विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा

विरोधी पक्ष नेत्याचा कोट अन् राज्याचा अर्थसंकल्प… : जयंत पाटलांनी सांगितला राणेंच्या दिलदारपणाचा किस्सा

Jayant Patil : राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर महाविकास आघाडीतील विरोधी पक्षनेतेपद रिक्त झाले होते. या पदावर आज विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांच्या नावाची घोषणा केली. अधिकृत घोषणा होताच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हाताला धरून विजय वडेट्टीवार यांनी खुर्चीवर बसवलं. त्यानंतर सभागृहात उपस्थित सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील नेत्यांनी त्यांचे अभिनंदन केले. अभिनंदनाच्या प्रस्तावावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जोरदार फटकेबाजी केली.

नारायण राणेंना फोन केला

विरोधी पक्ष आणि सरकारमधील संबंध कसे असले पाहिजेत हे सांगताना पाटील यांनी नारायण राणे यांचं उदाहरण दिले. नारायण राणेही विरोधी पक्षनेते होते. त्यांनी नुसते असे डावीकडे पाहिले तरी सगळे खाली बसत होते. इतका त्यांचा दरारा होता. त्यांचा अभ्यासही चांगला होता. त्यांची भाषणेही उत्कृष्ट होती. मी अर्थमंत्री होतो त्यावेळी त्यांच्या प्रश्नांची उत्तर देताना आम्हालाही अभ्यास करावा लागायचा. त्यावेळी सभागृहात असं वाटायचं की जयंत पाटलांनी चुकीचा अर्थसंकल्प मांडला की काय. एवढा प्रभाव ते आपल्या भाषणात निर्माण करायचे.

संभाजी भिडेंना अटक करा अन्यथा मर्डर करेन, सुबोध सावजींची खुलेआम धमकी…

मी एकदा अर्थसंकल्प मांडणार होतो. त्यावेळी अरुण गुजराथी सभापती होते. क्रिकेटची मॅचही होती. म्हणून मी त्यांना विनंती केली की उद्या अर्थसंकल्प लवकर मांडावा लागेल. कारण नंतर मॅच होती. मॅच सुरू झाल्यावर अर्थसंकल्प कुणीच पाहणार नाही. ते म्हणाले यासाठी विरोधी पक्षनेत्यांशी बोलावं लागेल असे सांगत राणे साहेबांना फोन केला. राणे म्हणाले तुम्ही म्हणताल तो वेळ. पण तुम्ही कपडे काय घालणार? असे विचारले. मी म्हटलं कपडे काय शर्ट आणि पँटच. त्यावर राणे म्हणाले नाही राज्याचा अर्थमंत्री सुटाबुटातच आला पाहिजे.  त्यानंतर त्यांच्या टेलरने मापे घेतली. आणि मी सुटात अर्थसंकल्प सादर केल्याचे पाटील म्हणाले.

दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचं लक्षच नाही

पाटील म्हणाले, विरोधी पक्षनेत्यांचं महत्व इतक आहे की दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी मागून येणाऱ्या आमदारांकडे लक्ष देण्याऐवजी विरोधी पक्षनेत्यांसदर्भात होणाऱ्या भाषणाकडं लक्ष दिलं. त्यावर अजित पवार म्हणाले आमच्या दोघांचं लक्ष तुमच्याकडेच आहे पण तुमचंच लक्ष आमच्याकडे नाही त्याला मी काय करू ? असा खोचक सवाल करताच सभागृहात जोरदार हशा पिकला.

‘तिकडे जाऊ नका, परत इकडेच या’ : वडेट्टीवारांचे अभिनंदन अन् अनेक टोमणे; अजितदादांनाही हसू आवरेना

मुख्यमंत्री विचलित न होता लक्ष देऊन सगळ्यांची भाषण ऐकत आहेत. पण, दोन उपमुख्यमंत्री काही लक्ष द्यायला तयार नाहीत. आता मुख्यमंत्र्यांनी हे स्पष्ट केले पाहिजे की उपमुख्यमंत्री नंबर एक कोण आणि नंबर दोन कोण. मुख्यमंत्र्यांनीच हे सांगायला पाहिजे पण बाकीचेच सांगत आहेत तर मग कसे होणार असा कोंडीत टाकणारा प्रश्न पाटील यांनी केला.

 

follow us
  • fb
  • instagram
  • youtube

वेब स्टोरीज