शिंदे-फडणवीस यांचा दिल्ली दौरा; मध्यरात्री गृहमंत्री अमित शहांसोबत खलबत अन् सूचक ट्विट

  • Written By: Published:
शिंदे-फडणवीस यांचा दिल्ली दौरा; मध्यरात्री गृहमंत्री अमित शहांसोबत खलबत अन् सूचक ट्विट

दिल्ली : राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रविवारी (4 जून) रात्री नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली. “आम्ही दिल्लीत येत राहतो. विकास प्रकल्प असोत, मराठवाड्यातील वॉटर ग्रीड प्रकल्पाचा प्रश्न असोत, कोकणातील पाणी प्रश्न असोत आणि शेतकर्‍यांचे हाल असोत, राज्याच्या अनेक मुद्द्यांवर चर्चा करायची आहे,” असं शिंदे यांनी भेटीला जाण्यापूर्वी स्पष्ट केलं.

शिंदे आणि फडणवीस यांच्या केंद्रीय भाजप नेतृत्वासोबतच्या बैठकीमागील नेमका अजेंडा उघड केलेला नसला तरी, राज्यात मागील काही दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तार आणि दोन्ही पक्षांमधील जागा वाटप मुद्दा यावर चर्चा झाली असण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे. याशिवाय शिंदेंच्या शिवसेनेला केंद्रात मंत्रिपद मिळण्याच्या दृष्टीनेही चर्चा झाली असावी असे सांगितले जात आहे. शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सेनेने अलीकडेच महाराष्ट्रातील 48 लोकसभा जागांपैकी 22 जागांवर दावा केला आहे.

वात्सल्यमूर्ती सुलोचना दीदींची कारकीर्द; ऑनस्क्रीन ‘या’ अभिनेत्यांच्या आईची भूमिका साकारली

दरम्यान, या भेटीबद्दल शिंदे यांनी ट्विट करुन माहिती दिली. ते म्हणाले, काल, रविवारी रात्री मी आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिल्लीत केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. कृषि, सहकार विभागाशी संबंधित विविध बाबींवर आम्ही चर्चा केली. राज्यात शेतकरी, महिला सक्षमीकरण अशा विविध क्षेत्रात गतीने कामे सुरू असून अनेक रखडलेले प्रकल्प मार्गी लावले आहेत. राज्यातील विविध प्रकल्पांसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे नेहमीच मार्गदर्शन लाभले आहे, सहकार विभागाशी संबंधित बाबींवर केंद्रीय सहकार मंत्री श्री. शाह यांचे आम्हाला नेहमीच मार्गदर्शन लाभत असल्याने आम्ही ही भेट घेतली.

राज्यात आगामी सर्व निवडणूका (ज्यात लोकसभा, विधानसभा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा समावेश होतो) शिवसेना आणि भाजपने एकत्रितपणे लढविण्याचा निर्णय देखील या बैठकीत घेण्यात आला. महाराष्ट्राच्या विकासासाठी आमची युती ही भक्कम असून गेल्या ११ महिन्यांपासून आम्ही विकासाचे विविध निर्णय घेऊन त्याची अंमलबजावणी केली आहे, रखडलेले प्रकल्प मार्गी लावत आहोत. यापुढच्या काळात सर्वच क्षेत्रात महाराष्ट्राला देशात प्रथम क्रमांकाचे राज्य बनविण्यासाठी, विकासाची घोडदौड अशीच सुरू ठेवण्यासाठी आम्ही एकत्रित निवडणुका लढविणार आणि बहुमताने जिंकणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Tags

follow us
  • fb
  • instagram
  • youtube