अन्यथा शासनाचा बुरखा फाडू; वाळू वाहतूक धोरणावरून तनपुरेंचा थेट इशारा

  • Written By: Published:
अन्यथा शासनाचा बुरखा फाडू; वाळू वाहतूक धोरणावरून तनपुरेंचा थेट इशारा

Prajakt Tanpure on State Goverment : राज्य शासनाने अत्यल्पदरात सर्वसामान्यांना वाळू (Sand) मिळावी म्हणून सुरू केलेल्या वाळू धोरणामध्ये वाहतूक दराबाबत अस्पष्टता आहे. महाखनिज पोर्टलवर (Mahakhanij Portal) अत्यल्प दर दिलेले असल्यानेच ठेकेदार व ग्रामस्थांमध्ये वाहतुकीवरून वाद वाढत आहे. त्यामुळे वाळू वाहतूक धोरणामध्ये अजूनही पारदर्शकता आणावी, अन्यथा पुढील अधिवेशनात सर्व विरोधक आमदार एकत्र येऊन शासनाच्या चुकीच्या धोरणाचा बुरखा फाडू, असा इशारा आमदार प्राजक्त तनपुरे (Prajakt Tanpure) यांनी दिला.

युगेंद्र जोगेंद्र कोणीही येऊ द्या, फरक पडणार नाही, राजकीय भूकंप होणारच; मिटकरींचा दावा 

राहुरी महसूल कार्यालयामध्ये बारागाव नांदूर येथील ग्रामस्थांसह ठेकेदार अर्जुन पानसंबळ, सचिन म्हसे, तहसीलदार नामदेव पाटील, नायब तहसीलदार संध्या दळवी, लिपीक प्रशांत औटी यांच्यासमवेत आयोजित बैठकीत आ. तनपुरे यांनी वाळू धोरणावर संताप व्यक्त केला.

महाखनिज पोर्टलवर सर्वसामान्यांना कमी दरात वाळू मिळणार असल्याचे दिसत आहे. राज्यभरात वाळू वाहतुकीच्या दराबाबत गोंधळ निर्माण झालेला आहे. शासन आदेशात जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांसह प्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्या स्वाक्षरीनुसार ५७ रुपये प्रति कि.मी. इतकाच दर लागू आहे. तो दर वाळू वाहतुकदारांना परवडणारा नाही. त्यामुळेच अधिक दर लादले जात आहे. परिणामी अधिक वाहतूक दर असल्याने चोरीची वाळू बरी असे म्हणण्याची वेळ सर्वसामान्यांवर आली आहे. त्यामुळे राज्य शासनाने आठवडाभरात सर्वसामान्यांसह ठेकेदारांनाही माफक ठरेल असा दर जाहीर करून पारदर्शकता आणावी, अशी सूचना त्यांनी केली आहे.

भारत-कॅनडा संबंध पूर्वपदावर येणार; आधी आरोप, आता नरमले 

तहसीलदार पाटील म्हणाले, बारागाव नांदूर-डिग्रस हद्दीतील मुळा पात्रात सुरू केलेल्या शासकीय वाळू डेपोमध्ये सर्व प्रक्रिया शासकीय नियमानुसार पूर्ण केल्या जात आहे. वाहतूक दराबाबत जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार नविन वाळू धोरणानुसार योग्य दर जाहीर केला जाणार असल्याचे सांगितले.

पैसे भरल्यानंतर १५ दिवसातच वाळू
यापूर्वी शासकीय दर अदा करूनही महिने उलटले तरी वाळू मिळाली नाही. त्यावर तहसीलदार पाटील यांनी सांगितले की, नविन वाळू धोरणानुसार पैसे अदा झाल्यानंतर १५ दिवसांतच वाळू मिळणार आहे.

बारागाव नांदूर ग्रामस्थांच्या वतीने सरपंच प्रभाकर गाडे, तनपुरे कारखान्याचे माजी संचालक श्रीराम गाडे, नवाजभाई देशमुख, माजी सरपंच निवृत्ती देशमुख, उसरपंच शाम गाडे, जिल्लभाई पिरजादे, प्रा. इजाज सय्यद, नितिन बाफना, , महेश उदावंत, सुरेश गाडे, सचिन चौधरी आदींसह परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. रागाव नांदूर येथील सेतू केंद्रात शासकीय वाळू खरेदीसाठी पैसे भरणा केंद्र सुविधा उपलब्ध आहे. १९ मार्च पर्यंत पैसे भरलेले ६ हजार ब्रास वाळूचा साठा उपलब्ध असून, त्यानंतरच नवीन बुकींग घेतली जाणार असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले.

follow us
  • fb
  • instagram
  • youtube