“शिवसेना संपवण्याचा भाजपाचा दुष्ट हेतू, फडणवीसांनी तर..”, भास्कर जाधवांचा घणाघात

Bhaskar Jadhav : मागील चार वर्षात आपल्या पक्षांवर अनेक संकटं आली. ज्यांच्याबरोबर (भाजप) युती होती ते आज शिवसेनेची करंगळी धरुन देशाचे राज्यकर्ते झाले. ज्या शिवसेनेमुळे आपण देशाच्या गादीवर बसलो याचं भान त्यांनी ठेवलं नाही. शिवसेना संपवण्याचाच दुष्ट हेतू भाजपनं ठेवला. 2014 मध्ये युती तोडली. विश्वासघात केला, अशा शब्दांत ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव (Bhaskar Jadhav) यांनी भाजप आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर (Devendra Fadnavis) घणाघाती टीका केली.
शिवेसना (उबाठा) पक्षाच्या 59 व्या वर्धापनदिनानिमित्त मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात आयोजित मेळाव्यात जाधव बोलत होते. यावेळी त्यांनी आपल्या भाषणात भारतीय जनता पार्टीवर घणाघाती टीका केली. आम्ही हिंदुत्व सोडलं काँग्रेसशी आघाडी केली म्हणून आमच्यावर टीका करता. पण देवेंद्र फडणवीस यांनी विश्वासघात करुन अजित पवार यांच्याबरोबर 80 तासांचं सरकार स्थापन केलं होतं. खरंतर त्याचवेळी फडणवीसांनी शिवसेनेच्या पाठीत खंजीर खुपसण्याचं काम केलं होतं.
आता तर उद्धव ठाकरेंची शिवसेना संपवण्याचं काम सातत्याने केलं जात आहे. चारही बाजूंनी त्यांना घेरण्याचा प्रयत्न केला जात आहे. ईडी आणि सीबीआयच्या कारवाया करून नेत्यांना सारखा त्रास दिला जात आहे. ठाकरेंना घेरण्याचा प्रयत्न होत आहे. नामोहरम करण्याचा प्रयत्न केला जात आहे. पण या सगळ्यांतून बाहेर पडून उद्धव ठाकरेंनी कधीही गुडघे टेकले नाहीत अशा शब्दांत आमदार जाधव यांनी उद्धव ठाकरेंचं कौतुकही केलं.
Marathi Vs Hindi Language Row : मराठीच्या मरणकळा आणि फडणवीस यांचे वकिली चातुर्य
कर्जमाफीसाठी लढा उभारणार : दानवे
विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे (Ambadas Danve) यांनीही राज्य सरकारवर आगपाखड केली. राज्य सरकारकडे शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करण्यासाठी पैसे नाहीत. सरकार तशी कर्जमाफी देणार नाही. त्यासाठी आता आपल्यालाच मोठा लढा उभारावा लागणार आहे. हा लढा आपण नक्कीच उभारू असे अंबादास दानवे यावेळी म्हणाले आहेत.