारा –

माढा मतदारसंघाला लागून असलेल्या कोरेगाव, खंडाळा या तालुक्यांमध्ये रब्बी हंगामात कांदा हे प्रमुख पिकांपैकी एक आहे. याच खंडाळा तालुक्यात लोणंद ही काद्यांची महाराष्ट्रातील दुसऱ्या नंबरची बाजारपेठ आहे. खंडाळा, वाई, कोरेगाव, फलटण आणि माण या भागातून कांद्याची आवक होत असते. साधारण 15 एकरातील या बाजारपेठेत आठवड्याला साडेसात ते  आठ हजार क्विंटल कांद्याची आवक होते. कोरेगावमधून सध्या शिवसेनेचे महेश शिंदे आमदार आहेत, तर खंडाळा तालुका हा वाई मतदारसंघात आहे. दोन तालुक्यांच्या या मतदारसंघातून राष्ट्रवादी (अजित पवार गट) मकरंद पाटील आमदार आहेत.

शिरुर –

शिरुर हा मतदारसंघ टोकाचा शहरी आणि टोकाचा ग्रामीण अशा दोन्ही भागांत विभागला गेला आहे. तिरक्या पसरलेल्या या मतदारसंघातील भोसरी आणि हडपसर हे शहरी मतदारसंघ सोडले तर अन्य चारही मतदरासंघ हे ग्रामीण पट्ट्यातील असून सर्वाधिक कांदा उत्पादन करणारे मतदारसंघ म्हणून ओळखले जातात. शिरुरमधून सध्या राष्ट्रवादी (शरद पवार) गटाचे अमोल कोल्हे खासदार आहेत. तर शिवसेनेचे अढळराव पाटील लोकसभेच्या तयारीला लागले आहेत.

‘वंचित’ अजून ‘मविआ’मध्ये नाही, ‘त्यांच्या’ जागावाटपानंतरच चर्चा करू’; आंबेडकरांनी स्पष्टच सांगितलं

विधानसभेच्या बाबत विचार करायचा झाल्यास जुन्नर, आंबेगाव, खेड-आळंदीमधून सत्ताधारी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) आमदार आहेत. यात जुन्नरमधून अतुल बेनके, आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील, खेड-आळंदीमधून दिलीप मोहिते आमदार आहेत. शिरुरमधून राष्ट्रवादीचे पण शरद पवारांच्या गटातील अशोक पवार आमदार आहेत. त्यामुळे या मतदारसंघात कांद्याच्या प्रश्नावरुन राष्ट्रवादी (अजित पवार) गटाला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे.

बारामती –

बारामती मतदारसंघही कांदा उप्तादन करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात संख्या आहेत. अगदी नाराज शेतकऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या विरोधात मतदान केल्यास निकाल बदलू शकेल इतपत संख्या मोठी आहे. बारामतीमधून सध्या राष्ट्रवादीच्या (शरद पवार) गटाच्या सुप्रिया सुळे खासदार आहेत. तर सहा विधानसभांपैकी बारामतीमधून स्वतः अजित पवार, दौंडमधून भाजपचे राहुल कुल, इंदापूरमधून राष्ट्रवादीचे (अजित पवार) दत्तात्रय भरणे, पुरंदरमधून काँग्रेसचे संजय जगताप, भोरमधून संग्राम थोपटे आणि खडकवासल्यातून भाजपचे भिमराव तापकीर आमदार आहेत.

सध्या सुरु असलेल्या राजकीय घडामोडींमध्ये भाजप आणि पंतप्रधान मोदी यांना एक एक जागा महत्वाची असल्याचे दिसून येते. त्यामुळे आता या सात लोकसभा आणि 32 विधानसभा मतदारसंघांसाठी मोदी सरकार काय आणि कसा तोडगा काढणार हे बघणे महत्वाचे ठरणार आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज