दोन हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या तरी तुमची योग्य वेळ… राऊतांचा फडणवीसांवर घाव

Sanjay Raut on CM Fadnavis : महायुती सरकार आल्यापासून राज्यात दोन हजारांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यामधील बहुतेक आत्महत्या या कर्जबाजारीपणामुळे झाल्या आहेत. (Raut) सत्तेवर येण्यासाठी महायुतीने निवडणुकीच्या तोडांवर कर्जमाफीची घोषणा केली होती. परंतु आता देवेंद्र फडणवीस म्हणतात, योग्य वेळी कर्जमाफी करु. ही योग्य वेळ कधी येणार? असा प्रश्न शिवसेना उबाठा नेते संजय राऊत यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांना विचारला.
पुण्यात बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, शेतकरी कर्जमाफीसंदर्भात सरकार संवेदनशील आहे. कर्जमाफी कधी करायची, या संदर्भातील काही नियम आहेत. त्याची एक पद्धती आहे. योग्यवेळी हा निर्णय घेतला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले होते.
लाडक्या बहिणींना वेळेवर पैसे देता येत नाही, शेतकऱ्यांचे कर्जमाफ करता येत नाही, पण माळेगाव सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन करा, मी एका दिवसांत ५०० कोटी रुपये घेऊन येतो, असे अजित पवार म्हणत आहेत. ते राष्ट्रीय नेते आहेत, पण अजूनही गावातच फिरत आहे, अशी टीका संजय राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली.
देशाला स्वातंत्र मिळवून देण्यासाठी काँग्रेस लढत असताना भाजपचे लोक संजय राऊतांचा घणाघात
मनसे आणि शिवसेना उबाठा युतीवर राऊत म्हणाले, ठाकरे बंधूंना मी अनेक वर्षांपासून ओळखत आहे. राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे हे दोन्ही नेतेच मनसे आणि शिवसेना उबाठा युतीबाबत निर्णय घेतील. आज जे राजकारणात आले, त्यांच्या मताला मी काहीच महत्व देत नाही. आज महाराष्ट्राचा अस्तित्वाचा प्रश्न आहे. यामुळे संयम आणि त्याग गरजेचा आहे.
संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यातही वेगळ्या विचाराचे लोक एकत्र आले होते, हा इतिहास आज राजकारणात आलेल्या लोकांनी लक्षात घ्यावा, असे संजय राऊत यांनी सांगितले. तसंच, इराण आणि इस्त्रायल युद्धात ट्रम्प का आले? भारत आणि पाकिस्तान संघर्ष सुरु असताना या डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्ध थांबल्याचा दावा अनेक वेळा केला. त्यांना त्यावेळी शांतता हवी होती. आता त्यांना नोबेल पुरस्कार हवा आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.