राष्ट्रवादी म्हणजे पक्ष नाही तर, निवडून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरेंकडून शरद पवार टार्गेट
![राष्ट्रवादी म्हणजे पक्ष नाही तर, निवडून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरेंकडून शरद पवार टार्गेट राष्ट्रवादी म्हणजे पक्ष नाही तर, निवडून येणाऱ्या माणसांची मोळी; राज ठाकरेंकडून शरद पवार टार्गेट](https://dvmep2zap7gv4.cloudfront.net/wp-content/uploads/2024/03/letsupp-image-2024-03-09T135100.690.jpg)
नाशिक : पवारांचा पक्ष म्हणजे निवडणून येणाऱ्या माणसांची मोळी आहे असे म्हणत राज ठाकरेंनी (Raj Thackeray) पुन्हा एकदा शरद पवारांचा समाचार घेत टीका केली आहे. शरद पवारांच्या (Sharad Pawar) राष्ट्रवादीला मी पक्ष म्हणणार नाही असे राज ठाकरे म्हणाले. ते नाशिकमध्ये आयोजित मनसेच्या वर्धापन दिनानिमित्त कार्यक्रमात बोलत आहेत. यावेळी राजकारणात टिकायचं असेल तर, संयम महत्त्वाचा असल्याचा कानमंत्रही राज यांनी उपस्थितांना दिला. अडवाणी, वाजपेयींनी खस्ता खाल्या म्हणून भापपचं यश दिसत असल्याचे राज यांनी सांगितले. सध्या राज्याच्या राजकारणात दुसऱ्यांची पोरं घेऊन फिरण्यात आनंद मानला जात असल्याची टीकाही राज यांनी भाजपचं नाव न घेता केली. मला बऱ्याच गोष्टी बोलायच्या आहेत त्या मी आज नाही तर, 9 एप्रिलला गुढी पाडव्याच्या दिवशी बोलेन असे राज यांनी सांगितले. (Raj Thackeray Attack On Sharad Pawar & His Party)
मतदारसंघातील वाद मिटवताना बारामतीच्या ‘दादांना’ नाकीनऊ : पुण्याचे ‘दादा’ पुन्हा करणार मध्यस्थी
राज ठाकरे म्हणाले की, पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष मनसेच्या 10 वर्ष आधी आला मात्र, मी त्याला पक्ष म्हणत नाही कारण, तो निवडणून येणाऱ्या माणसांची बांधलेली मोळी असून, जे जे निवडणून येतात त्यांना शरद पवार बरोबर घेतात त्याची मोळी बांधतात आणि सांगतात हा माझा पक्ष. पवार साहेब गेल्या अनेक वर्षांपासून हेच करत आहे आहे. ते वेगळे झाले तरी ते निवडणून येणार आहेत असेही राज ठाकरे म्हणाले. राज्यात खऱ्या अर्थांने जर कोणते पक्ष स्थापन झाले असतील तर, त्यात पहिला जनसंघ, शिवसेना आणि त्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा पक्ष स्थापन झाल्याचे राज यांनी ठासून सांगितले.
दिसत असलेले यश मोदींचं आहेच पण..
यावेळी राज यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवरही भाष्य केले. ते म्हणाले की, राजकारणात प्रचंड संयम लागतो. राजकीय कार्यकर्त्यांमध्ये संयम असलाच पाहिजे. आज मोदींच्या रूपात भाजपा जे यश अनुभवतोय त्यात मोदींचं श्रेय आहेच पण अनेक दशकांच्या कार्यकर्त्याचीही मेहनत, संयम आणि संघर्ष पण आहे. भाजपच्या यशामागचं 20 टक्के यश हे त्यापक्षासाठी इतके वर्ष झटत आलेल्या आणि खस्ता खाल्लेल्यांचे यश आहे. वाजपेयी, अडवाणी, महाजन मुंडे या लोकांची ज्या खस्ता खाल्ल्या हे त्याचे यश असून ते असे अचानक आलेले नाही.
दुसऱ्याची पोरं कडेवर घेऊन फिरण्यात आनंद मिळतो, राज ठाकरेंची फडणवीसांवर टीका
सध्या राज्यात दुसऱ्याची पोरं खेळतात,पण…
यावेळी राज यांनी सध्या सत्तेत असलेल्या महायुतीच्या सरकारवर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले की, सध्या राज्यात दुसऱ्याची पोरं खेळतात, पण माझ्या खांद्यावर माझी पोरं खेळवण्याची ताकद आहे. आजकाल प्रत्येकाला वडा टाकला की, तळून आलेला पाहिजे. 18 वर्षात मी आणि माझ्या पक्षाने अनेक चढ-उतार पाहिले. यात चढ कमी आणि उतार जास्त होते. मात्र, तुम्ही माझ्या सोबत राहिला हे माझं भाग्य. आपल्याला यश नक्की मिळणार आणि मी ते मिळवून देणारचं पण त्यासाठी पेशन्स आवश्यक आहेत. राजकारणात वावरायचं असेल राहायचं असेल टिकायचं असेल तर, सर्वात मोठी गोष्ट लागते ती म्हणजे पेशन्स असा कानमंत्र देत राज ठाकरे यांनी शायनर कार्यकर्त्यांचे कान टोचले. पंतप्रधान मोदी येऊन उद्घाटन करून गेले होते त्या अरबी समुद्रात अजून आमच्या शिवाजी महाराजांचे स्मारक का नाही झाले असा प्रश्नही राज यांनी राज्य सरकारला विचारला.