‘रामरक्षा’ आंदोलनादरम्यान गोंधळ आणि राऊतांची आक्रमक भाषणे; मोरगावात राजकीय वातावरण चांगलेच तापले
खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे.
The political atmosphere in Morgaon has heated up significantly : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या बारामती दौऱ्यादरम्यान आयोजित करण्यात आलेल्या ‘रामरक्षा’ आंदोलनात गोंधळ झाल्याची घटना समोर आली आहे. अयोध्येतील राम मंदिरासाठी जमा झालेल्या देणग्यांमध्ये कथित गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत ठाकरे गटाने राज्यभर ‘रामरक्षा’ आंदोलन सुरू केले आहे. त्याच आंदोलनाच्या निमित्ताने संजय राऊत यांनी बारामती तालुक्यातील मोरगाव येथे भेट देत रामरक्षा पठण आणि सभेत सहभाग घेतला. मात्र, कार्यक्रमादरम्यान झालेल्या गोंधळामुळे राजकीय वातावरण तापले आहे.
या घटनेनंतर ठाकरे गटाने थेट भाजपच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांवर आरोप केले आहेत. पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कार्यक्रमात जाणूनबुजून गोंधळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला. आमचा कार्यक्रम यशस्वी होत असल्याचे पाहून काही जणांनी वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला. हे लोक भाजपशी संबंधित असल्याचा आमचा आरोप आहे. त्यांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रार दाखल करण्यात येणार असून संपूर्ण घटनेची माहिती गोळा केली जात असल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी असा दावा केला की, संजय राऊत यांच्या उपस्थितीत कार्यक्रमात व्यत्यय आणण्यासाठी काही व्यक्तींना मुद्दाम पाठवण्यात आले होते. आमच्या आंदोलनाला मिळणारा प्रतिसाद आणि कार्यक्रमाचे यश काहींना सहन झाले नाही. त्यामुळे हा गोंधळ घालण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच, या प्रकरणामागे कोणाचा हात आहे, याची माहिती गोळा करून पुढील कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.
सर्दी आणि खोकल्याच्या औषधांवर बंदी ; 4 वर्षांखालील मुलांसाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय
दरम्यान, कार्यक्रमानंतर उपस्थितांना संबोधित करताना खासदार संजय राऊत यांनी राम मंदिर देणग्यांच्या कथित गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकार आणि भाजपवर जोरदार टीका केली. राम मंदिर उभारणीसाठी हजारो कारसेवकांनी संघर्ष आणि बलिदान दिले असल्याचे सांगत त्यांनी मंदिरासाठी जमा झालेल्या निधीच्या वापराबाबत प्रश्न उपस्थित केले.
राऊत म्हणाले, राम मंदिराच्या नावावर जमा झालेल्या निधीमध्ये मोठा गैरव्यवहार झाला आहे. हजारो कोटी रुपयांचा हिशोब जनतेसमोर यायला हवा. ज्यांच्या नावावर सत्ता मिळाली, त्याच प्रभू रामांच्या मंदिरात गैरव्यवहार झाल्याचे आरोप होत आहेत. आणि आम्हालाच हिंदुत्व सोडल्याचे सांगितले जाते. यावेळी त्यांनी शिवसेनेच्या राम मंदिर आंदोलनातील भूमिकेचाही उल्लेख केला. बाळासाहेब ठाकरे यांनी राम मंदिर आंदोलनाला दिलेल्या पाठिंब्याची आठवण करून देत, राम मंदिराच्या लढ्यात शिवसेनेचे योगदान महत्त्वाचे असल्याचा दावा त्यांनी केला.
रामरक्षेचा आणि राम मंदिराच्या मुद्द्यावर बोलण्याचा अधिकार खऱ्या शिवसेनेलाच आहे, असेही ते म्हणाले. संजय राऊत यांच्या वक्तव्यांमुळे आणि मोरगावमधील गोंधळाच्या घटनेमुळे बारामतीतील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, या प्रकरणावरून ठाकरे गट आणि भाजप यांच्यात आरोप-प्रत्यारोपांची नवी फेरी सुरू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.