पुण्याचे पालकमंत्री होता आणि आजही तुम्हीच आहात; पुण्यात काय विकास झाला? मोहोळ यांचा अजित पवारांना सवाल
25 ते 30 वर्ष तुमच्याच हातात पुण्याची सूत्र होती. आजही तुम्हीच पुण्याचे पालकमंत्री आहात. मग पुण्यात काय विकास झाला.
what development has happened, Union Minister Mohol asked Ajit Pawar : कात्रजमध्ये आयोजित चौकसभेत केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार(Ajit Pawar) यांच्यावर जोरदार टीका केली आहे. पुण्याच्या विकासावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत मोहोळ यांनी, भाजपनं काय केलं असा प्रश्न विचारणारे 25-30 वर्ष पुण्याचा कारभार पाहत होते, असा टोला लगावला आहे. पुढे बोलताना मोहोळ(Murlidhar Mohol) म्हणाले 25 ते 30 वर्ष तुमच्याच हातात पुण्याची सूत्र होती. आजही तुम्हीच पुण्याचे पालकमंत्री आहात. मग पुण्यात काय विकास झाला, हा प्रश्न तुम्हीच आम्हाला विचारूच कसे शकता? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे.
पुण्यातील वाढते नागरीकरण. लोकसंख्येचा ताण आणि भविष्यात येणाऱ्या अडचणी यांचा अंदाज त्या काळात घेतला गेला नाही, असा आरोप करत मोहोळ यांनी पुणे किती वेगाने वाढणार आहे, किती ताण येणार आहे याची तुम्हाला कल्पना नव्हती का? दूरदृष्टी आणि विकासाचा दृष्टिकोन नसल्यामुळेच आज पुण्यात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. असे स्पष्ट शब्दांत सांगितले. आम्ही काय केलंय ते सांगायला आम्ही जनतेसमोर आलो आहोत. मात्र ज्यांनी काहीच केलं नाही तेच आज आमच्याकडं बोट दाखवत आहेत, असा घणाघाती हल्ला त्यांनी चढवला आहे. विकासावर बोलायला काहीच नसल्यावर विषय भरकटवला जातो, पण पुणेकर सुज्ञ आहेत, हे देखील मोहोळ यांनी नमूद केलं.
पुढे बोलताना त्यांनी अजित पवार यांच्या नेतृत्वावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत, जर पुन्हा पुण्याची जबाबदारी तुमच्या हातात दिली, तर पुढच्या पिढीला तुम्ही देणार आहात? तुमचे उमेदवार आणि तुमचं चाललेलं राजकारण पाहता, पुण्याचं भविष्य धोक्यात घालण्यासाठीचं ही निवडणूक लढवली जात आहे, हे पुणेकर जाणतात, असं सांगितलं. ते म्हणतात आम्हाला सत्ता द्या. पण राज्यात मुख्यमंत्री आमचे आणि केंद्रात पंतप्रधानही आमचेच आहेत. मग विकास कुठून करणार? पुण्याचा विकास आम्हीच करणार आहोत, असं ठाम मत व्यक्त करत मोहोळ यांनी सभेला संबोधित केलं. या वक्तव्यांमुळे पुण्यातील राजकीय वातावरण अधिक तापण्याची शक्यता असून आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आरोप-प्रत्यारोपांना वेग येताना दिसत आहे.
