छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याचा मंत्र देशाला दिला, त्यांचे विचार जगभरात नेणार : अमित शाह

Amit Shah : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांनी (Chhatrapati Shivaji Maharaj) संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. राज्य कसे पाहिजे याचे एक उदाहरण त्यांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कार्यकाळात छत्रपती शिवाजी महाराजांनी जे-जे सांगितलं ते करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार काम करणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.
गृहमंत्री अमित शाह आज रायगड दौऱ्यावर आहेत. छत्रपती शिवाजी महाराज की जय, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की जय, भारत माता की जय अशा घोषणा देत अमित शाह यांनी भाषणाला सुरुवात केली. शाह पुढ म्हणाले, आदिलशाही, मुघलशाही, निजामशाहीने चारही बाजूंनी वेढलेला महाराष्ट्र हिंदवी स्वराज्यात बदलला. अगदी अटकपासून कटकपर्यंत हिंदवी स्वराज्य पसरलं.
लोकांनाही हळूहळू स्वधर्माची भाषा कळू लागली. छत्रपती शिवाजी महाराजांनी संपूर्ण देशाला स्वराज्याचा मंत्र दिला. छत्रपती शिवाजी महाराजांची सेना कटक, कर्नाटकपर्यंत पोहोचली तेव्हा लोकांना विश्वास वाटला की देश आणि धर्म वाचला. देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच 100 पूर्ण होतील तेव्हा भारत विकसित असेल. पण या सगळ्यांसाठी छत्रपती शिवाजी महाराजांचेच विचार होते असे अमित शाह यावेळी म्हणाले.
देशाच्या स्वातंत्र्याला लवकरच शंभर वर्षे पूर्ण होतील त्यावेळी भारत जगात एक नंबर असेल. औरंगजेब जोपर्यंत जिवंत होता तोपर्यंत येथील लोकांनी त्याच्याशी संघर्ष केला. स्वतःला आलमगीर म्हणवणाऱ्या औरंगजेबाचे थडगेही याच महाराष्ट्रात आहे असे मंत्री अमित शाह म्हणाला.
मी येतानाच देवेंद्र फडणवीसांना म्हटलं होतं की सातवी ते बारावीचा प्रत्येक विद्यार्थी या रायगडावर यायला पाहीजे. यासाठी प्रयत्न केले पाहीजेत. राज्य कसे पाहीजे याचे उदाहरण छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या सगळ्यांना दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी जे-जे सांगितलं ते करण्यासाठी आमचं डबल इंजिन सरकार काम करणार आहे, असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सांगितले.