राज्याच्या राजकारणात पुन्हा भुकंपाची चाहूल; शिरसाटांच्या दाव्यानं भुवया उंचावल्या…

  • Written By: Published:
राज्याच्या राजकारणात पुन्हा भुकंपाची चाहूल; शिरसाटांच्या दाव्यानं भुवया उंचावल्या…

मुंबई : लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीच्या वाट्याला हवे तसे यश मिळू शकल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी (Devendra Fadnavis) मला मोकळं करावं असे विधान केले होते. त्यांच्या या विधानानंतर राज्याच्या राजकारणात भूकंप होणार असल्याचे बोलले जात होते. पण अमित शाहंनी तुर्तास राजीनामा देण्याची आवश्यकता नसल्याचे सांगत फडणवीसांची समजूत काढल्याचे सांगितले जाते. हा भूकंप होता होता थांबवण्यात यश आल्यानंतर आता शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांच्या विधानानंतर पुन्हा राज्यात भूकंपाची चाहूल लागली आहे. (Sanjay Shirsat Says Uddhav Thackeray & Eknath Shinde Will Come Together)

उदयनराजेंना थांबवून भाजपचा मोहोळांवर डाव… फडणवीसांनी एका दगडात मारले पाच पक्षी

जुन्या शिवसैनिकांकडून एकत्र येण्याची साद

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट तयार झाले. मात्र, आजही दोन्ही शिवसेनेने एकत्र येण्याची साद जुन्या शिवसैनिकांकडून घातली जाते. मध्यंतरी मुंबईत दोन्ही शिवसेने एकत्र यावे, असे बनर्स लागले होते. त्यानंतर आता शिरससाटांनी दोन्ही शिवसेना एकत्र येऊ शकतात असा दावा केला आहे.

नेमका काय म्हणाले शिरसाट?

शिरसाट म्हणाले की, शिवसेनेची खरी दौलत म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आहेत. परंतु काही लोकांची निष्ठा बदलली आहे. त्यांना आता शिवसेना प्रमुखांपेक्षा शरद पवार, राहुल गांधी दौलत वाटत आहेत. मात्र, त्यांच्या आणि आमच्या विचारसरणीमध्ये खूप फरक आहे. याच गोष्टीचा आम्हाला त्रास होत होता. त्यामुळे आम्ही बाहेर पडलो. परंतु, आताही त्यांनी त्यांची दिशी बदलली तर दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येऊ शकतात असे विधान संजय शिरसाट यांनी केला आहे.

मुरलीधर मोहोळ कलमाडी, धारिया यांच्या रांगेत ! तब्बल 28 वर्षानंतर जनतेतून निवडून आलेला खासदार मंत्री

…तर आम्हाला आनंद होईल

“आजही आम्हाला वाटतं की कोणीतरी पुढाकार घ्या. म्हणा एकदा आपण शिवसेना प्रमुखांच्या भूमिकेत जाऊ त्यांची भूमिका घेऊन पुढे जाऊ, आम्हाला आनंद होईल. राजकीय स्वार्थासाठी आम्ही बाहेर गेलो नाही. आमच्या राजकीय भवितव्यासाठी हा उठाव केलेला नाही. एका विचाराने एकत्र येणार असाल. त्यांनी एक पाऊल पुढे टाकले आम्ही दोन पाऊल पुढे टाकू, पण ते टाकणार नाहीत. ते करंटे लोकांच्या आहारी गेले आहेत,” असे शिरसाट म्हणाले.

मंत्रिपद मिळाले नाही म्हणून…

यावेळी शिरसाटांनी काल (दि.9) केंद्रीय मंत्रिमंडळाच्या पार पडलेल्या शपथविधीवरही भाष्य केले. ते म्हणाले की,  केंद्रीय मंत्रिमंडळासाठी आमची कुठलीही मागणी नव्हती. जे मिळालं ते घेतले. त्यामुळे इतरांच्या पोटात दुखण्याचं काय कारण? असा सवाल त्यांनी ठाकरे गटाला केला. आम्हाला दुसऱ्याचं वाकून पाहण्याची गरज नाही. तुम्ही सत्तेबाहेर आहात, बघा इतकं असून यांना काही मिळालं नाही अशा उगाच चर्चा घडवायची काहींना सवय आहे. पण त्यांनी काळजी करू नये आमचं आम्ही पाहू. तुमचं तुम्ही पाहा असा टोला शिरसाटांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube