मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मांडाव्यात पण मुख्यमंत्र्यांविषयी…मंत्री उदय सामंत काय म्हणाले?
![मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मांडाव्यात पण मुख्यमंत्र्यांविषयी…मंत्री उदय सामंत काय म्हणाले? मनोज जरांगे पाटील यांनी सर्व मागण्या मांडाव्यात पण मुख्यमंत्र्यांविषयी…मंत्री उदय सामंत काय म्हणाले?](https://images.letsupp.com/wp-content/uploads/2025/02/News-Photo-2025-02-11T113033.204_V_jpg--1280x720-4g.webp)
Uday Samant on Manoj Jarange : राज्याचे उद्योग आणि मराठी भाषा विभागाचे मंत्री उदय सामंत यांनी मनोज जरांगे पाटील यांना सल्ला दिला आहे. मनोज जरांगे पाटील यांचा मेहुणा विलास खेडकर याच्यावर जालना पोलिसांकडून (Manoj Jarange) तडीपारीची कारवाई करण्यात आली. यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरण्याचे काम केले तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही असं जरांगे म्हणाले आहेत.
ओबीसी समाजावर कुठलाही अन्याय न होता जे दहा टक्के मराठी समाजाला आरक्षण दिलेले आहे. ते टिकले पाहिजे, मराठवाड्यातल्या कुणबी नोंदी ज्या निजामकालीन आहेत, त्यांना सर्टिफिकेट मिळाले पाहिजे. शिंदे समितीची मुदत वाढ करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले आहे. पण, मला मनोज जरांगे यांना विनंती करायची आहे की, राज्याच्या मुख्यमंत्र्यांबाबत बोलताना आपण थोडं संयम ठेवून बोललं पाहिजे असंही सामंत म्हणाले आहेत.
तर तुमचा कार्यक्रम लावणार, मेहुण्यावर कारवाई होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना जरांगेंचा इशारा
कारण ते राज्याचे मुख्यमंत्री आहेत. जनतेने त्यांना निवडून दिलेले आहे. कदाचित रागाच्या भरात अशा गोष्टी होऊ शकतात. पण त्यांनी सरकारशी संवाद ठेवावा, हे मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे. आंदोलन हा लोकशाहीचा भाग आहे. त्याच्याकडे सकारात्मक आणि आदराने बघितले पाहिजे. पण, तुम्ही संवाद देखील साधला पाहिजे. काही गोष्टींबरोबर गैरसमज करून न घेता सरकारशी संवाद ठेवण्याची गरज आहे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
नेमकं काय म्हणाले होते मनोज जरांगे?
मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले होते की, एकीकडून सुरेश धस आणि देवेंद्र फडणवीस सांगतात की, आम्ही मराठा आंदोलकांच्या केसेस मागे घेणार आहोत आणि दुसरीकडे मराठा आंदोलकांना नोटीस दिल्या जात आहेत. तुमचा दुसरा काही विषय असेल तर आम्हाला देणेघेणे नाही, आपली भूमिका कायम आहे. आमच्या सरळ स्वभावाचा फायदा तुम्ही उचलायचा नाही. तुम्ही अंतरवालीतील आंदोलकांना जर नोटीस देणार असाल, तुम्ही त्यांच्या पाठीमागे असे लागणार असेल तर फडणवीस साहेब मी सोडणार नाही. तुम्ही जर मराठ्यांना वेठीस धरायचं काम केलं तर, तुमचा कार्यक्रम लावायला मला वेळ लागणार नाही, असा इशारा त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिला होता.