“समोर कुणीही उमेदवार असू द्या, आम्ही लढणारच”; पंकजा मुंडेंचं ‘मविआ’ला चॅलेंज

“समोर कुणीही उमेदवार असू द्या, आम्ही लढणारच”; पंकजा मुंडेंचं ‘मविआ’ला चॅलेंज

Pankaja Munde : भाजपाकडून पंकजा मुंडे यांना लोकसभेचे उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच पंकजा मुंडे (Pankaja Munde) या नगर शहरामध्ये आल्या होत्या. पाथर्डी येथील मोहटा देवी गडावर जाण्याआधी त्यांचा ठिकठिकाणी सत्कार करण्यात आला. लोकसभेची उमेदवारी (Lok Sabha Election) जाहीर झाल्यानंतर पंकजा मुंडेंकडून दौरा सुरू आहे. यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधत विविध राजकीय मुद्द्यांवर मते व्यक्त केली.

राष्ट्रवादीचा अजित पवार गट हा महायुतीमध्ये आहे. त्यानंतर लोकसभा निवडणूक लढवली जात असून भाजपाकडून पंकजा मुंडे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे आता बहिणीच्या प्रचारासाठी भाऊ धनंजय मुंडे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसरीकडे बीडमधून मविआने पंकजा मुंडेंना कडवे आव्हान देण्याची तयारी सुरू केली आहे. सध्याच्या घडीला बजरंग सोनवणे आणि ज्योती मेटे या दोन नावांवर मविआ नेत्यांत विचार सुरू आहे.

Pankaja Munde: राज्यात माझ्या निवडणुकीची चर्चा जास्त पण, आशीर्वाद द्यायलाच कुणी नाही

महाविकास आघाडीकडून ज्योती मेटे आणि बजरंग सोनवणे यांचे नाव लोकसभेसाठी चर्चेत आहे. यावर बोलताना पंकजा म्हणाल्या, निवडणुकीमध्ये कुणी ना कुणी उभे राहणारच. आम्ही अनेक निवडणुका हे लढल्या आहेत. आज राष्ट्रवादी काँग्रेस आमच्यासोबत आहे. कधीकाळी आम्ही त्यांच्या विरोधात देखील लढलो आहोत. यंदा बीडमध्ये परिस्थिती वेगळी आहे मात्र तरी देखील आम्हाला निवडणुकीत यश मिळेल असा विश्वास वाटतो.

लोकसभा निवडणुकीआधी बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश करत आपले इरादे स्पष्ट केले आहेत. यावर पंकजा मुंडे यांना विचारण्यात आले असता त्या म्हणाल्या, जे आमच्याबरोबर महायुतीत होते मात्र ते उमेदवारीसाठी दुसऱ्या पक्षात गेले आहेत. बजरंग सोनवणे यांच्या विरोधात आम्ही यापूर्वीही लढलो. त्यानंतर ते आमच्यासोबत महायुतीमध्ये आले होते. कुणीही उमेदवार असू द्या मात्र आम्ही तेवढ्याच ताकदीने निवडणूक लढणार आहोत, असे पंकजा मुंडे म्हणाल्या.

Pankaja Munde : व्यक्तिगत निर्णय सांगण्यासाठी नसतात, मी योग्य वेळ आल्यावर.. पंकजांचा सूचक इशारा

लोकसभेच्या प्रचाराबाबत मुंडे यांना विचारले असता त्या म्हणाले की, प्रचार हा आमचा पाचही वर्ष सुरूच असतो गेल्या पाच वर्षात अनेक कार्य हाती घेतले. कोरोना काळातही कामे केली. अतिवृष्टीग्रस्तांना दिलासा देण्याचे काम देखील केले. प्रत्येक क्षण हा जनसेवेचाच आहे जनसेवेतून मिळालेली पावती हाच प्रचार आहे असे यावेळी मुंडे म्हणाल्या.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube