निवडणुका जवळ आल्या की यांची भाषा बदलते; प्रकाश आंबेडकरांची जरांगे यांच्यासह अनेक नेत्यांवर टीका
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत ठिय्या मांडल्यावर १९० आमदार त्यांच्या दर्शनाला गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली.
नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीचा धुरळा उडाला असून सोमवारपासून अर्ज दाखल करायला सुरुवात झाली आहे. वंचितचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर (Ambedkar) यांनी जालन्यात सभा घेऊन निवडणुकीत अतिशय महत्त्वाची भूमिका निभावणाऱ्या ओबीसी मतदारांना चुचकारण्याचा प्रयत्न केला. सत्ता जायला लागली की लोकांची भाषा बदलते असा टोला यावेळी आंबेडकर यांनी लगावला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत ठिय्या मांडल्यावर १९० आमदार त्यांच्या दर्शनाला गेले. तिथे देवेंद्र फडणवीस यांची भाषा बदलली. भेटायला गेलेल्या आमदारांचे थेटपणे सांगणे होते की मनोज जरांगे पाटील यांची मागणी मान्य करा. २ सप्टेंबरचा जीआर काढून त्यांनी ओबीसीमध्ये घुसखोरी केली. मुख्यमंत्रिपद जाऊ नये म्हणून फडणवीसांनी जीआर काढला. म्हणून ओबीसी मतदारांनी अजिबात भाजपला मतदान करू नका, असे आवाहन प्रकाश आंबेडकर यांनी केलं आहे.
धनंजय मुंडेंनी माझ्या हत्येची सुपारी दिली; जरांगेंचे गंभीर आरोप; काय-काय ठरलेलं सगळं सांगितलं
भाजपलाच नाही तर त्यांचे मित्र पक्ष असलेल्या अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला देखील मतदान करायचं नाही. प्रत्येक मतदारसंघात एक ओबीसी उमेदवार असलाच पाहिजे, अशी रणनीती असायला हवी. अनेक वेळा बोलले जातं की धर्म संकटात आला आहे. परंतु धर्म वगैरे काही संकटात आले नाही, ओबीसी संकटात आहे, असंही ते यावेळी म्हणालेत.
तुमची सगळ्यांची जबाबदारी आहे की माझे मत मी भाजपला देणार नाही. गावातील आणि वस्तीवरच्या लोकांकडून हे वदवून घ्या. मतदानासाठी पैसे घेणारे तुम्ही सगळे नालायक आहात. अतिवृष्टीचे अनुदान जालन्यातल्या एक तरी शेतकऱ्याला मिळाले का? सत्ताधाऱ्यांनी तुमची किंमत केली, अनुदान मिळवायचे असेल तर तुम्ही कलेक्टर किंवा पोलिसांची गोडी फोडून चालणार नाही, सत्ताधाऱ्यांना दणका द्यावा लागेल, असंही आंबेडकर यावेळी म्हणालेत.
