‘राणेंना निवडून दिलं तर जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स’; केसरकरांच्या वक्तव्याने सामंतांना धडकी
![‘राणेंना निवडून दिलं तर जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स’; केसरकरांच्या वक्तव्याने सामंतांना धडकी ‘राणेंना निवडून दिलं तर जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स’; केसरकरांच्या वक्तव्याने सामंतांना धडकी](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/03/uday-samant.jpg)
Deepak Kesarkar : राज्यात अजूनही महायुती आणि महाविकास आघाडीचा जागावाटपाचा गुंता (Elections 2024) सुटलेला नाही. महायुतीत काही जागांवरून ताणाताणी सुरू आहे. त्यात नाशिक आणि ठाणे मतदारसंघाचं नाव आहे. या मतदारसंघात कडाक्याच्या उन्हाळ्यात राजकारणाचा पाराही चांगलाच वाढला आहे. या दोन जागांवरून तिन्ही पक्षांत धुसफूस सुरू असल्याची माहिती आहे. तर दुसरीकडे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे एकेकाळचे कट्टर राजकीय विरोधक दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राणेंबाबत केलेल्या वक्तव्याने सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.
दीपक केसरकरांचं वक्तव्य त्यांच्याच पक्षातील उद्योगमंत्री उदय सामंत आणि लोकसभा निवडणुकीसाठी इच्छुक असलेले त्यांचे बंधू किरण सामंत यांच्यासाठी धक्कादायक असल्याचे मानले जात आहे. दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत मोठे वक्तव्य केले. नारायण राणे यांच्यावर संपूर्ण जिल्ह्याचा विकास अवलंबून आहे. लोकसभेत निवडून दिलं तर सिंधुदुर्ग जिल्ह्याचं मंत्रिपद फिक्स आहे. त्यामुळे जिल्ह्याला मिळणारी केंद्रीय मंत्रिपदाची संधी घालवायची का? याचा विचार जनतेने करावा असे केसरकर म्हणाले.
Deepak Kesarkar : ‘युती तुटण्यामागे आदित्य ठाकरेंचा वाटा’ शिंदे गटाच्या नेत्याचा मोठा दावा
रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघावरून महायुतीत तिढा निर्माण झाला आहे. या मतदारसंघावर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दावा केला आहे. उद्योगमंत्री उदय सामंत यांचे बंधू किरण सामंत हेही इच्छुक आहेत. याआधी त्यांनी बंडखोरीचेही संकेत दिले होते. ठाकरे गटाचे स्टेटस ठेवत आपण कोणत्याही क्षणी पक्षांतर करू शकतो असे त्यांनी आधीच सांगितले होते. परंतु, नंतर त्यांची समजूत काढण्यात आली.
या तिढ्यावर तोडगा काढण्यासाठी आतापर्यंत अनेक बैठका झाल्या मात्र अजूनही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे येथे रस्सीखेच दिसून येत आहे. आधी हा मतदारसंघ शिवसेनेकडे होता. त्यामुळे शिंदे गटाच्या किरण सामंत यांनी या मतदारसंघातून लढणार असल्याचे सांगितले होते. काही दिवसांपूर्वी नारायण राणे आणि मंत्री उदय सामंत यांच्यात गुप्त बैठकही झाली होती. त्यामुळे या मतदारसंघात काय निर्णय घेतला जाईल याची कल्पना अजून कुणालाही नाही. मात्र, केसरकर यांच्या वक्तव्याने या मतदारसंघातील राजकारणात नवाच ट्विस्ट आला आहे.
Uddhav Thackeray : अरविंद केजरीवालांनंतर उद्धव ठाकरे? राणेंच्या ‘त्या’ ट्विटचा अर्थ काय..